शेतकऱ्याचा असूड

एक पुस्तक
(शेतकऱ्यांचा असूड या पानावरून पुनर्निर्देशित)

शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८ जुलै, १८८३ रोजी लिहिले आहे. परंतु तत्कालीन सामाजिक परिस्थितीत आणि काही कारणाने हा ग्रंथ ताबडतोब प्रकाशित होऊ शकला नाही. विशेष म्हणजे या पुस्तकाचे लेखनही सलग झालेले नाही. जसजसे फुले या पुस्तकाचे भाग लिहीत तसतसे ते त्यांचे जाहीर वाचन करीत असत. या पुस्तकाचा चौथा भाग १८८३ च्या एप्रिल महिन्यात मुंबई शहरात वाचला अशी जोतीरावांनी एका तळटीपेत नोंद केली असल्याचे दिसून येते. फुले यांनी पुणे, ठाणे, जुन्नर, ओतूर, हडपसर, वंगणी, माळ्याचे कुरुल या गावीही त्यांनी या ग्रंथाचे वाचन केले होते. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यासमोर फुल्यांनी जेव्हा या ग्रंथाचे वाचन केले तेव्हा त्यांनी ते लक्षपूर्वक ऐकून फुले याचा सत्कार केला होता. या पुस्तकाच्या हस्तलिखिताची एक प्रत भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल तसेच मुंबईचे गव्हर्नर यांनाही पाठवल्या गेली होती. या ग्रंथाचे पहिले दोन भाग नारायण मेघाजी लोखंडे यांनी “दीनबंधू” पत्रांत छापले होते. परंतु नंतर त्यांनी पुढचे भाग छापण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या फुल्यांनी लोखंडयाना “भेकड छापखानेवाले” म्हटले होते. फुल्यांच्या निधना नंतर १८९३ साली त्यांचे निकटचे सहकारी लोखंडे आणि कृ. पां. भालेकर यांच्यामध्ये वाद सुरू झाला. तेव्हा “शेतकऱ्याचा कैवारी” या पत्रात भालेकरांनी २८ ऑक्टोबर, १८८३ च्या दीनबंधूच्या संपादकीयातील काही मजकूर उदधृत केला होता. त्यात लोखंडे यांनी असे म्हटले होते की, सदरील ग्रंथाची भाषा अत्यंत कठोर असल्याने मोठी टीका तसेच कार्यवाही देखील होऊ शकते.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिस्रोत
शेतकऱ्याचा असूड हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.