श्राद्ध

पूर्वजांसाठी केला जाणारा संस्कारविधी

'श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्' म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे.[१]

श्राद्धविधीतील पिंडदान

पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. वडिलांच्या मृत्युतिथीला या पितृपक्षकाळात ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे असा संकेत आहे. त्यानिमित्त पिंडदान करतात. प्रत्येक गृहस्थाश्रमीला तीन प्रकारचे कर्ज (ऋण) फेडायचे असते, असा समज आहे. मातृऋण, पितृऋणसमाजऋण. ही सर्व ऋणे पुत्राने/पौत्राने फेडणे हे त्याचे कर्तव्य आहे असा शास्त्रसंकेत आहे. या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी करतात. श्राद्धविधी सुरू असतांना मृत व्यक्तीचा आत्मा तेथे वासनामय कोषात उपस्थित असतो, असा समज आहे. पितरांचे श्राद्ध करतांना पिता, पितामह, प्रपितामह, मातामह यांचेही स्मरण करतात. त्या आधीच्या पिढ्या ह्या मुक्त झालेल्या असतात असे मानतात. शुद्ध मनाने श्राद्ध करणाऱ्यास मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो अशी भावना आहे. अमावस्या व पौर्णिमेस मृत झालेल्यांचे श्राद्ध अमावस्येस करतात. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस शस्त्राघाताने मृत्यू पावलेल्यांचे श्राद्ध करतात. पितृपक्षात अन्नदान व गोग्रास यांचेही महत्त्व मानतात. अधिक मासात मृत्यू पावलेल्याचे श्राद्धही महालयात (पितृपक्षात) त्याच तिथीवर करतात.

व्याख्या संपादन

धर्मशास्त्रावरील निरनिराळ्या ग्रंथात श्राद्धाच्या व्याख्या दिल्या आहेत. त्या अश्या - ब्रह्मपुराणात म्हटले आहे की 'पितराना उद्देशून (त्यांच्या हिताकरिता) जे जे काही योग्य काळी, योग्य स्थळी, सत्पात्र व्यक्तींना आणि ब्राह्मणाना धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधीला अनुसरून श्रद्धापूर्वक देण्यात येते त्याला श्राद्ध म्हणतात.

याज्ञवल्क्याने म्हटले आहे की पितर म्हणजे श्राद्धामध्ये देवता असणारे वसू, रुद्र, आणि आदित्य श्राद्धाच्या योगाने संतुष्ट होऊन मनुष्याच्या पूर्वजांना संतोष देतात.[२]

इतिहास संपादन

पितरांच्या अंगात जिवंत मनुष्यांचे हित अथवा अहित करण्याचे सामर्थ्य असते अशा प्रकारची कल्पना वेदांच्या काळी अस्तित्वात असल्याचे ऋग्वेदातील उल्लेखावरून आढळून येते. हिंदू धर्मानुसार आत्मा अमर आहे. श्राद्ध एक हिंदू विधी आहे, आणि हा विधी दरवर्षी आपल्या मृत नातेवाईकांच्या स्मरणार्थ केला जातो. आत्माच्या काही गरजा असतात ज्या ते स्वतः पूर्ण करू शकत नाहीत. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी श्राद्ध केल्यास ते त्यांची गरज पूर्ण करू शकतात.

श्राद्ध करताना आत्मा तेथे उपस्थित राहून ते त्याच्या नातेवाईकांना आशिर्वाद देतात. पितृपक्षातील श्राद्धाचे जेवण केले जाते. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये फक्त घासाची भाजी बनवून पूर्वजांना देव मानून लोकांना एकत्र करत जेवण दिले जाते.

श्राद्धाचे प्रकार संपादन

 
पितृपक्षातील श्राद्धाचा स्वयंपाक/ श्राद्धाचे जेवण
  • अविधवा नवमी - भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात.या दिवशी अहेवपणी (नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे. गुजरातेत या नवमीला डोशी नवमी म्हणतात.
  • अष्टका श्राद्ध (वद्य अष्टमीला करावयाचे श्राद्ध)-कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेनंतरच्या अष्टमीला केले जाणारे श्राद्ध.
  • आत्मश्राद्ध-जिवंत असताना गया येथे जाऊन स्वतःच स्वतःचे केलेले श्राद्ध . हे संन्यासी लोकांना संन्यास दीक्षा देण्यापूर्वीही करून घेतले जाते.
  • एकोद्दिष्ट - केवळ एकाला म्हणजे दिवंगत व्यक्तीला उद्देशून केले जाणारे श्राद्ध.
  • कर्मांगश्राद्ध -गर्भाधान, पुंसवन संस्कार अशा प्रसंगी केले जाणारे श्राद्ध.
  • काम्य श्राद्ध - विशिष्ट फळाच्या इच्छेने केले जाणारे श्राद्ध.
  • गोष्ठीश्राद्ध-श्राद्ध विषयाची चर्चा ऐकून त्यापासून प्रेरणा घेऊन केले जाणारे श्राद्ध. विद्वान लोकांनी एकत्र येऊन, श्राद्धाची सामग्री एकत्र करून पाच जणांनी केलेले सामूहिक श्राद्ध
  • घृतश्राद्ध (यात्राश्राद्ध)-यात्राप्रसंगी करावयाचे श्राद्ध. यामध्ये ब्राह्मणाला काही प्रमाणात तुपाचे दान केले जाते.
  • चटश्राद्ध-श्राद्धासाठी ब्राह्मण न मिळाल्यास दर्भावर त्याचे आवाहन करून केलेले श्राद्ध.
  • तीर्थश्राद्ध -गया, प्रयाग, काशी, हरिद्वार इ.तीर्थक्षेत्रांत आणि पवित्र समजल्या गेलेल्या नद्यांच्या संगमस्थानी आपल्या पूर्वजांसाठी केलेले श्राद्ध.
  • दैविकश्राद्ध -देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाणारे श्राद्ध.
  • नवमिश्र श्राद्ध-मृत्यूनंतर ११ व्या दिवसापासून पुढे ६ महिन्यापर्यंत केले जाणारे श्राद्ध.
  • नवश्राद्ध - [[मृत्यू] नंतर १० अथवा ११ व्या दिवस केली जाणारी श्राद्धे.
  • नांदीश्राद्ध - पुत्रजन्म, विवाह, उपनयन अशा शुभ प्रसंगी जे वृद्धिश्राद्ध करतात ते नांदीश्राद्ध होय.
  • नित्य श्राद्ध - दररोज करावयाचे पंचमहायज्ञ दिवंगत पूर्वजांचे स्मरण.तसेच अमावास्या,अष्टका या दिवशी केले जाणारे श्राद्ध.
  • नैमित्तिक श्राद्ध - काही विशेष निमित्ताने केले जाणारे श्राद्ध. उदा, अक्षय्यतृतीया या दिवशी केले जाणारे श्राद्ध.
  • पार्वण श्राद्ध - पित्रादी त्रयीला उद्देशून केलेलं श्राद्ध.यात वडील, आजोबा, पणजोबा, किंवा आई, आजी, पणजी अशा तीन पिढ्यांना पिंडदान केले जाते.
  • पुराणश्राद्ध - एक वर्षानंतर करण्यात येणारी श्राद्धे.
  • पुष्टीश्राद्ध-शरीर स्वास्थ्य व धन वृद्धीसाठी केले जाणारे श्राद्ध.
  • भरणी श्राद्ध - चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करतात.
  • हिरण्य श्राद्ध - जेव्हा कर्ता (श्राद्ध करणारा) मृतातम्याला शिजवलेले अन्न देऊ शकत नाही तेव्हा त्याला हिरण्य श्राद्ध असे म्हणतात. अशा वेळी दूध, केळी, साखर, आणि दक्षिणा श्राद्ध करणाऱ्या ब्राम्हणाला दिली जाते.
  • महालयश्राद्ध-महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते म्हणून हा काल शुभ मानला जात नाही! महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण–पूजन पिंडरूपाने करतो. यामध्ये आपले दिवंगत आई-वडील, आजी, आजोबा, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही, विहीण व अन्य नातेवाईक अशा तीन पिढ्या या सर्वाना उद्देशून पिंडदान करतात. माणूस विविध गुरूंकडून आयुष्यभर काहीना काही शिकत असतो, आणि काही लोकांना शिकवत असतो. त्यामुळे असे निधन पावलेले गुरू आणि शिष्य त्यांचे या श्राद्धाच्या निमित्ताने स्मरण केले जाते. माणसाचे आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, त्याच्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, घरातील पाळीव प्राणी जर दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते.
  • मातामहश्राद्ध (दौहित्र)-आश्विन शुक्ल प्रतिपदेला आईच्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ नातवाने केलेले श्राद्ध.
  • शुद्धी श्राद्ध-एखाद्या पापापासून प्रायश्चित्त घेण्यासाठी ब्राह्मणभोजन करणे हे या श्राद्ध प्रकारात अंतर्भूत आहे.
  • सपिंडीकरण - दिवंगत व्यक्तीचा पिंड तिच्या आधीच्या तीन दिवंगत पितरांच्या पिंडाशी करणे.
  • सर्वपित्री अमावास्या - भाद्रपद अमावास्येला मातामह श्राद्ध (वडिलांच्या आईचे श्राद्ध) असतेच, पण या शिवाय, या दिवशी ज्यांचा मृत्युदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे. तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर ते या दिवशी करता येते.

[३]

सोळा मासिक श्राद्धे संपादन

(१) आद्य मासिक :- हे मृत्यूनंतर पहिल्या महिन्याच्या आरंभास म्हणजे मरण दिवशीं करावयाचे; परंतु त्या दिवशी सूतक असल्याने, सूतक फिटल्यावर तें करावें असे वचन आहे.

(२) ऊन मासिक :- पहिला महिना ज्या दिवशीं संपतो, त्या दिवसाच्या पूर्वींच्या तीन दिवसांत केव्हाही करतात.

(३) द्वितीय मासिक :- दुसऱ्या महिन्याचे आरंभी करतात.

(४) त्रैपक्षिक :- तीन पंधरवड्यांनी म्हणजे पंचेचाळीसावे दिवशी करतात.

(५) तृतीय मासिक,

(६) चतुर्थ मासिक,

(७) पंचम मासिक,

(८) षष्ठ मासिक - ही श्राद्धे ज्या त्या महिन्याचे आरंभास करतात.

(९) ऊनषाण्मासिक :- मृत्यूनंतरचा सहावा महिना ज्या दिवशी संपतो, त्या दिवसाच्या पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हाही करतात.

(१०) सप्तम मासिक,

(११) अष्टम मासिक,

(१२) नवम मासिक,

(१३) दशम मासिक,

(१४) एकादश मासिक,

(१५) द्वादश मासिक :- ही ज्या त्या महिन्याचे आरंभी करतात.

(१६) ऊनाब्दिक : - मृत्यूनंतर बारावा महिना ज्या दिवशी संपतो त्या दिवसाच्या पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हाही करतात. मृत्यूचा दिवस अधिक मासात येत असल्यास त्या महिन्याचे मासिक श्राद्ध दोनदा करतात.; म्हणजे एकंदर सतरा श्राद्धे होतात. ही सर्व मासिके खरोखर त्या त्या उक्त काळी केली पाहिजेत; परंतु बाराव्या दिवशीं सपिंडी करावयाची असल्यानेे, व सपिंडी करण्याचा अधिकार मासिक श्राद्धेे केल्यावाचून प्राप्त होत नसल्याने, ती अकराव्या किंवा बाराव्या दिवशी अपकर्ष करून (अलीकडे ओढून) करण्याची चाल आहे. वास्तविक पाहता सपिंडीकरणश्राद्ध हे सर्व मासिके झाल्यानंतर वर्षाच्या शेवटचे दिवशी अब्दपूरित श्राद्ध करून करणे, हा उत्तम पक्ष, असे वचन आहे. परंतु सपिंडी केल्याशिवाय चल, उपनयन, विवाह इत्यादी मंगलकार्ये करतां येत नसल्याने, सपिंडी श्राद्ध बाराव्या दिवशींच करण्याचा आता प्रघात पडला आहे या विषयी 'धर्मसिंधू' ग्रंथात ‘आनंत्यात्कुलधर्माणां पुंसां चैवायुषः क्षयात् । अस्थिरत्वाच्छरीरस्य द्वादशाहः प्रशस्यते ॥’ असें वचन आहे. म्हणजे, कुलधर्म अपार आहेत, व मनुष्याचें आयुष्य क्षणभंगुर आहे, तसेंच शरीर अशाश्वत आहे; यासाठी बारावा दिवस (सपिंडीस) योग्य आहे. या कारणास्तव सपिंडी अलीकडे घेतल्याने तत्पूर्वींची जीं मासिक श्राद्धे तीहि सपिंडीपूर्वी ओढावी लागली. तथापि सपिंडी झाल्यावर हीं सर्व मासिके तत्काळी पुन्हा करतात. याबद्दलचे विवेचन धर्मशास्त्राचा इतिहास (डॉ. पां.वा. काणे, १९८०) या गंथातील सपिंडी प्रकरणात केले आहे.

सोळा श्राद्धांस सोळा ब्राह्मण बोलावले जातात्. त्यांची श्मश्रू सकाळीं करवून त्यांना अभ्यंग स्नान घालतात. व दुपारीं एकोद्दिष्ट श्राद्धाप्रमाणें एक तंत्राने (एकदम) ही श्राद्धे करतात. असमर्थाने आमान्नाने करावींत.

तर्पण संपादन

पितरांना वंशजांकडून जशी पिंडदानाची व ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे त्यांना उदकाचीही अपेक्षा असते. पितरांना उद्देशून दिलेले हे उदक म्हणजे पितृतर्पण होय.[४]

श्राद्धासाठी भारतातील काही खास तीर्थ क्षेत्रे संपादन

  • गया (बिहार): हे फल्गु नदीच्या किनारी आहे. येथे श्राद्ध केल्यास परत कधीही करावे लागत नाही. या तीर्थाचे वर्णन रामायणातही आहे.
  • पादगया (आंध्रप्रदेश) : आंध्रप्रदेशातील पिठापुरम, जिल्हा पूर्व गोदावरी हे दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान असून येथे पादगया नावाचे एक तीर्थ आहे. या तिर्थस्थानी श्राद्ध तसेच पिंडदाना केल्या जाते
  • पिंडारक (गुजरात) : हे ठिकाण द्वारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. येथे एक सरोवर है, त्यामध्ये यात्रेकरू श्राद्ध करून पिंड सरोवरात टाकतात. जर पिंड तरंगले, तर ज्याचे श्राद्ध केले तो नक्की स्वर्गास गेला असे समजले जाते. या ठिकाणी श्रीवल्लभाचार्य महाप्रभूंची बैठक आहे. असे म्हणतात की येथे महर्षी दुर्वासांचा आश्रम होता. महाभारत युद्धानंतर पांडव सर्व तीर्थांमध्ये आपल्या मृत बांधवांचे श्राद्ध करायला आले होते, त्यांपौकी हे एक ठिकाण. भोपालका नावाच्या रेल्वे स्थानकवरून पिंडारकासाठी बसेस मिळतात.
  • प्रयाग (उत्तर प्रदेश) : ज्या व्यक्तीचे श्राद्ध येथे होते ती जन्म-मरणांच्या फेऱ्यांतून मुक्त होते.
  • ब्रह्मकपाल (उत्तराखंड) : हे स्थान बद्रीनाथच्या जवळ आहे. येथे श्राद्ध केल्यावर परत कोणतेही श्राद्ध करावयाची गरज नसते.
  • मेघंकर (महाराष्ट्र) : या तीर्थाला भगवान जनार्दनाचे स्वरूप मानले गेले आहे. ज्या व्यक्तीचे श्राद्ध येथे होते त्याचे सर्व पाप नष्ट होते, असे सांगितले जाते. हे गांव खामगांवपासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर आहे. या तीर्थाचे वर्णन ब्रह्मपुराण, पद्मपुराण आदी धर्मग्रंथांमध्ये आले आहे. हे ठिकाण पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे.
  • लक्ष्मणबाण (कर्नाटक) : पौराणिक समजुतीनुसार सीताहरणाच्या प्रसंगानंतर राम-लक्ष्मण माल्यवान पर्वतावर थांबले होते. तेथेच हे स्थान आहे. तिथले कुंड लक्ष्मणाने बाण मारून निर्माण केले होते. येथे श्रीरामाने आपल्या पित्याचे-दशरथाचे श्राद्ध केले होते. हे ठिकाण विजयनगर सामाज्याच्या प्राचीन राजधानी-हंपीच्या जवळ आहे. माल्यवान पर्वत हंपीपासून ६ किलोमीटरवर आहे.
  • लोहागढ (राजस्थान) : या स्थानाचे रक्षण स्वयं ब्रह्मदेव करतात, असे सांगितले जाते. येथे ज्या व्यक्तीचे श्राद्ध होते ती हमखास स्वर्गास जाते. पांडवांची शस्त्रे येथे गळून पडली होती, म्हणून या स्थानाला लोहार्गल नाव पटले. लोहागढ हा लोहार्गलचा अपभ्रंश. पश्चिम रेल्वेची एक लाईन राजस्थानातील सवाई माधोपुर से लोहारूपरयंत जाते. या लाईन पर सीकर किंवा या नवलगढ स्टेशन पासून लोहागढ जवळ आहे.
  • सिद्धनाथ (मध्य प्रदेश): हे स्थान उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या किनारी आहे. येथे दर महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला आणि पितृपक्षात दरदिवशी श्राद्ध करतात. असे म्हणतात की येथे श्राद्ध करणे फक्त सिद्ध योग्यांच्याच नशिबी असते.

यांशिवाय नाशिक, काशी आदी तीर्थक्षेत्रांतही नद्यांच्या काठी श्राद्धे केली जातात.

संदर्भ संपादन

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा
  2. ^ धर्मशास्त्राचा इतिहास (डाॅ. पां.वा. काणे, १९८०)
  3. ^ धर्मशास्त्राचा इतिहास (डॉ. पां.वा. काणे, १९८०)
  4. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा