शीतल साठे ( ५ मार्च १९८६) या एक मराठी लोककलाकार, गायिका, शाहीर, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या इ.स. २०००च्या सुमारास महाराष्ट्रातील कबीर कला मंच ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या. दलित, वंचित, शोषितांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून लोकांसमोर मांडत असतात. भांडवलदारांविरोधात त्या आवाज उठवतात.[१]

शीतल साठे
जन्म: ५ मार्च, १९८६ (1986-03-05) (वय: ३८)
कासेवाडी वस्ती, पुणे, महाराष्ट्र
चळवळ: आंबेडकरी चळवळ
संघटना: नवयान महाजलसा
पुरस्कार: Daya Pawar Smruti Puraskar
प्रभाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे लहुजी साळवे
वडील: हनुमंत साठे
आई: संध्या साठे
पती: सचिन माळी
अपत्ये: अभंग

शीतल आणि त्यांचे तरुण साथीदार विद्रोही शाहीर जलसा प्रकारची गीते गातात. त्यात बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची तसेच देशातल्या अनेक वंचित समाजाचे प्रश्न उद्धृत केले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, "देशात व जगात पसरलेली असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गीत गायन करतात."[२]

सुरुवातीचे जीवन व शिक्षण संपादन

पुणे शहरातील कासेवाडी नावाच्या एका दलित वस्तीत ५ मार्च १९८६ रोजी शीतल साठेंचा जन्म झाला. पुण्यातील कर्वे नगरच्या सिद्धीविनायक कॉलेजमधून त्यांनी समाजशास्त्रात एमए केले आहे. ९ मे २००५ रोजी त्यांचा विवाह सचिन माळी यांच्याशी झाला.[१]

गायन संपादन

शीतल साठेंनी आपले शिक्षण पुण्यातील कर्वे नगरच्या सिद्धीविनायक महाविद्यालयातून केले. परंतु महाविद्यालयात जाण्यापूर्वीच त्यांनी गायन सुरू केले होते. या दरम्यान सचिन माळी आणि कबीर कला मंचाच्या कलावंतांच्या संपर्कात आल्या. सुरुवातील त्यांना वैचारिक गोष्टींत आकर्षण नव्हते. शीतल साठे केवळ गायनाच्या जगातच काही करू इच्छित होत्या. सचिन माळी आणि कबीर कला मंचाच्या सहकार्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मोठे योगदान दिले."[२] गेल्या दहा वर्षांपासून शीतल साठे व सचिन माळी यांनी कबीर कला मंच ही संघटना सोडलेली असून त्यांनी नवयान महाजलसा ही स्वतंत्र संस्था स्थापन केलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जलसा स्टुडिओ व जलसा म्युझिक अकादमी सुरू केलेली आहे.

जयभीम कॉम्रेड संपादन

आनंद पटवर्धन यांनी तयार केलेल्या जयभीम कॉम्रेड या डॉक्युमेंट्रीमध्येही शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी या दोघांच्या कार्याचा गौरव केला आहे. या डॉक्युमेंट्रीमुळे शीतल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. या डॉक्युमेंट्रीला राज्य सरकारचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार मिळाले होते. पुरस्कारांच्या रकमेतून ‘कबीर कला मंच डिफेन्स कमेटी’ स्थापन केली गेली होती.[१][२]

अटक संपादन

मे २०११ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र एटीस ने शीतल साठे, सचिन माळी तसेच त्यांच्या कबीर कला मंचाच्या अन्य सहकाऱ्यांच्यावर नक्षलवादी असल्याचे व नक्षलवादाचे समर्थन करण्याचे आरोप ठेवत त्यांच्यावर तसे खटले दाखल केले. कबीर कला मंचाच्या इतर सहकाऱ्यांना भूमिगत व्हावे लागले होते.दोन वर्षे एटीएस त्यांच्या मागावर होते. अखेर २ एप्रिल २०१३ शीतल साठे व सचिन माळी दोघांनीही विधानभवन परिसरात आत्मसमर्पण-सत्याग्रह केला. दोघांनाही अटक करण्यात आली. तथापि, साठे व माळी यांनी त्यांच्यावरील आरोप मान्य करण्यास नाकारले. प्रकाश आंबेडकर   गिरीश कर्नाड, रत्ना पाठक, प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो यांचा दोघांनाही पाठिंबा होता.[१][२][३][४] शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेक्शन न्यायालयाने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतल साठेंना मानव आधारावर जामीन देण्यात आला.[५] ३ जानेवारी २०१७ साली सचिन माळी यांना सुप्रीम कोर्टाने जमीन मंजूर केला.

संदर्भ संपादन

  1. ^ a b c d "कलाकार की नक्षलवादी?". 24taas.com. 2 एप्रि, 2013. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c d माथुर, संजीव (23 डिसें, 2016). "शीतल के गीतों में है दलित संघर्ष की तपिश" – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "शीतल साठे, सचिन माळी नक्षलवादीच!". Loksatta. 2013-04-22. 2018-05-29 रोजी पाहिले.
  4. ^ "शीतल साठे आणि सचिन माळी पोलिसांना शरण". Loksatta. 2013-04-03. 2018-05-29 रोजी पाहिले.
  5. ^ "शीतल साठे यांना जामीन मंजूर". Loksatta. 2013-06-27. 2018-05-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन