रामा राघोबा राणे (२६ जून, १९१८:रत्‍नागिरी, महाराष्ट्र - ११ जुलै, १९९४:पुणे, महाराष्ट्र) भारतीय लष्करातील एक परमवीर चक्र प्राप्त अधिकारी होते.

कारकीर्द संपादन

राणे १० जुलै, १९४० रोजी ब्रिटिश भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनीयर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांची नाईक (कॉर्पोरल) पदी नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या तुकडीस म्यानमारमध्ये जपान्यांविरुद्ध लढण्यास पाठवली गेली. तेथील आराकान मोहीमेतून त्यांची डिव्हिजन माघार घेत असताना त्यांच्या सेनापतीने राणे व इतर काही सैनिकांना बुथिदौंग येथे मागे राहण्याचा हुकुम दिला. गावाजवळची मोक्याची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची कामगिरी त्याना दिली गेली. काम झाल्यावर रॉयल नेव्हीकडून त्यांची उचलबांगडी होणार होती. काम झाल्यावर आरमारी मदत आलीच नाही. राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शत्रूचा सुळसुळाट असलेली नदी पार करीत कूच केली व बाहरी येथे आपल्या गोटात येउन मिळाले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना हवालदार (सार्जंट)पदी बढती मिळाली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यायवर राणे यांची तैनात कोर ऑफ इंजियनियर्सच्या बॉम्बे सॅपर्स रेजिमेंटमध्ये झाली. तेथे त्यांना सेकंड लेफ्टनंटचे पद दिले गेले.

परमवीर चक्र संपादन

१९४८ च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने गमावलेले झंगर गाव भारतीय सैन्याने १८ मार्च, १९४८ रोजी परत मिळविले आणि तेथून राजौरी कडे कूच केली. ८ एप्रिल रोजी चौथ्या डोगरा बटालियनने बरवाली पुलासह राजौरी काबीज केले. तेथून पुढील प्रगती शत्रूने पेरून ठेवलेल्या सुरूंग आणि इतर अडथळ्यामुळे रोखली गेली. यावेळी राणेंच्या ३७वी एल्गार फील्ड कंपनीला रस्ता मोकळा करण्यास पुढे केले गेले. त्यांनी काम सुरू करताच [[पाकिस्तानी सैन्य|पाकिस्तान सैनिकांनी तोफांचा मारा सुरू केला. त्यात राणेंचे दोन सैनिक ठार झाले आणि स्वतः राण्यांसह इतर पाच सैनिक जखमी झाले. या स्थितीतही राणे यांनी उरलेल्या सैनिकांसह आपले काम सुरूच ठेवले आणि रणगाड्यांसाठी मार्ग मोकळा केला. पुढील बारा तासात जखमी अवस्थेत राणे व त्यांच्या सैनिकांनी रणगाड्यांसाठी वेगळा व सोपा रस्ता तयार केला. शत्रूच्या माऱ्यातच हे काम सुरू होते.

१० एप्रिल रोजी राणे यांनी पहाटे उठून पुन्हा रणांगणाची वाट धरली. मशीनगनचा मारा आणि सुरूंगांचे स्फोट होत असताना त्यांनी रणगाड्यांच्या वाटेत पडलेली पाच देवदाराची झाडे बाजूला केली. रणगाडे येथून पुढे गेल्यावर अजून एक अडथळा त्यांच्या समोर आला. शत्रू याभोवतालच्या टेकड्यांवर दबा धरून बसलेला होता व अडलेल्या रणगाड्यांवर मारा करीत होता. राणे स्वतः एका रणगाड्यात बसून पुढे गेले व भीषण गोळीबार होत असताना रणगाड्याची आस घेउन त्यांनी अडथळ्यास सुरूंग लावून फोडून काढले व चौथ्या डोगरा बटालियनची वाट मोकळी केली.

११ एप्रिल रोजी राणे पुन्हा एकदा युद्धभूमीवर पोचले आणि सतत सतरा तास काम करीत त्यांनी नौशेरा-राजौरी मार्ग बांधून काढण्याचे काम केले.

राणेंच्या या अथक परिश्रमामुळे राजौरी आणि चिंगासमधील असंख्य नागरिकांचे प्राण वाचले. या चढाईमध्ये भारतीय सैन्याने ५०० पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले आणि अधिक शेकडो जखमी केले.

त्यांच्या या अतुलनीय शौर्याला आणि शत्रूच्या माऱ्याखाली केलेल्या परिश्रमांबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला.

३१ जानेवारी २०२०ला बॉंबे सॅपर्सच्या स्थापनेला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, श्रीमती राजेश्वरी राणे यांनी हे परमवीर चक्र लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना सुपूर्द केले. हे पदक घरांत राहण्यापेक्षा लष्कराकडेच राहीले तर अधिकाऱ्यांना व जवानांना त्यातून प्रेरणा मिळत राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

युद्धानंतर संपादन

युद्धानंतर राणे लष्करात राहिले व २५ जून, १९५८ रोजी मेजरपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर १९५८ पासून ते ७ एप्रिल १९७१ पर्यंत राणे पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून सैन्यात कार्यरत होते.१९७१ मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती घेतली.

त्यांचे ११ एप्रिल १९९४ रोजी पुण्यातील सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले व एक मुलगी होते.

स्मृती संपादन

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले १५ तेलवाहू जहाजांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत. एम.टी. राम राघोबा राणे, पीव्हीसी हे जहाज ८ ऑगस्ट, १९८४पासून २५ वर्षे सेवेत होते.

कारवार येथे आयएनएस. चपळ युद्ध संग्रहालयाजवळ राणे यांचा पुतळा आहे.