मार्कंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूरपासून २१६ कि.मी. दूर असलेले एक गाव आहे. ते वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावाजवळ दक्षिणवाहिनी वैनगंगा वळसा घेउन उत्तरवाहिनी होते. या गावातील मंदिरांना विदर्भातील खजुराहो मानतात. ती मंदिरे चंद्रपूर -मूल -चामोर्शी रस्त्यावर आहेत. येथे नागपूर नागभीड या राज्य मार्ग क्र.९ ने ही मूल या गावापर्यंत जाउन मूल-चामोर्शी रस्त्याने मार्कंड्यास जाता येते. मूल ते मार्कंडा हे अंतर सुमारे २७ कि.मी.येते. ही जागा दुर्लक्षित आहे. या गावी सुमारे २३ मंदिरांचा समूह आहे. इ.स. १८७३ मध्ये कनिंगहॅम यांनी या मंदिरांकडे जगातील लोकांचे लक्ष वेधले. त्यांनी नोंदल्याप्रमाणे येथे २४ मंदिरे होती.सन १७७७ च्या सुमारास येथे वीज पडून देवळाचे बरेच नुकसान झाले अशी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंद आहे.[ संदर्भ हवा ] सन १९२४-१९२५ चे सुमारास आणखी काही मंदिरे कोसळली. सध्या तेथे दखल घेण्याजोगी १८ मंदिरे आहेत. यांत मार्कंडऋषी,(ज्यांचेवरून या गावास 'मार्कंडा' हे नाव पडले)मृकंडुऋषी, यम, शंकर आदि मंदिरे प्रमुख आहेत. या मंदिरांचा उभारणीकाळ ११ वे शतक वा त्यानंतरचा असावा असे चंद्रपूर येथील संशोधक गो.बं. देगलूरकर यांचे मत आहे.[ संदर्भ हवा ]येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात.

भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप महत्त्व आहे. पाण्याच्या ठिकाणी असणारी जीवन धारण करण्याची क्षमता भारतीय संस्कृतीने निर्विवादपणे मान्य केली आहे. म्हणूनच आपल्या पवित्र स्थानांना आपण 'तीर्थक्षेत्र' म्हणतो. नदी त्यातही उत्तर वाहिनी म्हणजे अत्यंत पवित्र मानली जाते. अशा उत्तरवाहिनी नद्यांच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झालेली दिसतात. मार्कंडा हे असेच एक तीर्थक्षेत्र आहे.

उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचे आणि खजुराहो मंदिराच्या तोडीस तोड असलेले मार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. संथपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे, बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत. मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती ९ फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण १८ देवळे आहेत. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो.

अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा, आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारतांना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. 'मैथुन शिल्पे' हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कलावंतांनी जीवनाचा सर्व अंगांनी केलेला विचार बघून आपण थक्क होतो. मार्कंडा मंदिरांना 'विदर्भाची काशी' म्हणतात ते उगाच नाही.

या मंदिरांची प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. पण त्यातही एके ठिकाणी असलेली एका युवतीची मूर्ती नितांत सुंदर म्हणावी अशी आहे. तिच्या हातात आंब्याची डहाळी आहे. बहुधा, ती 'आम्रपाली'चे द्योतक असावी. या मूर्तीवरचे अलंकार, वस्त्रे, सगळेच देखणे आहे. एवढेच नाही, तर आंब्याच्या डहाळीचे पान न् पान ठळकपणे जाणवते. आणि आपण आपोआपच या अनामिक शिल्पकारांपुढे नतमस्तक होतो.

मार्कंडाला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. पण एरवी ही मंदिरे वर्दळीपासून काहीशी दूर आहेत. १५० वर्षापूर्वी या मंदिरावर वीज कोसळली होती. त्यामुळे मंदिराचे खूप नुकसान झाले आहे. थोडी पडझड झाली आहे. पण या मंदिरांचे देखणेपण आजही टिकवून आहेत. हजारो वर्षापूर्वी बांधलेली ही मंदिरे भारतीय शिल्पकृतीचे देखणे उदाहरण आहे.