गौतमीपुत्र सातकर्णी

सातवाहन मराठा वंशातील 23 वे सम्राट

गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन (इ.स. 78 - इ.स. 130) हे सातवाहन वंशातील 23 वे सम्राट होते. सातवाहन हा महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश होता. सातवाहन राजवंशाने इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 असे 450 वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि आसपासच्या क्षेत्रावर राज्य केले. या 450 वर्षांच्या शासन काळात एकूण 30 राजांनी राज्य केले त्यापैकी गौतमीपुत्र सातकर्णी हे 23 वे सम्राट होते. गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या वडिलांचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री होते. आपल्या नावा आधी आईचे नाव लावणारे हे पहिलेच राजे झाले. गौतमीपुत्र सातकर्णी हे सातवाहन वंशातील सर्वात पराक्रमी सम्राट होते सातवाहन साम्राज्याच्या विस्तारात यांचा मोठा वाटा होता.

राज्यविस्तार संपादन

गौतमीपुत्र सातकर्णी यांनी नाशिक वर चाल करून तेथील क्षत्रपांचा पराभव केला. शक राजा नहपान या महाक्षत्रपाचाही पूर्ण पराभव केला. महाराष्ट्रातील शक, यवन यांचाही बिमोड केला. तसेच आपले राज्य उत्तरेस सौराष्ट्र, पश्चिमेस कोकण, पूर्वेस आंध्र आणि दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत (कर्नाटक) पसरविले.

कार्य संपादन

सातवाहन मराठा राजवंशाची राजधानी प्रतिष्ठानपुरी होती जिला आज पैठण म्हटले जाते व जीर्णनगर ही उपराजधानी होती जिला आज जुन्नर म्हटले जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना काही काळासाठी दक्षिणेत जावे लागले.

याच सातवाहन राजवंशातील गौतमीपुत्र सातकर्णी हे 23 वे सम्राट अतिशय पराक्रमी होते. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्यांचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाले त्यांनी या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले व या विजयाचे प्रतीक म्हणून राजधानी पैठणमध्ये एक विजयस्तंभ बांधला ज्याला तीर्थखांब म्हटले जाते. शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात केली जी आज अजूनही आपण वापरतो व याच शालीवाहन शकाच्या सुरुवातीचा सण म्हणजेच गुढीपाडवा ज्याला आजही साजरा करतो.

नाशिक जवळील लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णीचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. गौतमीपुत्र सातकर्णी हे वैदिक हिंदू धर्माचे पोषक होते एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.

समांतर लेखशीर्षक शककर्ता शालिवाहन लेखातील मजकूर विलीनीकरण/एकत्रीकरणासाठी स्थानांतरित संपादन

  • शककर्ता शालिवाहन या समांतर लेखातून स्थानांतरित मजकूर, सुयोग्य मजकूर ठेवून विलीन करण्यात आणि उर्वरित वगळण्यात साहाय्य करावे.

गौतमीपुत्र शातकर्णी (ऊर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८ - इ.स. १३०) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. [१]

गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्हव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.

अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने पश्चिम महाराष्ट्र सौराष्ट्र वर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.

आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. नहपान राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नहपानाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वाटत होता असे समजते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.

गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजरात आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. ७८ मध्ये ही कालगणना सुरू झाल्याने तिच्यात सांगितलेला वर्षगणनेचा(शालिवाहन शकाचा) आकडा ग्रेगरियन कॅलेंडरमधील सनाच्या अंकापेक्षा ७८ ने कमी असतो.

स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे "क्षहरातवंश-निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --

क्षत्रपांचा गर्व आणि अभिमान यांचा निःपात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुनःस्थापित करणारा....."

आख्यायिका संपादन

या राजाबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या काही आख्यायिकांची नोंद येथे केली आहे.

शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वतःला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे नक्की वजन करून कळवावे. ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी एक उपाय काढला. पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. हत्तीला नावेत चढवले आणि पाणी नावेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची नावेवर खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढले आणि नावेत बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेल इतकी माती भरली. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनाच्या आकड्यासकट परत पाठवला. त्याच्या ह्या बौद्धिक विजयाने त्याने सुरू केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात येण्यासाठी मान्यता पावला.

संदर्भ संपादन

  1. ^ इसवी सन १९४५ पर्यंत गौतमीपुत्र हा २३ वा राजा अशी कल्पना होती. पण त्या साली पहिल्या सातवाहन राजाची नाणी सापडली. तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची कुणाला कल्पनासुद्धा नव्हती. त्यामुळे तोच ह्या घराण्याचा मूळ पुरुष आणि आद्य राजकर्ता असला पाहिजे असे महामहोपाध्य वा.वि. मिराशी यांनी सिद्ध केले आणि ते अनेक विद्वानांनी मान्य केले.(पहा:संशोधन मुक्तावली, सर २ रा, पृष्ठ ६४ ).