प्रस्तावना :

निरोष्ठ रामायण हे मोरोपंतांनी रचलेल्या १०८ रामायणांपैकी एक रामायण आहे. या काव्यात प फ ब भ म या ओष्ठ्य व्यंजनांचा वापर केलेला नाही. म्हणून या रामायणाला निरोष्ठ रामायण म्हटले जाते.


रचनाकार :

या रामायणाची रचना मोरोपंत कवींनी केली आहे. मोरेश्वर रामचंद्र पराडकर[१] तथा मोरोपंत, मयूर पंडित (जन्म : पन्हाळगड इ.स. १७२९; - बारामती, चैत्र पौर्णिमा, १५ एप्रिल १७९४), हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते. ते मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित आणि श्रीधर यांचे समकालीन पंडित कवी होते. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, वृत्तबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली.


[२]अष्टोत्तरशत रामायणे :

श्रीरामचंद्र हे मोरोपंतांचे आराध्य दैवत होते. म्हणूनच त्यांनी रामकथेवर आधारित १०८ रामायणे रचण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला. आज या १०८ रामायणांपैकी केवळ ९० रामायणे उपलब्ध आहेत. मात्र या रचनांना एकत्रितपणे अष्टोत्तरशत रामायणे असेच संबोधले जाते.


निरोष्ठ रामायणाची रचना:

प फ ब भ म ही व्यंजने मराठी भाषेमध्ये ओष्ठ्य व्यंजने मानली जातात. या काव्यामध्ये या व्यंजनांचा वापर केलेला नाही. त्यामुळेच या रचनेला निरोष्ठ रामायण म्हटले जाते. म हे व्यंजन नसल्यामुळे राम याच शब्दाचा रामकथेवर आधारित असलेल्या या रचनेत वापर केलेला नाही. राम या शब्दाऐवजी दशरथनंदन, अजित अशा नावांचा वापर केला आहे. उदाहरणार्थ या रचनेतील पहिला श्लोक असा आहे-


श्रीहरि दशरथनंदन झाला दशकंठसंक्षय कराया ।

दर शेष चक्र ही जनि घेती जगदखिलसंकट हराया ।।


भाषिक वैशिष्ट्ये :

या काव्यामध्ये एकूण ६६ श्लोक असून पहिले ६५ श्लोक गीती वृत्तात रचलेले आहेत. तर शेवटचा अर्पणाचा श्लोक अनुष्टुप् छंदात रचलेला आहे.


संदर्भ संपादन

  1. ^ "मोरेश्वर रामचंद्र पराडकर".
  2. ^ कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ – खंड ८ –अष्टोत्तरशत रामायणे. रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर. सन १९१६. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)