खारफुटी

(तिवर या पानावरून पुनर्निर्देशित)

खारफुटी हा एक समुद्राजवळ वाढणारा, अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह आहे. [१][२]खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. हिची मुळे समुद्राच्या पाण्यातले मिठाचे प्रमाण सहन करू शकतात आणि लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप थांबवतात. खाऱ्या जमिनीतही जिची फूट होते ती खारफुटी.

पालावान, फिलिपिन्स येथील खारफुटींची वने

मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती असेही म्हणतात.[२] इंग्रजीत मॅंग्रोव्ह. तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे.[१] या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात. भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या गुजरात राज्याची किनारपट्टीची लांबी ही सर्वात जास्त आहे. त्या किनारपट्टीवर भारतामधील खारफुटीचे दुसऱ्या क्रमांकाचे जंगल आहे. जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण ७३ जाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये ४६ जाती आहेत. पश्चिम किनार पट्टीवर २७, तर पूर्व किनार पट्टीवर ४० जाती आहेत .अंदमान आणि निकोबार या बेटावर ३८ जाती आहेत.

उत्क्रांती आणि आढळ संपादन

खाऱ्या पाण्यात सर्वसाधारणपणे भरतीच्या पाण्याच्या पातळीपासून ते ओहोटीच्या पाण्याच्या पातळीदरम्यानच्या पट्ट्यात ही वनश्री आढळते.[२]सपुष्प वनस्पतींची उत्क्रांती होत असतानाच काही वनस्पती खाऱ्या पाण्यामध्ये जीवनक्रम पूर्ण करण्याचे गुणधर्म अंगीकारू शकल्या आणि अशा वनस्पतींनी हा समूह बनला आहे. [१] उष्ण कटिबंधातील समुद्रकिनाऱ्यावर सागरी लाटांचा प्रभाव असणाऱ्या दलदलयुक्त प्रदेशात आणि नद्यांच्या मुखप्रदेशात आढळणारे सदाहरित लहान वृक्ष किंवा झुडपे असे यांचे स्वरूप असते.[२]

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये खारफुटी वाढलेली दिसते.[२]अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील फ्लॉरिडा राज्याच्या दक्षिण भागापासून ते मध्य अमेरिकेच्या किनारी भागापर्यंत मुख्यत्वे तांबडी खारफुटी आढळते.[२] कॅलिफोर्नियाचा किनारा, पूर्व आफ्रिका व इंडोनेशिया यांच्या किनारी भागांत खारफुटी आढळते.[२]

उलटी मुळे संपादन

या झाडांच्या मुळांना सतत पाण्यात राहावे लागते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन कमी पडतो. परिणामी तिवरांची मुळे ही जमिनीतून वर, उलटी वाढतात. सर्वसाधारणपणे झाडाची मुळे खालच्या बाजूला वाढत असताना ही मुळे मात्र जमिनीतून वर येतात आणि मोकळ्या हवेत श्वास घेतात. तिवरांची लागवड करण्यासाठी तिवरांच्या बिया गोळा करण्याची गरज बऱ्याचदा नसते. हे झाड आपल्या लागवडीसाठी स्वतःच सोय करते. याच्या बिया जड व मोठ्या असतात. सतत दलदलीमध्ये, चिखलात किंवा समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात राहावे लागत असल्यामुळे जितके बी जड तितके ते भुसभुशीत जमिनीत घट्ट राहण्याची शक्यता अधिक. या बिया जमिनीवर पडून रुजतात, असे म्हणण्यापेक्षा त्यांची रुजण्याची प्रक्रिया झाडावरच सुरू होते, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. निसर्गाकडूनच जणू काही आपल्याला तिवराचे तयार रोपटे करून दिले जाते. हे रोपटे जमिनीवर पडल्याबरोबर रुजते आणि लगेच जमिनीची धूप थांबवण्याचे काम सुरू करते. याच्या मुळांना शाखांचे जाळे असते, त्यामुळे पटकन रुजायला मदत होते.

कुलातील प्रजाती व जाती संपादन

या समूहात वेगवेगळ्या कुलातील प्रजाती व जाती एकत्र आल्या आहेत. प्रत्येक प्रजातीचे गुणधर्म व रचना निरनिराळी आहे.[१] खारफुटीच्या चार जाती अमेरिका व आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रामुख्याने आढळतात. पूर्व आफ्रिका, आशिया व पश्चिम पॅसिफिक भागांत दहा जाती मिळतात. सुंदरबनातील खारफुटीत बारा कुलांतील सुमारे एकवीस जाती सापडतात.[२]

र्ऱ्हायझोफोरेसी किंवा कांदलकुल संपादन

या समूहात मुबलक आढळणारे कूल म्हणजे ऱ्हायझोफोरेसी किंवा कांदळकुल. या कुलातील ४ प्रजाती व त्यांच्या ८-१० जाती मॅन्ग्रोव्ह समूहात आढळतात. या झाडाची असंख्य मुळे निसरड्या दलदलीसारख्या जमिनीत वृक्षाला आधार देतात. त्या मुळांवरील अनेक छिदांतून वनस्पतींना ऑक्सिजन शोषून घेता येतो. बिया फळातच रुजून झाडावर असतानाच मुळांकुर ६ सें.मी. ते १.५ मीटरपर्यंत लांब वाढतात. या वनस्पतीची पाने चिवट व हिरवीगार असतात. निरंजन घाटे यांच्या माहितीनुसार ऱ्हायझोफोरेसी कुलातील ४ प्रजाती कोकणात सापडतात. परंतु या सर्व प्रकारची झाडे कांदळ म्हणूनच ओळखली जातात. या चारही प्रजातींना वेगवेगळी शास्त्रीय लॅटिन पारिभाषिक नावे आहेत. [१] Rhizophora mucronata ही एकच जात गुजरातमध्ये आढळते.

तिवर व्हबिर्नेसी संपादन

या समूहातील अजून एक प्रमुख वनस्पती म्हणजे तिवर व्हबिर्नेसी. अगर सागकुळात असणाऱ्या वनस्पतींपैकी तीन जाती कोकणात आढळतात. जनावरे १०-१५ मीटर उंच वाढणाऱ्या या वनस्पतींची कोवळी पाने खातात. [१] गुजरातमध्ये तिवर जातीमधील फक्त एकच प्रभावी जात avicennia marina आहे

लिघुअगर वा सोनेरेशिएसी कुल संपादन

समूहातील अजून एक प्रकारची उल्लेखनीय वनस्पती म्हणजे चिपाची झाडे. लिघुक्किंवा सोनेरेशिएसी कुलातील भारतात आढळणाऱ्या दोन जाती चिपाची झाडे म्हणून ओळखली जातात. तिवरप्रमाणेच या वृक्षाची मुळे जमिनीवर येतात पण तिवराच्या मुळांपेक्षा मोठी म्हणजे एक मीटर उंच असतात. या समूहातील काटेरी निळ्या फुलांचे लहान झुडुप हे ॲकॅयेन अगर निव गूर म्हणून ओळखले जाते. ज्या ठिकाणी पाणी कमी असून क्षारयुक्त व दूषित असेल अशा ठिकाणी याची वाढ होते[१]

लुमनित्झेरा combrataceae कुल संपादन

लुमनित्झरा ही वनस्पती भारतामध्ये एकूण दोन जाती आहे. त्या पैकी lumnitzera racemosa ही पश्चिम किनारपट्टीवर आढळणारी पांढऱ्या फुलांची वनस्पती आहे आणि दुसरी जात ही पूर्व किनारपट्टीवर आढळणारी वlumnitzhera littorea लाल रंगाची फुले असलेली वनस्पती आहे. ही वनस्पती भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आढळत नाही.

बाह्य रचना संपादन

खारफुटी क्वचित १२ मी.पेक्षा अधिक उंच वाढते. या वृक्षाच्या जाळीदार फांद्या फुलांच्या झुबक्यांनी बहरतात. पाने अंडाकृती व चिवट असतात. फुले लहान, चार पाकळ्यांची, पिवळ्या रंगाची व शंक्वाकृती असतात. फळे लालसर तपकिरी व २५ मिमी. लांबीची असतात. प्रत्येक फळात एकच बी असते. झाडावर लटकत असतानाच त्यांच्या बीजांना अंकुर फुटतात. अंकुर २५-३० सेंमी. लांब वाढतात. ते झाडावर भाल्यासारखे लोंबत राहून खाली पडतात. पाण्यावर तरंगत ते वाहत जातात. खाऱ्या व मऊ चिखलात रुतून त्यांच्यापासून नवीन झाडांची निर्मिती होते. या झाडाच्या खोडातून काही मुळ्या बाहेर वाढतात आणि पुन्हा जमिनीकडे वळून मातीत जातात. त्यामुळे ही नवीन वनस्पतींची निर्मिती होते. खारफुटीमधील अनेक वनस्पतींमध्ये जाड व मांसल पाने, टेकूप्रमाणे आधार देणारी मुळे आणि जमिनीतून बरीच वर वाढणारी काही श्वसनमुळे ही वैशिष्ट्ये आढळतात. एकदा तोडल्यावर पुन्हा जलद वाढण्याबद्दल ही झाडे प्रसिद्ध आहेत.
या वृक्षांची मुळे व फांद्या यांच्या जाळीदार अडथळ्यामुळे सागराकडून वाहत आलेला गाळ व लाकडे अडविली जातात. त्यामुळे तेथे घट्ट जमीनयुक्त नैसर्गिक बांध निर्माण होतात.[२]

उपयुक्तता संपादन

खारफुटीचे लाकूड चमकदार असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते. मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते. कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही. तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो. टॅनिनचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो.[१] [२] या समूहात एकच विषारी वनस्पती आढळते ती म्हणजे इक्झोकरीआ अगर गेवा. या वनस्पतीचा चीक जर डोळ्यात गेला तर डोळ्यांना अपाय होतो.[१]आग्नेय आशियात या लाकडाचा उपयोग बांधकामासाठी, लोणारी कोळसा तयार करण्यासाठी आणि सरपण म्हणून केला जातो.

खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र व जमीन तसेच खाडी, किनारा व त्यावरील प्रदेश यांत एक हिरवी भिंत निर्माण होते. त्यामुळे किनाऱ्याजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते. भूसंरक्षणाच्या दृष्टीने या वनस्पती अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे इतर वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण होते. जलचर प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, झिंगे वगैरे प्राणी येथे अंडी घालतात. पिले मोठी झाली की समुद्राकडे जातात. या वनस्पतीसमूहात झिंगे चांगले वाढतात. खारफुटीची वने असलेल्या सर्व ठिकाणी सागरी लाटांपासून संरक्षण मिळते.

सागरकिनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी खारफुटीची/तिवरांची जंगले खऱ्या अर्थाने तटरक्षकाची भूमिका चोख बजावतात.

तिवरांच्या संवर्धनाची गरज संपादन

 
पीचावरम येथील खारफुटी जंगल

तिवरांच्या जतनाची गरज केवळ जमिनीची धूप थांबवण्यासाठी नसून खचणारे समुद्रकिनारे आणि मासे वाचवण्यासाठीही आहे. किनारपट्टीपासून थोडे आत, पुळणीच्या किंवा खाडीच्या भागाकडे बऱ्याचदा कोणत्याना कोणत्या नदीचे मुख येऊन मिळालेले असते. या मुखापाशी माशांची पैदास चांगली होते. तसेच माशांना आवश्यक असणारे प्लॅंक्टनसारखे एकपेशीय जीवही इथे चांगल्या प्रकारे वाढतात. शिवाय विविध प्रकारचे कोळी, पक्षी, पाणकावळे, पाणबगळे, गरुड, साप यांची वाढही इथे चांगली होते. एकंदरीत संपूर्ण जीवसाखळी या भागात आकाराला येऊ शकते. त्यामुळे पुळणीचा किंवा खाडीचा भाग तिवरांनी समृद्ध असणे आवश्यक आहे. बॅक वॉटर, खाडी किंवा पुळण या भागात केवळ तिवरांच्या अस्तित्वामुळे किती जैवविविधता असू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालचा सुंदरबन प्रदेश.

तिवरांमुळे वादळांचा तडाखा सौम्य होऊ शकतो. हा अनुभव ओरिसा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारपट्टीवर येऊन थडकणाऱ्या वादळांच्या वेळी आलेला आहे.

ओरिसाच्या किनारपट्टीवर २९ ऑक्टोबर १९९९ रोजी ताशी २६० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाच्या वाऱ्याचे वादळ आले होते. या वादळाचा तडाखा ओरिसाच्या १० जिल्ह्यांना बसला होता. जिथे तिवरांची वाढ झाली होती, तिथे हा वेग बऱ्यापैकी रोखला गेला. इतर ठिकाणी तिवरे नसल्याने अधिक नुकसान झाले. तिवरांमुळे जीवसृष्टीही टिकून राहते. समशीतोष्ण हवामानात उत्पन्न होणाऱ्या सागरी माशांपैकी ९० टक्के माशांच्या जीवनसाखळीत तिवरांचा संबंध एकदा तरी येतोच. सुंदरबन भागातल्या सागरी मगरींचे तिवर किंवा खारफुटी हे मोठे आश्रयस्थान आहे. खारफुटीच्या जंगलात जन्माला आलेली सागरी मगर ८ मीटरपर्यंत वाढू शकते, अनेक परजीवी वनस्पती खारफुटीच्या आधाराने वाढतात. खारफुटी वाचविण्यासाठी सुंदरबन परिसरात १९९१पासून प्रयत्‍न सुरू आहेत.[२]

    गीर फाऊंडेशन गांधीनगर गुजरात

गीर फाऊंडेशन ही संस्था गुजरात मधील खारफुटी वनस्पतीवर काम करीत आहे.गुजरात मध्ये खारफुटी वनस्पती संवर्धनाची गरज आहे

भारतातील समुद्र किनाऱ्यावरील खारफुटीने व्यापलेला प्रदेश संपादन

राज्य चौरस कि.मी./ टक्केवारी :-.

  • पश्चिम बंगाल

२१२५/ ४३.६३.

  • गुजरात

१०३१/ २१.१७.

  • अंदमान, निकोबार

९६६/ १९.८३.

  • आंध्र प्रदेश

३९७/ ८.१५.

  • ओरिसा

२१५/ ४.४१.

  • महाराष्ट्र

१०८/ २.२२.

  • तमिळनाडू

२१/ ०.४३.

  • गोवा

५/ ०.१०.

  • कर्नाटक

३/ ०.०६.

  • एकूण

४८७१/ १००.००.

खाडीकिनारी असलेल्या खारफुटींची सर्रास कत्तल होत असून, खारफुटींचे जंगल उद्‌ध्वस्त करून झोपड्या उभारणाऱ्याच्या विरोधात मुंबई पालिकेचा महसूल विभाग मूग गिळून राहिल्याचे पाहावयास मिळत आहे. महसूल विभागाने आक्रमक होऊन कारवाई न केल्यास कळव्यातून जाताना डाव्या बाजूने जशी पक्की घरे उभी राहिली आहेत तशीच उजव्या बाजूलाही चाळींची दाटीवाटी पाहावयास मिळण्याची शक्‍यता आहे.

२६ जुलै २००५ला निर्माण झालेल्या मुंबईतील पूरस्थितीमध्ये खाडीकिनारी असलेल्या खारफुटीचे महत्त्व अधोरेखित झाले होते. खाडीकिनारी घुसलेल्या पाण्यामुळे अनेक संसार होत्याचे नव्हते झाले होते. ज्या ठिकाणी खारफुटी मोठ्या प्रमाणात होती त्या ठिकाणी पुराचा फटका बसला नव्हता. त्यानंतर केवळ खारफुटीचा बचाव नव्हे, तर खारफुटीचे संवर्धन करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. आता केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे खारफुटीला वन कायदा लागू आहे. वन कायद्याच्या धाकामुळे सध्या देशभरातील जंगल वाचलेले पाहावयास मिळत आहे; पण मुळात खारफुटीला वन कायदा लागू होऊनही त्याची कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. मध्यंतरी ठाणे महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर ठाणे परिसरातील खारफुटीचे क्षेत्र निश्‍चित करण्याची मागणी शासनाकडे केली होती. एक स्थानिक स्वराज्य संस्था याबाबतीत अशा प्रकारे पुढाकार घेत असताना थेट शासनाशी संबंध असलेला महसूल विभाग अथवा स्थानिक तहसीलदार हातावर हात धरून बसल्याचे पाहावयास मिळत आहे. महापालिकेकडून अनेक वेळा बोटींमधून खारफुटीची पाहणी करून कोठे कोठे खारफुटी विरळ होत आहे याचा अंदाज घेतला जात आहे; पण महसूल विभागाने केवळ रेती उत्खननमाफियांवर कारवाई करताना खारफुटींच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. कळवा परिसरात वेगाने होत असलेल्या खारफुटीच्या ऱ्हासाला महापालिकेबरोबरच महसूल विभागही तेवढाच जबाबदार असल्याचे दिसते आहे.

खारफुटीचे धार्मिक महत्त्व संपादन

सुंदरबनात ‘बनबिबी’ नावाची देवता खारफुटीच्या जंगलाची देवता समजली जाते व हिंदू-मुस्लिम तिला सारखेच पूजतात.

भारतात चेन्नईजवळ चिदंबरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’मूर्ती स्थापन केली आहे.[३] भाविक आजही तिला पूजतात.

ठाणे जिल्ह्यातील काही गावी खारफुटीचे संरक्षण करणारी एक गाव समिती असते, या समितीमार्फत मर्यादित प्रमाणात खारफुटीचे लाकूड गोळा करता येते. पण कोणीही जर मर्यादेपेक्षा जास्त लाकडे तोडली तर समिती निवाडा करून मर्यादाभंग करणाऱ्याला शिक्षा देते. शिक्षेनुसार त्या व्यक्तीला रात्रभर खारफुटीच्या झाडाला बांधून ठेवायची तरतूद आहे. इतकी कडक शिक्षा ठेवल्यामुळे कोणीही या वनस्पतीचा दुरुपयोग करीत नाही व या वनस्पतीचे संवर्धनही योग्य रीतीने होते.

गोव्यात खारफुटींना योग्य मान देऊन त्यांचे जतन करण्यासाठी ‘मांगे थापणी’ नावाची पूजा पौष अमावस्येला करतात व मगरीची मातीची मूर्ती करून तिची पूजा केली जाते.

खारफुटीचे उपयोग संपादन

किनारपट्टींचे रक्षण हे खारफुटीचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. भारताच्या किनारपट्टीची लांबी ७,५१७ किलोमीटर आहे. एवढय़ा विस्तृत किनारपट्टीचे संरक्षण होण्यासाठी एका सक्षम यंत्रणेची गरज असते. खारफुटी ही यातील एक महत्त्वाची यंत्रणा आहे. खारफुटी म्हणजे जणू काही या किनारपट्टीची त्वचा असते व त्वचा जशी आपल्या शरीराची काळजी घेते, तसेच खारफुटी किनारपट्टीचे संरक्षण समुद्राच्या लाटा, वादळे, वारा यांपासून करत असतात. पण येथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे खारफुटी फक्त संरक्षित किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी आढळतात. खुल्या समुद्रासमोरील वाळूच्या व खडकाळ किनाऱ्यावर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही.

जैविक महत्त्वाबरोबरच खारफुटीपासून इतरही अनेक फायदे होतात. खारफुटीच्या काही जातींचे लाकूड हे सागवानासारखे मजबूत असून ते इमारत, फर्निचर तसेच जहाजबांधणीसाठी वापरता येते. निपा नावाचे पाम जातीचे झाड असते, त्यापासून साखर निर्माण करतात. चिपी जातीच्या झाडांच्या फळांपासून श्रीलंकेत खाद्यपेये बनवतात. खारफुटीच्या विविध जातींपासून पारंपरिक औषधे तयार होतात. तर मेस्वाल या वनस्पतीपासून साबणापासून टूथपेस्टपर्यंत विविध वस्तू तयार होतात. Acanthus ilicifolius ही वनस्पींपासून अस्थमा, संधीवात आणि त्वचा विकार हा बरा होतो. तिवर या वनस्पतीचा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग केला जातो.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भयादी संपादन

  1. ^ a b c d e f g h i निरंजन घाटे (सागर विज्ञान). "खारफुटी समूहाचे स्वरूप". "खारफुटी समूहाचे स्वरूप" हा निरंजन_घाटे यांचा लेख दिनांक २० सप्टेंबर २०१३ भाप्रवे दुपारी ३ वाजता रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c d e f g h i j k वसंत_चौधरी. "खारफुटी (Mangrove)". "खारफुटी (Mangrove)" हा वसंत_चौधरी यांचा लेख दिनांक २० सप्टेंबर २०१३ भाप्रवे दुपारी ३ वाजता रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ विवेक कुलकर्णी (४ जून २०१७). "खारफुटीची जंगले". लोकसत्ता. ६ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.