वीरा साथीदार (जन्म: विजय वैरागडे, इ.स. १९६०, नागपूर - निधन : इ.स. २०२१) हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, लेखक, व गायक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार वीरा साथीदार यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले.[१][२][३][४][५]

त्यांचे बालपण वर्धा जिल्ह्यातील जोगी नगर येथे गेले. त्यांचे मूळ नाव विजय वैरागडे होते. आडनावावरून जात कळते यामुळे त्यांनी कधीही आडनाव लावले नाही. सामान्य लोकांचा आंदोलनाताला 'साथीदार' म्हणून "वीरा साथीदार" असे नाव त्यांनी लावले. त्यांनी 'विद्रोही' नावाच्या मासिकाचे संपादन सुद्धा केले. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी आवाज उठवला होता. 'रिपब्लिकन पँथर' संघटनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी वंचितांसाठी काम केले. त्यांची व्याख्याने देशभर लोकप्रिय झाली होती.[६]

वीरा साथीदार यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती ठीक नव्हती. लहानपणापासूनच वीराला कलेची आवड होती. सुरुवातीपासूनच चित्रकला, शिल्पकला, काव्यलेखन, अभिनय या विषयांत ते निपुण होते. त्यांनी दलित रंगभूमीपासूनच अभिनयास सुरुवात केली. इ.स. २०१४ मध्ये आलेल्या साथीदारांच्या 'कोर्ट' या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु त्यांच्या आर्थिक स्थितीत काही फरक पडला नाही. या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी तर मिळाली पण काम मिळू शकले नाही.[७][८] न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले होते. 'कोर्ट' चित्रपटाला सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान सुद्धा मिळाला होता. या सिनेमात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली होती.[९]

वीरा साथीदार यांचे बालपणीचे मित्र आणि सहकारी धम्मचारी पद्मबोधी त्यांच्याविषयी सांगतात की, "वीरा नक्षल समर्थक नव्हता, पण तो विद्रोही गीतकार होता. तो शांतिवादी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच तो समाज प्रबोधन करायचा. पोलिसांचा ससेमिरा, न्यायव्यवस्थेच्या विलंबाने त्रस्त झालेला एक सामान्य भारतीय नागरिक, जो कोर्ट सिनेमात आपण 'नारायण कांबळे' या भूमिकेत पाहिला... वीरा तेच आयुष्य जगायचा. तो भारतातील मानसिक गुलामगिरीच्या विरोधात होता. त्याला त्याच्या समाजाला या मानसिक गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढायचे होते. पण हा वसा पूर्ण करताना त्याला अनेकदा पोलिसांनी अटक केली पण एकदाही त्यांच्या विरोधात पुरावा पोलीस सिद्ध करू शकले नाही. घेतला वसा त्याने कधी टाकला नाही त्यामुळेच त्याला बराच काळ विजनवासात राहावे लागले. पण हे सर्व सहन करूनही त्याने कधी परिस्थितीसोबत हातमिळवणी केली नाही."[१०]

१३ एप्रिल २०२१ रोजी वीरा साथीदार यांचं कोव्हिडने निधन झाले. त्यांच्यावर नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये आठवडाभर उपचार सुरू होते.[११]

संदर्भ संपादन