गौडपाद

हिंदू वेदांती तत्त्वज्ञ

गौडपाद किंवा गौडपादाचार्य हे एक भारतीय तत्त्ववेत्ते होते[१]. गौडपादाचार्य हे वैदिक हिंदू धर्मामधील अद्वैत वेदांत संप्रदायातील तत्त्वज्ञानी होते‌[२]. ते मांडुक्य उपनिषदावरील कारिका रचण्यासाठी आणि अजातीवाद या तत्त्वज्ञानाची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आद्य शंकराचार्यांनी गौडपादाचार्यांना परमगुरू असे संबोधले आहे[२][३].

गौडपादाचार्य

चरित्र संपादन

गौडपादांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. गौड नावाच्या बंगालच्या प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाल्याने त्यांचे गौडपाद हे नाव पडले असे मानले जाते. बऱ्याच संशोधकांच्या मतानुसार गौडपाद हे ई.स. ५०० ते ८०० या कालखंडात होऊन गेले. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या र. दा. करमरकर यांच्या मते गौडपादांचा कालखंड ई.स. ५०० च्या आधीच असला पाहिजे.

अद्वैत संप्रदायातील एका श्लोकानुसार गौडपाद हे शुकदेवांचे शिष्य मानले जातात.

ॐ नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्रपराशरंच । व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं ॥

तत्त्वज्ञान संपादन

गौडपाद हे अद्वैत वेदांत संप्रदायाचे सर्वात पहिले लेखक मानले जातात. त्यांनी मांडुक्य उपनिषदावर कारिका रचल्या ज्यात चार अध्याय आणि २१५ श्लोक आहेत. या कारिकांमधून त्यांनी अजातीवाद हे तत्त्वज्ञान मांडले आणि द्वैतवादाचे खंडण केले.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Raju 1971, पान. 177.
  2. ^ a b Potter 1981, पान. 103.
  3. ^ Sarma 2007, पाने. 125-126.