खूप जुनी गोष्टय. बंगाल प्रांतात एक तरुण व्यापारी रहायचा. व्यापारी एकदम सरळ साधा आणि शांत स्वभावाचा होता. परंतु त्याची आई मात्र अत्यंत दुष्ट स्वभावाची होती. व्यापारी तिला घाबरून असायचा. तिच्या स्वभावामुळे तिच्याशी कुणी फारसं बोलत नसे.
तरुण व्यापाऱ्याचे लग्न झाले. नवीन नवरी घरी आली. परंतु व्यापाऱ्याच्या आईने मात्र तिचा छळ चालवला होता. तिला ती सतत टाकून बोले. रागवे. तिच्या चुका काढत राही. व्यापाऱ्याची बायको स्वभावाने शांत असल्याने आणि व्यापा-याचे आईपुढे काहीच चालू न शकल्याने दोघेही शांत राहत आणि आज ना उद्या परिस्थिती बदलेल असा एकमेकांना दिलासा देत दिवस ढकलत होते.
थंडीचे दिवस होते आणि पौष पारबोह ची तयारी सुरु झाली. मकरसंक्रांतीच्या काळात हा सण साजरा करतात. या सणासाठी पीठा हा गोड पदार्थ बनवतात. व्यापाऱ्याची बायको स्वैपाक घरात होती. तंदूर पेटलेला होता. काम करताना तिची साडी हळदीने माखली होती. तिला खूप भूक लागलेली होती. पण सासूच्या भीतीने तिने काहीच खाल्लं नव्हतं. सासू नाही असा अंदाज घेत तिने पीठा खायला सुरवात केली. खाण्याच्या नादात तिला सासू आल्याचं समजलंच नाही.
सासू आल्याचं पाहताच तिने घाबरून जाऊन तंदूरमध्ये उडी घेतली. बिचारी त्यातच मरून गेली. मात्र देवी हे सर्व पाहत होती. तिने व्यापाऱ्याच्या बायकोला जीवनदान दिले. पण तिला मनुष्य जन्म न देता तिला पक्षी केलं. तिला बंगालीमध्ये ‘बेनेबौ’ असं म्हणतात. म्हणजेच ‘सोनेरी देहाची व्यापाऱ्याची बायको’. हिंदीत तिला ‘हल्दी पाखी’ असंही म्हणतात. संस्कृतमध्ये तिला ‘कालशीर्ष कांचन’ असं म्हणतात.