स्वतंत्र चळवळीत रायगड आणि ठाणे जिल्ह्यात ब्रिटिशांविरुद्ध लढा उभा राहिलेला आझाद दस्त्यामधील सक्रिय '''झिपरु चांगो गवळी''' यांच्या विरपत्नी आणि स्वतंत्रसैनिक आनंदीबाई झिपरु गवळी यांचे निधन झाले. स्वतंत्रसेनानी झिपरु गवळी यांच्या निधनानंतर मुलगा नसल्याने 26 वर्षे मुलीकडे राहणाऱ्या आनंदीबाई यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले.
देश पारतंत्र्यात असतांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध जो ,लढा उभा राहिला त्यात भाई कोतवाल, भाऊसाहेब राऊत यांनी उभ्या केलेल्या आझाद दस्त्यात कर्जत तालुक्यातील मानिवली गावचे योगदान मोठे होते. गोमाजी पाटील यांच्या बरोबरीने झिपरु गवळी यांनी ब्रिटिशांविरुद्ध सक्रिय होत असताना झिपरु गवळी यांच्या पत्नी चळवळीत सहभागी होण्यासाठी घराबाहेर गेलेल्यांना निरोप पोहचविणे,भाकरी भाजी बनवून त्या मुक्कामी असलेल्या ठिकाणी पोहचविण्याचे काम आनंदीबाई मानिवली गावात राहून करीत. ब्रिटिशांनी पुढे मानिवली गावातील स्वतंत्र चळवळीत सहभागी झालेल्यांच्या कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यात आनंदीबाई वाचल्या नाहीत, परंतु आपले पती देशाची सेवा करीत असल्याने आनंदीबाई यांनी झिपरु गवळी यांचा आणि आझाद दस्त्यातील अन्य सहकारी यांचे पत्ते सांगितले नाहीत.
केवळ एका अपत्याची माता असलेल्या आनंदीबाई या पतीच्या निधनानंतर आपल्या एकुलत्या एक लेकीच्या आग्रहावरून कोदिवले गावी राहायला गेल्या.26 वर्षांपूर्वी कोदिवले येथील लिलाबाई पुंडलिक तरे यांच्या घरी मुलीकडे राहायला गेलेल्या आनंदीबाई यांना आई सारखे प्रेम त्यांच्या जावयाने दिले. त्यामुळे वयाच्या अंतापर्यंत त्या मुलीकडे राहिल्या. मात्र आपले पती आणि आपण स्वतः पारतंत्र बघितले असल्याने कणखर बाण्याच्या आनंदीबाई यांनी देश स्वातंत्र झाल्यानंतर 60-65 वर्षात कधीही ऑगस्ट क्रांती दिनाचा आणि सिद्धगड बलिदान दिनाचा कार्यक्रम मानिवली येथील हुतात्मा स्मारकात होणारे कार्यक्रम चुकविले नाहीत. वर्षानुवर्षे त्या मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे बलिदान दिनाच्या कार्यक्रमाला न चुकता हजेरी लावणाऱ्या स्वतंत्रसैनिक आणि विरपत्नी आनंदीबाई झिपरु गवळी यांचे वयाच्या 97 व्या वर्षी वृद्धापकाळाने मुलीच्या घरी कोदिवले गावी निधन झाले.