, प्रयोगशील आणि मराठी नाटक, साहित्याला नवी दिशा, अशा तिन्ही पातळींवर चपखल बसणारे नाटककार, लेखक म्हणून मकरंद साठे सर्वपरिचित आहेत.
गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर सातत्याने नवनिर्मिती करणाऱ्या पडद्यामागच्या रंगकमीर्चा अनेक पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. थिएटर अॅकॅडमीने ९०च्या दशकात आयोजिलेल्या एका कार्यशाळेत, 'चारशे कोटी विसरभोळे' या नाटकामुळे मकरंद साठे या नावाचा परिचय झाला. नाटकाच्या नावापासूनच काहीतरी वेगळा आशय मांडण्याचा प्रयत्न साठे यांनी केला. उमेदीच्या काळात प्रयोगशील निर्मिती करणारे अनेक नाटककार कालांतराने ठराविक चौकटीबाहेर पडण्यास धजावत नाहीत; पण बंदिस्त चौकटीत न अडकता प्रयोगशील निर्मितीचा ध्यास घेणाऱ्या काही मोजक्या नाटककारांमध्ये साठेंचा समावेश होतो. पहिल्या नाटकापासून सुरू झालेला प्रयोगशीलतेचा वसा त्यांनी पुढच्या नाटकांतही पुरेपूर जोपासला. 'रोमन साम्राज्याची पडझड', 'सापत्नेकराचे मूल', 'ऐसपैस सोईने बस', 'ठोंब्या', 'चौक, 'डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू गोळायुग डॉट कॉम' अशी त्यांची बरीच नाटके रंगभूमीवर गाजली. सॉक्रेटिसच्या जीवनावरील 'सूर्य पाहिलेला माणूस' या नाटकात प्रमुख भूमिका करणाऱ्या डॉ. श्रीराम लागू यांनीदेखील त्यांच्या लेखनाचे कौतुक केले होते. नाटक आणि एकांकिका या प्रकारांतून साठे यांनी कादंबरी लेखनाकडे आपला मोर्चा वळवला. 'अच्युत आठवले आणि आठवण' आणि 'ऑपरेशन यमू' या त्यांच्या दोन्ही कादंबऱ्याही वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. वेगळ्या वाटेने जाणाऱ्या त्यांच्या नाटकांचा अनुवाद इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड अशा भाषांतही झाला आहे. माणसाचे जगणे, त्यातील व्यथा-समस्यांची अचूक आणि क्वचितप्रसंगी तिरकस मांडणी, नाटकातील छोट्या-छोट्या प्रसंगांना तत्त्वचिंतनाची जोड यामुळे त्यांचे लेखन कायमच प्रभावी होत राहिले आहे. बेंगळुरूच्या 'इंडियन फाऊंडेशन फॉर द आर्ट्स' या संस्थेकडून त्यांना अभ्यासवृत्ती मिळाली होती. त्याचाच एक भाग म्हणून मराठी रंगभूमीचा त्रिखंडात्मक राजकीय, सामाजिक इतिहास त्यांनी 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' या पुस्तकातून मांडला आहे. लेखनात आश्वासक निर्मितीचा वसा जपणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गंगाधर गाडगीळ पुरस्कारामुळे श्याम मनोहर, रत्नाकर मतकरी, विलास सारंग, वसंत आबाजी डहाके, नामदेव ढसाळ अशांच्या पंगतीत बसण्याचे स्थान साठे यांना प्राप्त झाले आहे. मराठी रंगभूमी आणि मराठी साहित्यविश्वात त्यांच्या लेखनाची प्रयोगशील वाट यापुढेही अशीच कायम राहील.त्यांचं लेखन सर्वस्पर्शी आहे.