ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला. शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.
== केतकर ज्ञानकोशातील माहिती==
त्यांचें मूळ नांव हंसाजी मोहिते असे असून इसवी सन १६७४ पावेतों हे छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैन्यांत पांच हजार फौजेवरील एक सरदार होते. परंतु त्या वर्षी विजापूरच्या सैन्यावर शिवाजी महाराजाचे मुख्य सेनापति प्रतापराव गुजर तुटून पडले असतां त्यांच्या प्राणास मुकून त्याची फौज फुटली. तेव्हां त्याने पाठलाग करणाऱ्या शत्रूच्या सैन्यावर हल्ला करून मोगलांचा पराभव केला म्हणून शिवाजीने त्यावर खूश होऊन यांस 'हंबीरराव' असा किताब दिला; व प्रतापरावाच्या जागीं यास सेनापति नेमलें. १६७५ सालीं हंबीररावानें बऱ्हाणपुरावरून थेट माहूरपर्यंत मोंगलांचा मुलूख लुटला, व भडोच जिल्ह्यातून खंडणी गोळा करून सर्व पैका रायगडास सुरक्षित आणला. पावसाळा संपल्यावर तो पुन्हां मोंगलांच्या मुलुखांत शिरला व त्याचें बरेंच नुकसान केलें. पुढच्या वर्षी यादगिरीजवळ हुसेनखान मायणाचा पराभव केला व पुष्कळ लूट मिळविली. इ.स . १६७८ मध्यें छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकांतून महाराष्ट्रांत परत आले तेव्हां त्यांनी हंबीररावास व्यंकोजीजवळ ठेविलें होतें. तेथें त्याची व व्यंकोजीची एक लढाई झाली होती. शिवाजी व व्यंकोजी यांच्यामध्ये तडजोड झाल्यावर हंबीरराव मोठ्या त्वरेनें महाराष्ट्रांत यावयास निघाला. मार्गात त्यानें कृष्णा व तुंगभद्रा यांच्या दुआबांत विजापूरच्या सैन्याचा पराभव केला, व सर्व दुआब प्रांत आक्रमण करून कित्येक बंडखोर देशमुखांस वठणीस आणलें (१६७८). इ. स. १६७९ त शिवाजीनें मोंगलांकडे पळून गेलेल्या संभाजीचा पाठलाग करण्याकरितां याची रवानगी केली. परन्तु संभाजी दिलेरखानाच्या छावणींत पोंचल्याचें कळल्यावर यास विजापुराकडे मोंगलाविरुद्ध आदिलशहाच्या कुमकेस पाठविलें. कांहीं दिवसांनीं हंबीररावानें मोंगल रणमस्तखान याला गाठून त्याचा पराभव केला. यानंतर हंबीरराव विजापुरास आला, व वेढा देऊन बसलेल्या दिलेरखानाच्या सैन्याभोंवतीं घिरट्या घालून त्यानें मोंगलांच्या सैन्यांत अन्नाची इतकी टंचाई पाडली कीं, पावसाळा संपल्याबरोबर दिलेरखाननें विजापूरचा वेढा उठविला (१६७९). पुढें बऱ्हाणपुरावर हल्ला करून (१६८०) कोल्हापुराजवळ सुलतान शहाअलम याचा हंबीररावानें पराभव केला (१६८०). इ. स. १६८४ मध्यें औरंगजेबानें आपली छावणी अहमदनगरास आणल्यामुळें खानदेश प्रांत मोकळा पडला आहे असें पाहून हंबीरराव अचानक बऱ्हाणपुरास गेला, व त्या शहरीं कित्येक दिवसपर्यंत खंडणी गोळा करून तो मिळविलेल्या खंडणीसह त्वरेनें परत आला. परत येत असतां वाटेंत त्यानें बऱ्हाणपूरपासून नाशिकपर्यंत मार्गांतील सर्व प्रांतात चौथ-सरदेशमुखी वसूल केली. इ. स. १६८७ मध्यें हंबीरराव व मोंगलांना सरदार सरझाखान यांची वाईजवळ लढाई होऊन त्या लढाईत मोंगलांचा पराभव झाला. परंतु या लढाईत हंबीरराव घायाळ होऊन मरण पावला. (जेधे शकावली, मराठा रियासत भा. १; ग्रँट डफ.) - केतकर ज्ञानकोशातील माहिती प्रा. डाॅ. बाळकृष्ण माळी इतिहास विभाग, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर.