वाऱ्याने हलते रान (ललित लेखसंग्रह)

वाऱ्याने हलते रान हा प्रसिद्ध मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा पाचवा ललित लेखसंग्रह होय. इ. स. २००८ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

अर्पणपत्रिका संपादन

या संग्रहाच्या अर्पणपत्रिकेत "तुमचे तुम्हांलाच अर्पण करतोय" असे लेखकाने म्हटलेले आहे. तारखेची नोंद असणारी ग्रेस यांची ही पहिलीच अर्पणपत्रिका ठरते. या तारखेखालीही 'अस्तपर्वाच्या प्रारंभकाळी...' असे सूचक शब्द आहेत.

परिचय संपादन

या संग्रहात एकूण २५ ललित लेख समाविष्ट आहेत. "कला ही जीवनाची पुनर्निर्मिती आहे. थेट निर्मिती सदोष राहणारच, पुनर्निर्मिती सदोष राहणार नाही, तर तिचा कल अपर्यायी परिपूर्णतेकडे झुकणारा असेल...पूर्णाकृती पुनर्निर्माणाच्यासाठी, कलावंताला जीवनाची समग्र सामग्री, कृतज्ञतापूर्वक उचलूनही, जीवनाशीच कायमचे ताटातुटीने, हेतुपूर्ण क्रूर अनुसंधान जुळवावे लागते," असे निर्मिती आणि निर्मितिप्रक्रियेच्या संदर्भातील तत्त्व कवी ग्रेस यांनी या संग्रहात मांडले आहे, असे वीणा आलासे यांनी मलपृष्ठावर म्हटलेले आहे. "परमेश्वराने विश्वाची निर्मिती करताना काही चुका केलेल्या आहेत. त्या सुधारून पुनर्निर्मिती करणे हे कलावंताचे कार्य आहे, म्हणून कलावंताला चुका करण्याचा अधिकार नाही," अशी आपली काव्यभूमिका ग्रेस यांनी वेळोवेळी मांडली होती.