पेशवाईतील साडेतीन शहाणे

साडेतीन शहाणे

पेशवाईच्या काळातले तील साडेतीन शहाणे प्रसिद्ध आहेत. ते असे सखारामपंत बोकील ( - सन १७८१), देवाजीपंत चोरघडे ( - सन १७८१), विठ्ठल सुंदर ( - सन १७६३) हे पूर्ण शहाणे. हे नुसतेच मुत्सद्दी नव्हते तर योद्धेही होते. उरलेले अर्धे शहाणे म्हणजे नाना फडणीस ( - सन १८००). हे मुत्सद्दी होते, पण त्यांची युद्ध करण्यात गती नव्हती.

पेशवाईतच असणारा पण पेशवाईशी दुजेपणाने वागणारा पहिला पूर्ण शहाणा म्हणजे सखारामबापू बोकील, इतिहासात एकाने लिहिले आहे की 'सखारामबापूंनी बोलावले तरी त्यांच्या घरी जाऊ नये.' दुसऱ्याने लिहिले आहे की 'हा कालचक्रासही फिरवील'. तिसरा म्हणतो, ' हा पुरता लबाड, आणि त्याची दृष्टी धोकादायक आहे.'

दुसरा पूर्ण शहाणा म्हणजे पेशव्यांचे मांडलिक असलेल्या जानोजीराव भोसलेराजे नागपूरकरांच्या दरबारात असलेले, पण पेशवाईशी वितुष्ट घेणारे देवाजीपंत चोरघडे. पुरंजनरचित संस्कृत नाटकात सूत्रधाराच्या तोंडी 'देवाजी पुरुषोत्तमो गुणवतां वाणी रसास्वादवित् । तत्सभ्याः सदसदविवेकपटवः सर्वे गुणग्राहिण:॥' अशी देवाजीपंत चोरघड्यांच्या स्तुतिपर विधान आहे. यावर लगेच नटी सूत्रधाराला विचारते, 'आर्य ! क एष देवाजी पंडितो यस्य प्रशंसा सर्वत्र श्रूयते -कोण हा देवाजी?' सूत्रधार उत्तरतो, ' नागनगरनाथस्य भोसला वंश सिन्धुुसम्भवराजन्यचन्द्रस्य सचिवः' आणि ते सांगताना सूत्रधार देवाजीपंतांची इतर पुराणकालीन व ऐतिहासिक शहाण्यांशी तुलना करतो. तो पुढे म्हणतो, 'यदुवीरस्य उद्धव इव, रघुवीरस्य सुमन्त इव, सुनाशीरस्य बृहस्पतिरिव, अकबरसाहस्य बिरबल इव, साहसांकस्य अमर इव, (आणि) चंद्रगुप्तस्य चाणक्य इव' असा हा देवाजीपंत चोरघडे आहे.

पेशवाईचा शत्रू हैदराबादच्या नबाब याच्याकडे असणारा आणि त्यामुळे पेशवाईच्या विरुद्ध वागणारा तिसरा पूर्ण शहाणा म्हणजे विठ्ठल संदर. हा शहाणा तर होताच पण खऱ्या अर्थाने पूर्णपणे शस्त्रधारी योद्धा होता.

चौथे अर्धॆ शहाणे म्हणजे अर्थात नाना फडणीस.