ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला. शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.
== संभाजी पाठीशी खंबीर मामा हंबीर ==
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच संभाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते. हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.
संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचंड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानंतर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते. यानन्तर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर कल्याणजवळ रहुल्लाखान व बहाद्दुरखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले. या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानंतरच्या कालखण्डात खुद्द सम्भाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ केंजळगडच्या पायथ्याशी झाली. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतु किल्लेदार पिलाजी गोळे अन इतर मावळ्यांना (तंबूत नियोजन सुरू असताना) त्यांच्यावर जाणारा तोच तोफेचा गोळा स्वतःच्या अंगावर झेलून, लागून ते धारातीर्थी पडले.
या हंबीरराव मोहिते यांची समाधी कृष्णा नदीच्या काठावर कोठेतरी [[वाई]] तालुक्यात (जिल्हा सातारा) येथे आहे.