जोडवी हा हिंदू स्त्रियांचा सौभाग्य अंलकार आहे. काही अलंकार केवळ सुवासिनीनीच वापराचे असतात. त्यांना सोभाग्याअलंकार असे नाव आहे. यामध्ये जोडवे हे सुद्धा लग्नामध्ये सौभाग्यअंलकार म्हणून घातले जाते.[१]स्त्रियांच्या पायाच्या मधल्या बोटात घालण्याचे ते एक चांदीचे आभूषण आहे. पायाच्या अंगठ्यानंतरच्या बोटामध्ये कधी जोडव्यांची जोडी घातली जाते. त्यांतील लहान जोडव्याला खटवे असे म्हणतात. फक्त विवाहित स्त्रियांनीच जोडवी घालावी असा संकेत रूढ असल्याने कुमारिका जोडवी घालीत नाहीत. जोडवी ही चांदीची असतात. पायाला सोने लावायला अनुज्ञा नसल्याने जोडवी, पायात घालायच्या साखळ्या, नूपुरे ही कधीच सोन्याची नसतात. पण अलीकडील काळात काही स्त्रिया हौसेने अशी आभूषणे वापरतानाही अनुभवाला येते. जोडवे हे भारामध्ये मोजले जाते. जास्तीत जास्त दहा भारामध्ये असतात. हे पायाच्या मधल्या बोटात घालण्याचे चांदीचे वळेच असते. स्त्रियांच्या पायाच्या बोटांवर पहिला अलंकार चढतो तो जोडवे. पायाच्या मधल्या बोटावर विवाहप्रसंगी वधू जेव्हा गौरीहर पूजते तेव्हा जोडवी घातली जातात आणि ती आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे. आता वेगवेगळ्या नक्षी प्रकारात जोडवी आहेत. पूर्वी फक्त एका वेढ्याचे जोडवे असे, पण आता दोन किंवा चार पाच वेढे असलेली जोडवीही वापरतात.[२]

भारतीय अंलकार-जोडवी

पायांत जोडवी व तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात आणि ताप येणे, चक्कर येणे या बाधा होत नाहीत, असे मानले जाते.[३]. लहान मुलींच्या पायाच्या बोटात कसलाही दागिना घालण्याची पद्धत नाही.

संदर्भ संपादन

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  2. ^ "सोने आणि दागिने विशेषांक : स्त्रियांचे दुर्मीळ अलंकार". लोकसत्ता. 2014-10-03. 2018-03-20 रोजी पाहिले.
  3. ^ "दागिने आणि आरोग्य". http://bookstruck.in. 2018-03-28 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)[permanent dead link]