दुसरी गोलमेज परिषद दिनांक ७ सप्टेंबर १९३१ रोजी सुरू झाली व ती १ डिसेंबर १९३१ला संपली. पहिल्या परिषदेला हजर असलेली सर्व मान्यवर मंडळी या परिषदेसाठी उपस्थित होती. तरीही काही नवीन मंडळीचा एक नवा गट उपस्थित झाला होता. या नव्या मंडळीमध्ये गांधीजीचा समावेश होता. काँग्रेस पक्षाने गांधीजींना सर्व अधिकार देऊन आपला प्रतिनिधी म्हणून पाठविले होते.

या परिषदेत संघराज्याची रचना व अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधीत्वाच्या प्रश्नावर विचार करण्याकरिता दोन स्वतंत्र समित्या स्थापन केल्या गेल्या. डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्याकरिता स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. मुस्लीमाकरीताच्या वेगळ्या मतदारसंघकरिता वायव्य सरहद्द प्रांत व बंगाल प्रांत वगळले गेले म्हणून बॅ. जिना कोणतीही तडजोड करण्यास तयार नव्हते. अंती असे ठरविले गेले कि जातीय प्रतिनिधीत्वाच्या बाबतीत अखेरचा निवाडा देण्याचे अधिकार ब्रिटिश पंतप्रधान सर रॅम्से मॅक्डोनॅल्ड्ना देऊन १ डिसेंबर १९३१ रोजी परिषद बरखास्त करण्यात आली.