शिवा काशीद

शिवाजी महाराजांचा मावळा
(वीर शीवा काशीद या पानावरून पुनर्निर्देशित)


शिवा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात न्हावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत असत. त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता. त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशीदांना, शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले. मात्र, हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खूपसली. ही घटना १२-१३ जुलै १६६० या दिवशी घडली.

या शिवा काशीद नावाच्या मर्द मावळ्याची समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी, विशाळगडाकडे जाणाऱ्या वाटेतील एका गावापाशी आहे. नेबापूरच्या (चव्हाण) "पाटलांनी" शिवा काशिदांना प्रति शिवाजी महाराज बनण्याची कल्पना दिली होती. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेबापूर (चव्हाण) पाटील आणि शिवा काशीद यांनी शिवाजी महाराजांशी थेट बैठक आयोजित केली. कारण पन्हाळा नुकताच स्वराज्यात सामील झाला होता. त्या काळात शिवाजी महाराज नवीन पन्हाळ्याचे व्यवस्थापन करण्याची योजना करीत होते.मानवी संसाधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेबापूर (चव्हाण) पाटील यांची होती. असेही सांगितले जाते की सिद्दी जौहरला दिशाभूल करण्याचे धोरण आखण्यात नेबापूर (चव्हाण)पाटील हे मुख्य सूत्रधार होते. नेबापूर (चव्हाण) पाटील हा सर्वात विश्वासू वैयक्तिक हेर होता. हे देखील सांगण्यात आले आहे की बाजी प्रभू आणि नेबापूर पाटील यांनी एकत्रितपणे योजना आखली आणि अंमलात आणली. सर्व माहितींपैकी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे शिवाजी महाराजांनी पन्हाळा ताब्यात घेतला तेव्हा शिवाजीराजेसारखे दिसण्याबद्दल शिवा काशिदचे प्रथम नेबापूर पाटलांनी कौतुक केले. पण लवकरच शिवा काशिदांनी शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा जीव वाचविला. नेबापूर (चव्हाण) पाटील यांच्या कल्पनेचा सन्मान म्हणून शिवाजी महाराजांनी "मानाची पायरी" भेट दिली."मानाची पायरी" हा एक मोठा आयताकृती कोरीव दगड आहे. तो अजूनही नेबापुरात आहे.

स्वराज्यासाठी अनेक हेरांनी काम केले होते, पण त्यांच्या कामाच्या गुप्ततेमुळे आणि कामाच्या व्याप्तीमुळे त्याची इतिहासात नोंद झाली नाही. परंतु, आता बरेच उत्तराधिकारी पुढच्या पिढ्यांसाठी माहिती लिहीत आहेत.