संत ज्ञानेश्वरांचे कनिष्ठ बंधू. सोपानदेवी या ग्रंथांचे लेखक. १२९७ साली ‌सासवड येथे समाधी घेतली. संतश्रेष्ठ सोपानकाकांनी सासवड येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी घेतली . यानिमित्ताने सासवड येथील सोपानकाका समाधी मंदिरात हा संजीवन समाधी सोहळा मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी या काळात साजरा केला जातो . या उत्सवात पुढीलप्रमाणे कार्यक्रम होतात. वद्य अष्टमी – दुपारी संस्थान तर्फे प्रवचन, रात्री ह.भ.प. तनपुरे यांच्यातर्फे कीर्तन व रात्री – श्री हनुमान भजनी मंडळ, सासवड जागर वद्य नवमी दुपारी प्रवचन, रात्री परकाळे दिंडी तर्फे कीर्तन वद्य दशमी दुपारी प्रवचन व रात्री ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांचे कीर्तन . रात्री जागर वद्य एकादशी – हा वारीचा मुख्य दिवस असतो . या दिवशी पहाटे ४ वाजता काकडा होतो . त्यानंतर समाधीस पंचसुक्त पवमानाचा अभिषेक होतो . या दिवशी सकाळी हरिकीर्तन होते . दुपारी ४ वाजता सोपानदेवांची पालखीतून नगरप्रदक्षिणा होते . या वेळेस गावातील नामदेव मंदिर , मारुती मंदिर , श्रीकृष्ण मंदिर याठिकाणी अभंग होतात . ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरापाशी विसावा होतो . यावेळेस विविध मानकरी अभंग म्हणून आपली सेवा रुजू करतात . त्यानंतर पालखी मंदिरात परत येते . रात्री ह. भ. प. एदलाबादकर यांचे कीर्तन होऊन त्यानंतर -रांजणी,खामगांव,आंबेड,कोंडगाव ग्रामस्थ तसेच सासवडकर व गणपतबुवा जाधव दिंडीचा जागर होतो . वद्य द्वादशी – सकाळी श्रींना व परिवार देवतांना आरती होते . या दिवशी सकाळी दोन कीर्तने (सकाळी ९ ते ११ श्री कातोबानाथ दिंडी,दिवे पंचक्रोशीतफ॔ कीर्तन , दुपारी १२ ते ३ ह.भ.प. सुनिल महाराज फडतरे ) होतात . दुपारी चक्री प्रवचने होतात . यावेळेस २० मिनिटे प्रत्येकी अशी ९ प्रवचनकारांची प्रवचने ३ तासात होतात . रात्री देहूकर फडाचे कीर्तन होते . त्यानंतर खिरापत व शेजारती होते त्यानंतर रात्री कुसमाडी, ता.येवला, जि.नाशिक दिंडीचा जागर होतो . वद्य त्रयोदशी – हा सोपानदेवांच्या समाधीचा दिवस आहे . या दिवशी मुख्य मंडपात सकाळी ९ ते १२.३० सोपानदेवांच्या समाधी वर्णनाचे कीर्तन होते . दुपारी १२ वाजता समाधी वर्णनाचा अभंग होऊन श्रींवर गुलाल व पुष्पवृष्टी होते .समाधी वर्णनाचे कीर्तन पूर्वी वहिवाटदार गोसावी घराण्यातील व्यक्ती करत . यामध्ये वै. ह.भ.प. ज्ञानेश्वर वामन गोसावी, वै. ह.भ.प. दत्तोबा ज्ञानेश्वर गोसावी, ह.भ.प.नारायण दत्तात्रेय गोसावी यांनी ही कीर्तनसेवा केली आहे. आता ही कीर्तनसेवा नामदेवरायांचे विद्यमान वंशज – ह.भ.प. केशव महाराज नामदास करतात . यानंतर लगेच काल्याचे कीर्तन होते. ही सेवा भोपळे दिंडीकडे असून गेली अनेक वर्ष ह. भ. प. लक्ष्मण महाराज कोकाटे भोपळे दिंडीतर्फे ही सेवा करतात. काल्याचे कीर्तन झाल्यावर दिंडी निघते. दिंडी चिंचेच्या झाडाखालील पादुकांपाशी आल्यावर दहीहंडी फोडली जाते. नंतर दिंडी नदीपलीकडील पुंडलिक मंदिरापाशी जाऊन भागीरथी कुंडावर येते. इथे कृष्णलीलेचा अभंग होऊन वारकरी पताकांनी (वारकरी झेंडा ) एकमेकांवर पाणी उडवतात. येथे आरती होऊन दिंडी मंदिरात येते . मुख्य मंडपात विनवणीचा अभंग होऊन आरती होते. यानंतर मंदिरात महाप्रसाद होतो. पूर्ण मंदिरात पंगती बसतात. रात्री चिंचेच्या झाडाखालील पादुकांपाशी दिव्यांची आरास करतात. यावेळेस महिन्याचे वारकरी सोपानदेवांच्या समाधी वर्णनाचे अभंग म्हणतात. त्यानंतर शेजारती होते. या दिवशी रात्री कीर्तन होत नाही. वद्य चतुर्दशी – हा यात्रेचा शेवटचा दिवस . या दिवशी काकडा झाल्यावर लगेच पूजा होत नाही . त्या आधी मंदिर धुऊन काढतात . नंतर पवमान अभिषेक होतो . या नंतर सकाळी ११ च्या सुमारास समाधीस सर्वांना गरम पाणी घालता येते . या वेळेस समाधीस लिंबू साखर सुद्धा लावतात . यास प्रक्षाळ पूजा अथवा लिंब न्हाण असेही म्हणतात रात्री ह. भ. प. नामदास महाराजांचे कीर्तन होते . यानंतर काढ्याचा ( साखर , वेलची युक्त दुधाचा ) नैवेद्य होऊन शेजारती होते .

हे सुद्धा पहा संपादन