नथुराम गोडसे

महात्मा गांधींचा हत्यारा


नथुराम विनायक गोडसे (मे १९, इ.स. १९१०; बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - नोव्हेंबर १५, इ.स. १९४९) हा महात्मा गांधी चा मारेकरी होता. त्याने ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्ली येथे गांधीच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या.[१] गोडसे हा पुण्यातील हिंदुत्ववादी होता.[२] तसेच तो हिंदू महासभेचा सदस्य होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) माजी सदस्य होता.[३][४] १९४७ च्या भारताच्या फाळणीच्या वेळी गांधींनी ब्रिटिश भारतातील मुस्लिमांच्या राजकीय मागण्यांना अनुकूलता दर्शवली असे त्याचे मत होते.[५][६] त्याने नारायण आपटे आणि इतर सहा जणांसोबत हत्येचा कट रचला.

नथुराम विनायक गोडसे
जन्म १९ मे १९१० (1910-05-19)
बारामती, पुणे, ब्रिटिश भारत
मृत्यू १५ नोव्हेंबर, १९४९ (वय ३९)
अंबाला, पंजाब, भारत
मृत्यूचे कारण फाशी
राष्ट्रीयत्व भारतीय
ख्याती गांधी-हत्या
वडील विनायक वामनराव गोडसे
आई लक्ष्मी विनायक गोडसे

एक वर्षभर चाललेल्या खटल्यानंतर, गोडसेला ८ नोव्हेंबर १९४९ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. गांधींचे दोन पुत्र, मणिलाल गांधी आणि रामदास गांधी यांनी क्षमायाचना केल्या होत्या, परंतु त्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल आणि गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी यांनी फेटाळून लावल्या.[७] गोडसे याला 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.[८]

प्रारंभिक जीवन

नथुराम विनायक गोडसे याचा जन्म १९ मे १९१०ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे झाला होता. त्याचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती. त्याची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती. आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास त्याचे नाक टोचू.. त्यामुळे जरी जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे लोक मुलाला नथुराम म्हणू लागले. तेच नाव पुढे प्रसिद्ध झाले. नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता. त्याचे नाव गोपाळ गोडसे.

धार्मिक आणि अलौकिक आवडी

नथुराम गोडसे लहानपणी ध्यानावस्थेत जाऊन जे श्लोक म्हणत ते त्यांनी कधीच वाचले नव्हते, असे म्हणतात. या अवस्थेमध्ये ते आपले कुटुंब आणि कुलदेवता यांच्या दरम्यान माध्यमाचे काम करीत असेही सांगितले जाते. पण हे सगळे वयाच्या १६ व्या वर्षापासून संपून गेले . त्यांची रुची देशाच्या हित कार्यात लागण्यात समर्थ ठरेल असे त्यांना वाटून ते देशासाठी आणि फुटीर मुस्लिमांच्या विरोधी उभे राहिले.

शिक्षण

यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी यांनी हायस्कूलचे शिक्षण मध्येच सोडले. यानंतर कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता धार्मिक पुस्तकांत मन रमवले. त्यांनी रामायण, महाभारत, गीता, पुराण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास गांधी यांच्या साहित्याचा खोलवर अभ्यास केला होता .

राजकीय जीवन

आधी सुरुवातीला नथुराम गोडसे अखिल भारतीय काँग्रेस या पक्षामध्ये होते, नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शेवटी सन १९३०मध्ये ते अखिल भारतीय हिंदू महासभेत गेले. ते "अग्रणी " आणि "हिंदू राष्ट्र " या वर्तमानपत्रांचे संपादक होते. ते आपल्या वर्तमानपत्रांतून मोहंमद अली जिना यांच्या फुटीरतेच्या विचारांचा प्रखर विरोध करीत. सुरुवातीला यांनी मोहनदास करमचंद गांधी यांच्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला, पण पुढे गांधीची हिंदूंबरोबरची कथित भेदभावपूर्ण नीती आणि त्यांचे तथाकथित मुस्लिम तुष्टीकरण यांमुळे ते गांधीविरोधी झाले. त्याआधी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांच्या विरुद्ध संघर्षही केला होता.

हैदराबाद आंदोलन

१९४० मध्ये हैदराबादच्या शासक निझामाने राज्यात राहण्याऱ्या हिंदूंवर जिझिया कर लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा हिंदू महासभेने निषेध केला. त्या वेळेस, हिंदुमहासभेचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर यांच्या आदेशावरून हिंदू महासभेचा पहिला गट नथुराम गोडसे यांचा नेतृत्वाखाली हैदराबादला निझामाला विरोध करण्यासाठी गेला. निझामाने या सर्वांना बंदिस्त करून कठोर दंड दिला, मात्र त्यानंतर, निझामाला जिझिया कर लावण्याचा त्याचा निश्चय मागे घ्यावा लागला .

भारताची फाळणी

१९४७ मध्ये भारताची फाळणी झाली आणि त्या वेळेस झालेल्या धार्मिक दंगलींमुळे गोडसे अत्याधिक दुःखी झाले. या परिस्थितीसाठी त्यांना मोहनदास गांधी सर्वस्वी जवाबदार वाटले .

गांधी हत्येचा निर्णय

फाळणीचा वेळेस झालेल्या निर्णयानुसार भारताने पाकिस्तानला ७५ कोटी रुपये द्यायचे होते. त्यातले २० कोटी रुपये दिले गेले होते, आणि त्याच वेळेस पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. त्यामुळे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी उरलेले ५५ कोटी रुपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय घेतला. पण भारत सरकारचा या निर्णयाच्या विरोधात महात्मा गांधी उपोषणाला बसले. गांधींच्या या निर्णयामुळे कष्टी होऊन आणि चिडून नथुराम गोडसे आणि त्यांच्या काही साथीदारांनी गांधी हत्येचा कट रचला.

गांधी हत्येचा पहिला असफल प्रयत्न

गांधींच्या उपोषणामुळे क्षुब्ध झालेले नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांपैकी मदनलाल पाहवा याने गांधींच्या प्रार्थना सभेत जानेवारी १९४८ मधे बॉम्ब टाकला. त्या वेळेस झालेल्या गोंधळामध्ये गांधींवर पिस्तूल झाडण्याची योजना होती. पण पिस्तूल चालले नाही आणि अंती नथुराम गोडसे आणि बाकी मित्र पळून पुण्यास आले. मदनलाल पाहवाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नथुराम गोडसे गांधींना मारण्यासाठी परत दिल्लीत आले. तेथे पाकिस्तानातून आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांमध्ये फिरताना त्यांनी एकाकडून एक पिस्तूल विकत घेतले.

 
गांधी खून खटल्यातील संशयितांची छायाचित्र।
उभे असलेले : शंकर किस्तैया, गोपाळ गोडसे, मदनलाल पाहवा, दिगंबर बडगे
बसलेले: नारायण आपटे, वीर सावरकर, नथुराम विनायक गोडसे, विष्णू रामकृष्ण करकरे

३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे दिल्ली येथील बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधींच्या ४० मिनिटे आधी पोहचले. गांधी सभेसाठी जात असताना नथुराम यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहनदास करमचंद गांधी यांचा खून केला. गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.[९] खुनानंतर पळून जाण्याचा गोडसे यांनी अजिबात प्रयत्न केला नाही. कारण त्यांना गांधींना नाही तर त्यांच्या आक्षेपार्ह विचारांना मारल्याचे समाधान एकीकडे आणि आपल्या गुन्ह्याची कबुली एकीकडे होते.

गांधींच्या खुनाचा खटला

नथुराम गोडसेंवर मोहनदास गांधी यांचा हत्येचा खटला पंजाब उच्च न्यायालयात चालविण्यात आला. याव्यतिरिक्त त्यांच्यावर अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे अजून १७ आरोप ठेवून खटले चालविण्यात आले होते .

गांधीहत्येचे कारण

खून खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम गोडसेंचे ते निवेदन भारत सरकारने प्रतिबंध घालून प्रसिद्ध करण्यास मनाई केली होती. या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे यांनी ६० वर्षे न्यायालयीन लढाई केली. परिणामस्वरूप सर्वोच्च न्यायालयाने हा प्रतिबंध काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला परवानगी दिली .

न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५० कारणे सांगितली होती. त्यांतली फक्त थोडी - थोडकी कारणेच भारत सरकारने लोकांसमोर आणली त्यातील काही प्रमुख अशी --

  1. अमृतसरच्या सन १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली होती. मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला .
  2. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना दिलेल्या फाशीमुळे संतापलेली जनता गांधींकडे आशेनी बघत होती, की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .
  3. ६ मे १९४६ला समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनात संबोधित करताना गांधीने मुस्लिम लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचे आवाहन केले होते.
  4. महंमद अली जिना आणि इतर राष्ट्रवादी मुस्लिम यांच्या विरोधाला न जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण केरळमध्ये मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण केली, आणि जवळ जवळ १५०० हिंदू ठार मारले गेले आणि २००० हिंदूना बाटवून मुसलमान केले. गांधीनी याचा निषेध न करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो की बहादुरी असे केले.
  5. सन १९२६ मध्ये आर्यसमाजाच्या शुद्धीकरण आंदोलनाचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल रशीद नावाच्याएका मुसलमान युवकाने केली. यावर प्रतिक्रिया देताना गांधीनी, या अब्दुल रशीदला आपला भाऊ म्हटले, त्याचे कृत्य बरोबर आणि आर्य समाजाची शुद्धीकरण चळवळ ही राष्ट्रविरोधी आणि हिंदू मुसलमान एकतेसाठी घातक आहे असे जाहीर केले.
  6. गांधींनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरू गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट राष्ट्रभक्त म्हटले होते.
  7. गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर मुस्लिमबहुल आहे म्हणून शासन सोडून काशीला जाऊन प्रायश्चित करण्यास सांगितले, आणि या उलट हैदराबादच्या निझामाला हैदराबाद हिंदुबहुल असूनही समर्थन दिले होते.
  8. जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच दिली होती.
  9. काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१ मध्ये चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज तिरंगी केला गेला.
  10. काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन पट्टाभिसीतारामय्या यांना असल्यामुळे आणि सुभाष बाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला.
  11. लाहोर काँग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई पटेल हे बहुमताने निवडून आले असूनही केवळ गांधींच्या हट्टामुळे हे पद जवाहरलाल नेहरू यांना दिले गेले.
  12. १४-१५ जून १९४७ला दिल्लीमध्ये आझालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये भारताच्या फाळणीचा निर्णय अस्वीकृत होणार होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले. या आधी त्यांनीच म्हंटले होते की विभाजन हे माझ्या प्रेतावरच होईल.
  13. जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार हा प्रस्ताव पारित केला होता. पण गांधी हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसतानादेखील त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले, आणि त्याच वेळेस दिल्लीमधील मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने व्हावी यासाठी १३ जानेवारी १९४८ला उपोषण करून सरकारवर दबाव आणला.
  14. पाकिस्तानातून आलेले हिंदू निर्वासितांनी जेव्हा मशिदीत तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे, महिला, वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर राहण्यास भाग पाडले.
  15. ऑक्टोबर १९४७ला जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर अचानक हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न देण्याचा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध आहे हे दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून ही राशी भारताच्या हिताविरुद्ध पाकिस्तानला देण्यास सरकारला बाध्य केले.

मृत्युदंड

नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना १५ नोव्हेंबर १९४९ला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली. त्यांचे अंतिम शब्द असे होते, "जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो.[ संदर्भ हवा ]

पुस्तके

नथुराम गोडसे यांच्यावर मराठी-इंग्रजीत अनेक पुस्तके लिहिली गेली. हिंदी-गुजराथी भाषांत या पुस्तकांची भाषांतरे झाली आहेत. पुस्तकांची नावे :-

  • अखण्ड भारत के स्वप्नद्रष्ट - वीर नाथूराम गोडसे : भाग - एक, दो, तीन (लेखक विश्वजीतसिंह)
  • गांधी-वध क्यों?, (नथुराम गोडसे)
  • गांधी हत्या आणि मी (गोपाळ गोडसे)
  • जय मृत्युंजय (गोपाळ गोडसे)
  • Nathuram Godse - The Story of an Assassin : (लेखक - अनुप अशोक सरदेसाई) पुस्तकाचे प्रकाशन ३० जानेवारी, २०१६.
  • नथुरामायण (य.दि. फडके)
  • मी नथुराम गोडसे बोलतोय (दोन-अंकी नाटक, १९९७, लेखक प्रदीप दळवी). नाटकाचे दिग्दर्शन विनय आपटे यांचे असून गोडसेची भूमिका अनेकांनी केली, सतत १७ वर्षे या नाटकात काम करणारे शरद पोंक्षे हे त्यांपैकी एक होत. या नाटकाचे ८१७ प्रयोग झाले आहेत.
  • May It Please You Honour (गोपाळ गोडसे).
  • The Men Who Killed Gandhi (मनोहर माळगांवकर)
  • ५५ कोटींचे बळी (गोपाळ गोडसे)
  • Why I Assassinated Gandhi (गोपाळ गोडसे)
  • हाय-राम नथुराम (शरद पोंक्षे)

संदर्भ

  1. ^ "Frontline.in". www.frontline.in. 2022-01-10 रोजी पाहिले.
  2. ^ "Nathuram Godse". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-11-17.
  3. ^ Hansen, Thomas Blom (1999-03-23). The Saffron Wave: Democracy and Hindu Nationalism in Modern India (इंग्रजी भाषेत). Princeton University Press. ISBN 978-1-4008-2305-5.
  4. ^ Hansen 1999a, p. 249.
  5. ^ Markovits 2004, p. 57.
  6. ^ Markovits, Claude (2004). The UnGandhian Gandhi: The Life and Afterlife of the Mahatma (इंग्रजी भाषेत). Anthem Press. ISBN 978-1-84331-127-0.
  7. ^ Gandhi, Rajmohan (2008-03-10). Gandhi: The Man, His People, and the Empire (इंग्रजी भाषेत). University of California Press. ISBN 978-0-520-25570-8.
  8. ^ Bandyopadhyay, Sekhar (2009-06-03). Decolonization in South Asia: Meanings of Freedom in Post-independence West Bengal, 1947–52 (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 978-1-134-01824-6.
  9. ^ बरेटा पिस्तुले : गांधीहत्येसाठी वापरलेले एम १९३४. Loksatta (Marathi भाषेत). 12-03-2018 रोजी पाहिले. भारतीयांना बरेटा मॉडेल १९३४ पिस्तूल माहीत आहे, ते ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी वापरले म्हणून. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)