हिवाळी युद्ध हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएत संघ आणि फिनलंडमध्ये झालेले युद्ध होते. ३० नोव्हेंबर, १९३९ रोजी सोव्हिएत संघाने विनाकारण फिनलंडवर आक्रमण केले. सुरुवातीस फिनलंडने सोव्हिएत संघाला रोखून धरले व मोठ्या प्रमाणात सोव्हिएत संघाचे नुकसान केले परंतु सोव्हिएत संघाकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, रणगाडे आणि विमाने असल्याने चार महिन्यांतच फिनलंडने नांगी टाकली व मॉस्कोचा तह स्वीकारला. या तहानुसार सोव्हिएत संघाने फिनलंडचा कारेलियन द्वीपकल्प, कारेलिया, रायबाची द्वीपकल्प आणि फिनलंडच्या आखातातील बेटे गिळंकृत केली. पंधरा महिने हा तह टिकला. जर्मनीने सोव्हिएत संघावर चाल केल्यावर फिनलंडने त्यांच्या साथीने सोव्हिएत संघाशी पुन्हा एकदा युद्ध सुरू केले.