'''मोरोपंत''' पूर्ण नाव: मोरेश्वर रामचंद्र पराडकर. (जन्म : [[पन्हाळगड]], इ.स. १७२९;मृत्यू- : [[बारामती]], १५ एप्रिल, १७९४-चैत्री पौर्णिमा) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी. [[पन्हाळगड]] इथे पराडकर कुळात मोरोपंतांचा जन्म झाला. पराडकर कुटुंब हे मूळचे [[कोकण]] येथील [[सौंदळ]] गावचे. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नौकरीच्या निमित्ताने [[कोकण|कोकणातून]] [[पन्हाळगड|पन्हाळगडावर]] येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते [[कोल्हापूर]]च्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. [[पन्हाळगड|पन्हाळगडावरील]] [[केशव पाध्ये]] व [[गणेश पाध्ये]] या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी [[न्याय]], [[व्याकरण]], [[धर्मशास्त्र]], [[वेदान्त]] व साहित्य यांचे अध्ययन केले. वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे [[पन्हाळगड|पन्हाळगडावर]] वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील इ.स. १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरुन [[बारामती]]स गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून [[बारामती]]स गेले व कायमचे [[बारामती]]कर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन [[बारामती]]स झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणार्या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार [[आर्या]], [[श्लोक]]बद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी [[ओवी]]बद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली..
[[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे]]कालीन सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. [[बारामती]]तील [[कर्हा नदी]]काठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत.