रमेश इंगळे उत्रादकर हे एक मराठी लेखक आहेत. वडील शिक्षक असल्यामुळे आणि घरात शिक्षणाचे वातावरण असल्यामुळे रमेश इंगळे उत्रादकरही याच पेशात आले. मात्र संधी असतानाही माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक वर्गांना न शिकवता, आवड म्हणून ते कित्येक वर्षं बुलढाण्याजवळ एका खेड्यातील शाळेत प्राथमिक शाळेतच शिकवत राहिले.

उत्रादकरांना साहित्याची आवडही लहानपणापासूनच होती. त्यातूनच शेगाव - बुलढाणा - जळगाव परिसरातील समवयस्क साहित्यप्रेमी मित्रांच्या संपर्कात ते आले आणि 'शब्दवेध' या प्रसिद्ध नियतकालिकाशी जोडले गेले. या नियतकालिकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा 'सर्वोत्कृष्ट नियतकालिका'चा पुरस्कार मिळाला, तेव्हा उत्रादकरच त्याचे संपादक होते.

त्यानंतर लवकरच उत्रादकरांनी स्वतःचे 'ऐवजी' हे साहित्याला वाहिलेले नवे नियतकालिक सुरू केले आणि अल्पावधीतच ते साहित्यप्रेमींमध्ये लोकप्रिय झाले.

मात्र रमेश इंगळे उत्रादकर 'निशाणी डावा अंगठा' या २००५साली प्रकाशित झालेल्या कादंबरीमुळेच नावारूपाला आले. या कादंबरीला महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराप्रमाणेच मॅजेस्टिक प्रकाशनाचा मानाचा जयवंत दळवी पुरस्कारही मिळाला. मात्र या कादंबरीतील मिश्किल भाषेमुळे सुरुवातीला या पुरस्काराच्या निवड समितीने या कादंबरीला 'विनोदी कादंबरी' म्हणून पुरस्कार दिला होता, मात्र तेव्हा तो उत्रादकरांनी नम्रपणे नाकारला होता; कारण ही कादंबरी विनोदी नाही, तर उपरोधिक आहे आणि विनोदनिर्मिती हा तिचा हेतू नाही, असे त्यांनी तेव्हा निवड समितीला कळवले. त्यामुळे त्यांचा त्यावर्षीचा जयवंत दळवी पुरस्कार हुकला. मात्र पुढच्या वर्षी, म्हणजे २००८ साली त्याच निवड समितीने तोच पुरस्कार उत्रादकरांच्या त्याच 'निशाणी डावा अंगठा'ला दिला आणि तोही 'सर्वोकृष्ट साहित्या'साठी.

रमेश इंगळे उत्रादकर यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • दाखलखारीज (कवितासंग्रह) (भ्रष्ट ‌शिक्षणव्यवस्थेच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या कवितांचा संग्रह).
  • निशाणी डावा अंगठा (कादंबरी) : या कादंबरीत प्रौढ साक्षरता अभियानादरम्यान आलेल्या अनुभवांचा मिश्किल वेध घेतला आहे.
  • सर्व प्रश्न अनिवार्य (कादंबरी) : ग्रामीण भागात परीक्षांमध्ये केली जाणारी कॉपी आणि त्यानिमित्तानेही चालणारे राजकारण हा उत्रादकर यांच्या या कादंबरीचा विषय आहे. उत्रादकरांच्या या दोन्ही कादंबऱ्या म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेवरील जळजळीत भाष्य आहे स्वतः प्राथमिक शाळेत शिक्षक असल्यामुळेच त्यांना एकूणच शिक्षणव्यवस्थेचं अंतर्गत रूप आकळून आले आहे आणि त्याचा त्यांनी आपल्या साहित्यलेखनात प्रभावीपणे वापर केला आहे.

पुरस्कार संपादन

  • ‘निशाणी डावा अंगठा’ला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार.
  • ‘निशाणी डावा अंगठा’ला मॅजेस्टिक प्रकाशनाचा मनाचा जयवंत दळवी स्मृती पुरस्कार.
  • ‘सर्व प्रश्न अनिवार्य' या कादंबरीसाठी मराठी साहित्यविश्वातील महत्त्वाचा 'विभावरी पाटील अनुष्टुभ’ पुरस्कार.
  • ‘निशाणी डावा अंगठा’या कादंबरीवर पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिगदर्शित केलेला त्याच नावाचा मराठी चित्रपट (२००९)