महार रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक महत्त्वाचे सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. १९४१ मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स 1941च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. या रेजिमेंट मध्ये मुख्यत्वेसगळ्या समाजाचे सैनिक असतात.

इतिहास संपादन

भारतीय सैन्याच्या महार रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.

महार रेजिमेंटचे विकास-टप्पे संपादन

प्राचीन हिंदू राजांच्या सैन्यात प्रसंगोपात्त क्षात्रकर्माला वंचित केलेल्यांना सैन्यात प्रवेश दिला जात असावा, असे राजनीतिप्रबंधा वरून दिसते. मात्र कोट-किल्ल्यांच्या घडणकार्यांत महारांनी बलिदान केल्याचे प्रचलित आहेत. उदा., सायनाक कुटुंब. तसेच कोट-किल्ल्यांच्या तटबंदीबाहेरील चौक्या सांभाळण्याचे कामही त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले आहे. या दृष्टीने सायनाक, भागनाक, रामनाक इ. नावे प्रसिद्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात महारांना भरती केले जात असे. महार किंवा त्यांच्यासारख्या जातींना मोठ्या प्रमाणावर सैन्यात भरती करण्याची परंपरा यूरोपीयांनी सुरू केली. १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी, कोरेगाव भिमा (जिल्हा पुणे, तहसील शिरुर) येथील दुसरा बाजीराव पेशवाईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील लढाईत महार सैनिकांनी लक्षणीय मर्दुमकी गाजविली. या लढाईत महार जातिसह मराठा, राजपूत अशा विविध जातींचे सैन्य सुद्धा होते. इंग्रजांनी तेथे उभ्या केलेल्या विजयस्मारक स्तंभावरील लेखात त्या वीर सैनिकांची नावे कोरली आहेत.

पुढे काठेवाड (१८२६), मुलतान (१८४६) व दुसऱ्या आंग्ल−अफगाण युद्धात (१८८०) कंदहार येथील लढायांत आणि वेढ्यांत महार जवानांनी तलवार गाजविली. मुंबईच्या वॉडबी मार्गावरील शिलालेखात तसे नमूद केले आहे. मेजर वॉडबी हा गोरा सैनिकांचा अधिकारी होता. १८५८ नंतर मुंबई सेनेत १८९२ सालापर्यंत १० ते ११ टक्के सैनिक मांग, रामोशी व ५ ते ६ टक्के इतर जातींचे भरती केले जात. ‘महाबळेश्वर समिती’ (१८९३)च्या शिफारसीप्रमाणे वरील टक्केवारीत भरीव बदल करण्यात आले. १९१७ साली महार जवानांच्याच दोन कंपन्या तैनात करण्यास ब्रिटिश सरकारने हुकूम काढला. जुलै १९१७ मध्ये महारांची १११ वी पलटण उभी झाली; परंतु १९२२ साली ही पलटण विघटित करण्यात आली. त्यानंतर १९२२ ते दुसरे जागतिक महायुद्ध सुरू होईपर्यंत महारांची लढाऊ सैनिकांची भरती होण्याचे थांबले; पण महार जातीच्या पुढाऱ्यांनी नेट धरल्याने प्रारंभी रुग्णसेवा पथकात त्यांची भरती सुरू झाली. सप्टेंबर १९४१ मध्ये भारत सरकारने बेळगाव (कर्नाटक) येथील मराठा रेजिमेंटच्या केंद्रात पहिली (ऑक्टोबर १९४१) व दुसरी (जून १९४२) अशा दोन महार पायदळ लढाऊ पलटणी खड्या केल्या. मराठा पलटणीतील अधिकारीवर्गच या नूतन महार पलटणीकडे देण्यात आला होता. युद्धाचा व्याप वाढल्याने तसेच महार जवानांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानेही त्यांच्या आणखी पलटणी उभ्या झाल्या. या पलटणींनी हिंदुस्थानचे सीमासंरक्षण केले. तसेच जपानी सैन्याविरुद्ध इंफाळ, आराकन (म्यानमार) येथील लढायांत उत्तम कामगिरी बजावली. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी वरील पायदळी पलटणींचे मध्यम पलटणीत रूपांतर करण्याचा निर्णय तत्कालीन सरसेनापती जनरल क्लॉड ऑकिन्लेक यांनी घेतला. तद्नुसार मद्रास रेजिमेंटच्या साहाय्याने इ.स. १९४७ पर्यंत तीन पलटणींच्या मशीनगन पलटणीत रूपांतराचे काम पूर्ण झाले. इ.स. १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या सीमासंरक्षणासाठी ‘पूर्व पंजाब सीमादल’ नावाच्या तीन पलटणी उभ्या करण्यात आल्या. त्यांमध्ये शीख, जाट व डोग्रा यांच्या एकोणीस जातींच्या जवानांची भरती झाली. मे १९५६ मध्ये जनरल शंकरराव थोरात यांच्या सूचनेप्रमाणे महार रेजिमेंटला महार मशीनगन रेजिमेंट (सीमा) असे नाव देण्यात आले. डिसेंबर १९५९ ते ३० एप्रिल १९७० या कालात रेजिमेंटमध्ये नऊ पलटणींची (७ ते १५ क्रमांकाच्या) भर पडली. जानेवारी १९६१ मध्ये छत्रीधारी मशीनगन कंपनी उभी झाली. सप्टेंबर १९६३ मध्ये मशीनगन पलटणी रद्दबातल करण्यात आल्याने महार (मशीनगन) रेजिमेंटचे पायदळ रेजिमेंटमध्ये रूपांतर झाले.[१]

महार रेजिमेंट-केंद्रे संपादन

या रेजिमेंटमध्ये भरती झालेल्या जवानांना सैनिक शिक्षण देण्यासाठी व रेजिमेंटच्या व्यवस्थापनासाठी [भरती, पगारहिशेब, वैयक्तिक सैनिकदप्तर (पर्सोनेल रेकार्ड)] प्रथम १९४२ मध्ये कामठी नागपूर, १९४६ अरणगाव अहमदनगर आणि १९४६ अखेर सागर मध्य प्रदेश येथे रेजिमेंट-केंद्रे स्थापण्यात आली. सागर येथे पलटणींच्या अधिकाऱ्यांच्या वार्षिक सभा भरतात. त्यांमध्ये सैनिक-कार्यक्रम, शिक्षणपद्धती, गणवेष, सैनिकी कल्याण इत्यादींवर चर्चा होते व त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे शिफारसी केल्या जातात. १९४७ साली तत्कालीन मुंबई प्रांत सरकारने या केंद्राल २५,००० रूपयांचे अनुदान दिले होते.[२]

कामगिरी संपादन

महार रेजिमेंट पहिल्या महायुद्धात सहभागी नव्हती. दुसऱ्या महायुद्धात पठाणी टोळ्यांच्या व इतरांच्या आक्रमणापासून हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीचे संरक्षणकार्य यांनी पार पाडले; इराकमध्ये अरब लुटारुंचा बीमोड केला. हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी सव्वा लक्ष मुसलमानांना होऊ घातलेल्या पाकिस्तानकडे त्यांनी पाकिस्तानात जाण्यास सोबत केली. क्वेट्टा शहरामध्ये मुसलमान दंगलखोरांचे पारिपत्य केले व बलुचिस्तानातील हिंदू, शीख आणि इतर मुसलमानेतरांना भारतात आणून सोडले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७-४८ च्या भारत पाकिस्तान युद्धातील जांगारे येथील भीषण लढाईत २४ डिसेंबर रोजी शेकडो पाकिस्तानी सैनिकांना व पठाणी घुसखोरांना त्यांनी ठार केले. या लढाईत महार रेजिमेंटची तुकडी गारद झाली. या तुकडीचे नेते हवालदार रावू कांबळे व नाईक बारकू कांबळे होते. नौशहर, उरी, चकोथी, टिटवाल, द्रास, कार्गिल येथील लढायांत महार पलटणींनी लक्षणीय कार्य केले.; १९५३ मध्ये कोरिया युद्धसमाप्तीनंतर युद्धबंद्यांच्या अदलाबदलीचे कार्य पार पाडण्यात साठी जनरल थोरातांच्या नेतृत्वाखाली तिसरी महार पलटणी तैनात होती. जून १९६० मध्ये बेल्जियन कॉंगो स्वतंत्र झाल्याबरोबरच तेथे यादवी युद्ध सुरू झाले. संयुक्त राष्ट्रसंघटनेने युद्ध थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटना सेना निर्माण केली. त्या सेनेत महार रेजिमेंटची एक कंपनी होती. कॉंगोच्या कटांगा प्रांतातील लढाईमध्ये निर्भयतेने व निःपक्षपातीपणे काम केल्याबद्दल कंपनीच्या एका अधिकाऱ्याला वीरचक्र हे सैनिकी पदक देण्यात आले.

गोवा मुक्तिसंग्रामामध्ये (१९६१) महार रेजिमेंटच्या छत्रीधारी कंपनीने भाग घेतला होता. १९६२ साली चिनी आक्रमणाला ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये महार पलटणींनीच चुशूल, दौलतबेगोल्डी (लडाख व अक्साई चीन) आणि कार्मेग विभाग (ईशान्य भारत) या ठिकाणी प्रतिकार केला. त्यासाठी हवालदार गोविंद कांबळे यांना वीरचक्र मिळाले. १९६५ च्या पाकिस्तान आक्रमणाच्या वेळी कच्छ रणातील सरदारचौकी व व्हिगोकोट येथील लढायांत महार रेजिमेंट लढली. त्याप्रसंगी हवालदार भिंगारदिवे यांना वीरचक्र मिळाले. सप्टेंबर १९६५ मध्ये काश्मीरातील संबा, जोरियान, खेमकरण, अस्सल उत्तर इ. लढायांत महार पलटणी शामिल होत्या. खेमकरणच्या लढाईत महार पलटणींनी भयंकर नुकसान सोसले.

१९७१ सालच्या पाकिस्तानी आक्रमणातही महार पलटणी बांगलादेश, पंजाब व काश्मीर येथील लढायांत सहभागी होत्या. हरहरकलान, पर्वतअली, कैयान, शेजरा, ठाणपीर आणि बांगला देशात शमशेरनगर, मौलवी बाझार, सिल्हेट, बेलोनिया व चट्टग्राम सह अनेक लढायांत या रेजिमेंटने शत्रूचा बीमोड केला.

निरनिराळ्या लढायांतील पराक्रमी वर्तणुकीबद्दल नाईक कृष्णा सोनावणे, कर्नल गुरूबक्षसिंग, नाईक अनसूयाप्रसाद (मरणोत्तर) यांना महावीर चक्र, बावीस जवान व अधिकाऱ्यांना वीरचक्र आणि मेजर जनरल व्यंकट कृष्णराव यांस परमविशिष्ट सेवापदक असे सैनिकी सन्मान मिळाले आहेत.

सैनिकी परंपरेप्रमाणे (१९४९ ते १९६१) रेजिमेंटचे पहिले कर्नल लेफ्टनंट-जनरल शंकरराव थोरात होते; तर दुसरे कर्नल लेफ्टनंट जनरल कृष्णराव हे होते.

स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर रेजिमेंटच्या बॅजमध्ये असलेला ‘कोरेगाव’ हा शब्द आणि ‘कोरेगाव विजयस्तंभ’ ही प्रतिमा प्रदर्शित करण्याचे बंद करण्यात येऊन त्या जागी ‘यश-सिद्धी’ हा कार्यवाचक शब्द व ‘खंजीर’ हे शौर्यदर्शक प्रतीक घालण्यात आले. ‘‘ऐसा देश कभी न देखा, कभी न सुना है। देशों का सरताज, यह भारत देश हैं’’।। हे धृपद असलेले गाणे रेजिमेंटचे संचलन-गीत आहे.तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गिरी यांच्या हस्ते रेजिमेंटला ३ फेब्रुवारी १९७० रोजी राष्ट्रपती ध्वज प्रदान करण्यात आला. ह्याच दिवशी पंधरावी पलटण सोडून इतर चौदा पलटणींना राष्ट्राध्यक्षांनी पलटण पताकाही प्रदान केल्या. पंधरावी पलटण या नंतर उभारलेली असल्यामुळे तिला पताका दिलेली नाही.[३]

पोशाख व ओळख संपादन

स्वातंत्र्याआधीची मर्दुमकी संपादन

विभाग संपादन

सन्मान व पदके संपादन

महार रेजिमेंट दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Commandant, Mahar Regimental Centre : Regimental History of the Mahar Regiment, Sagar, 1972
  2. ^ आत्रे, त्रिंबक नारायण, गांव-गाडा, मुंबई, १९५९.
  3. ^ http://www.marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10525
  4. ^ 8 महार रेजिमेंट. "Mahar Regiment {Indian Army}". 2020-06-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

भारतीय सैन्यातील १४ रेजिमेंट्स ज्या कोणत्याही शत्रूला सेकंदात लोळवू शकतात Archived 2017-05-11 at the Wayback Machine.