शिवथरघळ

रायगड जिल्ह्यातील महाडपासून ३०किमि अंतरावर असणारी जागा.येथे समर्थ रामदास यांनी दासबोधाचे लेखन
(शिवथर घळ या पानावरून पुनर्निर्देशित)

शिवथरघळ ही रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे. ती महाडपासून तीस किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळच्याया काठावर कुंभे कसबे, व आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडाझाडोऱ्याने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदर मठ’ म्हणत असत.

इतिहास संपादन

शिवथरघळ आणि आजुबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले होते. पुढे १६४८ मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि समर्थ रामदास सन १६४९ मध्ये या घळीत वास्तव्यासाठी आले. ते नंतर सन १६६० पर्यंत म्हणजे दहा-अकरा वर्षे या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची सात आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. सन १६७६ मध्ये दक्षिणदिग्विजयासाठी जातांना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊनच छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले. आजच्या जगाला या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी १९१६ साली लावून दिला.

पहाण्याची ठिकाणे संपादन

पायऱ्या चढून आल्यावर समोरच ’शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समिती’ने स्थापन केलेली इमारत लागते. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो. घळीमधे रामदासस्वामींची मूर्ती आहे. घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. तो धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळत असतो. घळीच्या वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. या सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत.

 
शिवथरघळ धबधबा द्रुश्य

पोहोचण्याच्या वाटा संपादन

१) शिवथरघळीला जाण्यासाठी पायथ्यापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. पुढे १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण घळीपाशी पोहोचतो. मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या पुढे एक नदीवरील पूल लागतो. त्याच्या पुढे डाव्या बाजूला भोरकडे जाणारा वरंध घाटाचा फाटा लागतो. या रस्त्याने भोरच्या दिशेला जातांना बारस गाव आहे. येथे शिवथरकडे अशी पाटी लावली आहे. येथून पुढे साधारण ३० किमी अंतर पार केल्यावर आपण शिवथरघळीच्या पायथ्याशी पोहोचतो. वाटेत कुंभे शिवथर, कसबे शिवथर, अंबे शिवथर ही गावे लागतात.

२) दुसरा मार्ग जरा अवघड आहे. पुण्याहून निघून राजगड-भुतोंडे-बेळवंडी नदी, कुंबळ्याचा डोंगर, गोप्याघाट, कसबे शिवथर मार्गे घळीत पोहोचता येते. हा मार्ग तसा अवघड आणि वेळ खाणारा आहे.

राहाण्याची सोय संपादन

येथे असणाऱ्या ’शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समिती’च्या इमारतीमध्ये पूर्व परवानगीने अनेक जणांच्या राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय

शिधा आपण स्वतः… दिला तर जेवणाची सोयदेखील होते.

पाण्याची सोय

बारामाही पाण्याची सोय आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

बसच्या शेवटच्या थांब्यापासून शिवथरघळीपर्यंत १० मिनिटे लागतात.

पहा संपादन

समर्थ रामदासस्वामी ; महाराष्ट्रातील घाट रस्ते