आत्मप्रौढी असलेले जाहिरातवजा लेखन. जमल्यास कुणीतरी या लेखाचे विकिकरण करावे, नाहीतर लेख काढून टाकावा.... (चर्चा) २३:२७, ३ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

लेख - राम जोशी ( कोल्हापूर ) संपादन

. #स्वरलयीचा_गुलमोहर

                                      -राम जोशी
    सुधाकर कदम म्हणजे सांगीतानंदात रममाण झालेले व्यक्तिमत्व. त्यांनी आर्णी येथील संगीताच्या प्रांगणात लावलेल्या संगीत विद्यालयास पंचवीस वर्षे एवढा दिर्घ कालावधी लोटला. म्हणजेच हे (१९९९) रौप्य महोत्सवी वर्ष.त्यानिमित्त त्यांचा गौरव व विविध कार्यक्रम केले जात आहेत ही गोष्ट आनंददायी आहे.
    संगीताच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा हा गौरव करणे समाजपुरुषाचे कर्तव्य आहे.यानिमित्त त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचे सिंहावलोकन होत असते, त्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते,मार्गदर्शन  होत असते.
    मी कोल्हापूरसारख्या,विदर्भापासून खूप दूर असलेल्या गावी राहणारा. पण त्यांची भेट सहवास काही काळापूरताच लाभला.पण तेवढ्या थोडक्या सहवासांनी आम्ही मनोमन एकत्र आलो व दोघात निखळ मैत्री निर्माण झाली.त्याचे असे झाले,१९८२ मध्ये कविश्रेष्ठ सुरेश भटांच्या कविता गझल सादर करण्यासाठी कदमांनी महाराष्ट्र पादाक्रांत केला.त्यावेळी त्यांचा कार्यक्रम कोल्हापूरला रसिकांच्या उपस्थितीत झाला.मला निमंत्रण होते,कार्यक्रम चांगला झाला,मी चांगलाच प्रभावित झालो.
     सुरेश भटांच्या गझलांची नवलाई,अनुरूप स्वररचना व खास पद्धतीची पेशकस. तशात तबल्याच्या साथीला हैदराबादच्या उस्ताद शेख दाऊद खान यांचे शिष्य शेखर सरोदे तर सारंगीवर उस्ताद लतीफ अहमद खान साहेब.असा हा सांगीतिक योग्य जुळून आला.पुढे पुढे जाऊन ओळख करून घेणे हा माझा स्वभाव नसल्यामुळे भेट घेतली नाही.पण हा कलाकार आणि त्यांनी गायिलेल्या गझला मात्र मनात कायमच्या घर करून राहिल्या.'सूर्य केव्हच अंधाराला यार हो,या नवा सूर्य आणू चला यार हो' हे हृदयाला भिडणारे विद्रोही काव्य,'चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही',ही हळुवार मलमली गझल यांच्या प्रेमातच पडलो.या कलाकाराची प्रत्यक्ष भेट व्हावी असे मनोमनी वाटायचे आणि तो योग जुळून आला.सुमारे एक तपानंतर शिवाजी विद्यापीठ संगीत विभागात मी मानद अध्यापक म्हणून काम करीत होतो.तेव्हा (१९८८) सुगम संगीतासाठी कदमांची चार दिवसांनी कार्यशाळा ठेवली होती.त्या चार दिवसांच्या छोट्या कालावधीत आम्ही एकत्र आलो.खूप गाणी बजावणी झाली व बऱ्याच दिवसांची मनातली इच्छा पूर्ण झाली.स्नेहाचे भावबंध निर्माण झाले.कदमांनी या वेळी घरगुती कार्यक्रमात अनेक गीते व गझला मनसोक्त ऐकविल्या.त्यांच्या स्वररचना वैशिष्ठयपूर्ण व आकर्षक असल्याने त्याबाबत लिहावे असे सारखे मनात यायचे. तो योग त्यांनी स्थापन केलेल्या संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आला हा माझ्या दृष्टीने सुयोग आहे.भाग्ययोग आहे.
     सुधाकर कदम हे व्यक्तिमत्व बहुरंगी आहे.ते शास्त्रीय संगीत गायक आहेत.संगीत शिक्षक आहेत.समाजकर्ते आहेत.लेखणीबहाद्दरही आहेत.पण त्यांचा माझा जो संबंध आला तो सुगम संगीत स्वररचनाकार व गायक म्हणून.त्यामुळे तद्विषयक त्यांच्या रसिल्या सांगीतिक व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न.
     सुगम संगीत हा संगीताचा एक अनुपम व मनोहारी प्रकार.नाव जरी सुगम असले तरी जाता जाता सहजी आत्मसात करावे इतके ते खचितच सुगम नसते.उलट दुर्गमच असते.शब्दप्रधान गायकीच्या ह्या प्रकाराला शब्द हे प्राणतत्व तर स्वर हे माध्यम.पहिला मान काव्याचा.(पर्यायाने कविचाही.) त्यातल्या आशय, भाव-भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे हे कार्य संगीताचे असते.गीताच्या आशयाची अभिव्यक्ती संगीतातून होणे अपेक्षित असते. किंबहुना काव्य बोलते करणे हे संगीतकाराने काम.यासाठी सुगम संगीतात काव्याचा आशय,विषय व भावना याची उत्तम जाण स्वररचनाकाराला असणे जसे आवश्यक, तितकेच महत्व काव्यानुकूल संगीत रचनेला;म्हणजे चाल लावण्याचा असते.सुधाकर कदम हा काव्याची उत्तम जाण असणारा संगीतकार असल्याने ते कवितेला अत्यंत पोषक व समर्पक असा स्वरसाज चढवून प्रत्येक कविता आपल्या संगीतरचनेने श्रीमंत करतात.स्वतः कवी असल्यामुळे 'जे न देखे कवी ते देखे रवी' या उक्तीला साजेसे स्वरचातुर्य त्यांच्याकडे आहे.
    शास्त्रीय संगीताचे व्यासंगी साधक असल्यामुळे कदमांच्या स्वररचनेचा पाया हा राग/रागिणीवर आधारित असणे स्वाभाविक आहे.त्यामुळेच त्यांच्या स्वररचना भारदस्त व दर्जेदार वाटतात.त्या चीप पॉप्युलॅरिटीच्या कॅटॅगिरीतल्या नव्हेत.स्वररचनेसाठी त्यांनी अनेक राग/रागिण्यांची मुक्तहस्त चंदनी बरसात केली आहे.शेकडो कवितांना स्वरांच्या चांदण्यात न्हाऊ घातले आहे.तथापि जागेच्या मर्यादेचे भान ठेवण्यासाठी काही निवडक गाणी व स्वररचनांचा आस्वाद घेणे रास्त ठरेल.
    यमन हा रागच असा की,कोणाही संगीतकाराने त्याच्या प्रेमात पडावे.कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत.प्रत्येक मूर्ती स्वतंत्र आहे.प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे,रंग आहे,रूप आहे,व्यक्तिमत्व आहे.
     कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात.
              सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी
               गातो गझल मराठी प्रिये तुझ्याचसाठी...
     दादऱ्यातल्या या बंदीशीची यमनमधील ही रचना.अगदी साधी.सुगम संगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथे अपेक्षित असते ते श्रवणसौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथे शुद्ध यमन शोधण्याची धडपड करू नये.कारण तो यमन कल्याणाशी क्षणात दोस्ती करतो आणि दोन्ही मध्यमांच्या आशा हळुवार लगावांची प्रचिती आली की, उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच राहत नाही ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली आहे व घेतो आहे.
                  मी असा त्या बसरीचा सूर होतो
                   नेहमी ओठांपुनी मी दूर होतो...
     या गझलची चालही अशीच आहे.ध्रुवपदातली (मतल्यातली) दुसरी ओळ (ज्याला क्रॉसलाईन म्हणतात)  तिची ठेवण व स्वरसमूहाची रचना अत्यंत मोहक आहे.त्यातील 'सूर होतो' इथं तारसप्तकातला षड्ज सूर ह्यासाठी तारषड्जाचा हळुवार पण भरीव लागाव व रूपक तालाचा एक पूर्ण जादा आवर्तन जो दीर्घ कसलं मुक्काम ठेवतो तो अतिसुंदर लागतो.संगीत रचनाकाराकडे नुसता सांगीतिक अलंकारांचा साठा असून चालत नाही तर स्वरपोशाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो.
     संगीतकार हाच खऱ्या अर्थाने रचना समर्थपणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो.हा अनुभव मास्तर कृष्णराववांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, रासम कदम, यशवंत देव यांच्यापर्यंत येतो.सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत. 'सूर होतो' इथं शब्दकला आणि स्वरमाधुर्य असा सुरेख समन्वय झालाय.
    सांज घनाच्या मिटल्या ओळी' हे अतिशय हळुवार भावना उलगडून दाखविणारे सरस काव्य, कदम यांनी बंदिशही यमनमध्येच बांधलीय. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस 'क्षितिजावरती' इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा कॅरेकटरच बदललाय,असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे 'क्षितिज' या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्याय नाही हे त्वरित पटते.पुरीयाचे होणारे दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळे सुरेख जुळून आलेय.प्रसिद्ध कवी अनिल कांबळे यांच्या 'जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू,ऐन वेळी अशी काय करतेस तू' ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे.यमनमधील अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना,खेमट्याच्या अंगाने लागणारा दादऱ्याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही आशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे.सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास 'ऐन वेळी अशी काय' ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमूहरचना म्हणावयास हरकत नाही.'सामग, सामगधप' वगैरे. अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे.
    'तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही' ही सुद्धा यमन मधीलच रचना आहे.यमन ह्या एकाच रागातल्या चारही रचना त्यांनी मला एकापाठोपाठ एक ऐकवल्या पण खासियत अशी की; त्यात तोच तोचपणा नाही.स्वररचनेची पठडी ठरीव स्वरूपाची नाही.त्यात आहे पूर्णत: वेगळेपण,हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचे वैशिष्टय मानले जाते.
     सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला, ध्रुवपदाला खास महत्व आहे.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात.त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असते ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला.कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे.मुखड्याच्या चालीला अनुरुप अशी किंबहुना त्याचे सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करून अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते.तसे नसेल तर पूर्ण  चालच फसते.अनेक संगीतरचनांमध्ये हे दोष दिसतात.संगीतकाराला इथे आपली प्रज्ञा ओतावी लागते.सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणाऱ्या आहेत, म्हणूनच भावतात.कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते?,कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणे म्हणजे हळूच मधाचे बोट चाखण्यासारखे गोड मधुर असते.अर्थातच शेवटचे कडवे हे सर्वार्थाने हायलाईट असते.तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात.एकाच यमनाची ही विविध रूपे, विविध रंग, त्यांचा वेगवेगळा ढंग आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असे आमच्या भोवती टाकले की आम्ही स्वतः जाणकार असूनही फसलो. मग लक्षात आले की,ही यमनी फसवणूक होती,पण ही फसवणूक गोड होती.निर्भेळ होती,निर्मळ आनंद देणारी होती.तसे पाहू गेल्यास प्रत्येक संगीतकार अशी गोड फसवणूक करीत असतो.कारण त्याचा स्वतःचा असा एक बाज असतो.लाडका स्वरसमूह असतो आणि तो बहुसंख्य चालीत डोकावतोच किंबहुना त्यामुळेच संगीतकार कोण ते आपण ओळखत असतो, असे थोडेसे धाडसी विधान इथे नोंदवितो.या बाबी मिळूनच त्याची 'स्टाईल' बनत असते.सुधाकर कदमांची सुद्धा अशी एक खास स्टाईल आहे.पण त्यात कोण्या जानेमाने संगीतकाराची नक्कल किंवा अनुकरण नाही.त्यांचा बाज हा खुद्द त्यांचाच बाज आहे हे विशेष आणि तो अस्सलही आहे.
    'हे तुझे आशा वेळी लाजणे बरे नाही/चेहरा गुलाबाचे झाकणे बरे नाही', 'आली हासत आज पहाट...मेंदी भरल्या', 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची/तापलेल्या अधीर पाण्याची', 'सूर्य केव्हाच अंधाराला यार हो' या चारही रचना वेगवेगळ्या भाव-भावनांच्या.प्रत्येक रचना अत्यंत रसरशीत आहे.सर्वच चाली प्रामुख्याने भूप या लोकप्रिय रागात बांधल्या आहेत. पण प्रत्येक स्वररचनेत मनोहारी वैचित्र्य व काव्याला पूर्ण न्याय दिला गेलाय.पैकी 'हे तुझे अशा वेळी' ही तर मास्टरपीस रचना मानावी लागेल.माझी स्वतःची तर ही अत्यंत प्रिय रचना आहे.
    यमनप्रमाणे या चारही रचनात भूप रागाच्या अनेक सौंदर्यस्थळांचे मुक्त व डोळे भरून दर्शन घडते.मोरांनी सप्तरंगी पिसांचा रंगीबेरंगी पिसारा फुलवावा त्याप्रमाणे भूप रागाचा भरगच्च फुलोरा सुधाकर कदमांनी विलक्षणरीत्या फुलविला आहे.त्यात यमनच्या निषादचा केलेला सुखद उपयोग, शब्दांची केलेली फेक, गझलच्या अंगांनी केलेली गायकी हे सर्व सविस्तर लिहिणे म्हणजे तो स्वतंत्र लेखाचा किंवा भाषणाचा विषय आहे, म्हणून इतकाच स्पर्श पुरेसा आहे.
    यमन, भूप, या सर्वमान्य लोकप्रिय रागांचा चातुर्यपूर्ण उपयोग करून कदमांनी सुंदर सुंदर रचना दिल्या. त्यातील सौंदर्यकण, सौंदर्यस्थळे निर्देशित करण्याचा प्रयत्न केला याखेरीज इतर अनेक रागात त्यांनी अशाच विपुल रचना मासिकांना दिल्या आहेत.त्या सर्वांचा रसास्वाद इथे नोंदविणे शक्य नाही.तरी 'आज मी जे गीत गातो', 'आम्ही असे दिवाणे', किंवा भूपश्री मधील 'कुठलेच फूल आता' आणि शिखराध्याय म्हणजे 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' ही सुरेश भटांची खास गझल या सर्वच गीत व गझलांना कदम यांनी अत्यंत सुरेल चाली देऊन सुधारसपान घडविले.
     संगीत रचनाकार, स्वतः गायक असणे हे भाग्याचे लक्षण.कारण तो आपल्या हृदयात घर करून राहिलेली चाल खऱ्या अर्थी समर्थ गळ्यातून श्रोत्यांच्या हृदयात पोचवितो.त्या अर्थाने कदमांच्या रचनाच भाग्यवान म्हणाव्या लागतील.कारण सुधाकर कदम हे स्वतः मुलायम आवाजाचे , शब्दनुसार गाणी प्रभावीरीत्या सादर करणारे गायक असल्याने त्यांच्या चाली व काव्याचे सोने होते.नेमक्या वेळी नेमक्या शब्दावर जोर देणे, जरूर तिथे हळुवार शब्दस्वर उच्चार, प्रसंगी स्वरांचा जोरदार लगाव, स्वरांवरील न्यास, ठेहराव याद्वारे ते आपले गायन अत्यंत प्रभावी करतात.ताल व सुरांवर त्यांचा चांगलाच काबू आहे.तळाच्या अंगाने सुटेख गीत मांडणी करतात.
    शास्त्रीय संगीताचा अभ्यास, रियाज व आवाज कमविला असल्यामुळे गाण्यातील भरदस्तपणा सहज नजरेत भरतो. सुगम संगीत गायक/गायिका स्वतः हार्मोनियमवादक असेल तर दुधात साखर असा योग असतो.वर्ज्य, विकृत, अशा बऱ्याचशा स्वरांना काबूत ठेवण्यासाठी व इन्स्टंट स्वरबदल करण्यासाठी हार्मोनियम अत्यंत उपयुक्त असते. सुधाकर कदमांचा हार्मोनियमचा हात अत्यंत तयार व सॉफ्ट आहे.गायनाच्या रंगतीत त्यामुळे निश्चितच भर पडते.कडव्यांमधील म्युझिक पिसेसब(इंटरल्युड) ते उत्तम प्रकारे वाजवितात.त्या रचनाही मेलोडीयस असतात.
    गायन करताना स्वर आलापी,स्वरविस्तार व सरगमचा रास्त वापर या बाबी गाणे नटविण्या-सजविणाऱ्यांसाठी हव्यातच.कदमांची सरगम मांडणी बहुत खुबसुरत असते.वानगीदाखल...'गरे निरेपगरेसा निध धनि सागमग मपधधनिध मपमपग,गपगरेसारे,निरेमगरेनिसा' ही सरगम पहावी.
    असे हे सव्यसाची संगीतकार सुधाकर कदम विदर्भाचे एक भूषण आहे.नाटक आणि संगीताचे विदर्भाशी फार पूर्वीपासूनच स्नेहनाते आहे.अनेक मान्यवर कलावंत या भूमीने महाराष्ट्राला दिले.
    आर्णी येथील संगीत विद्यालयाची पंचवीस वर्षांची दीर्घकालीन वाटचाल कदमांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.अर्थातच हा प्रवास खाचखळग्यांनी, वेड्यावाकड्या वळणांनी, प्रसंगी काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ करणारा असूनसुद्धा हे सर्व अडथळे धीरोदत्तपणे पार करणाऱ्या सुधाकर कदमांच्या हातून सुंदर सुंदर चाली निर्माण व्हाव्यात.त्यांची संगीत सेवा अशीच अखंड सुरू राहावी, अशा शुभेच्छा मी माझ्या या मृदू स्वभावाच्या व माणसासाठी आसुसलेल्या मित्राला देतो.तत्पूर्वी मनातील एक खंत नमूद करतो, भले विदर्भाने या कलाकाराचे भरपूर कौतुक केले असेल पण उर्वरित महाराष्ट्रात या कलाकाराला त्याच्या योग्यतेप्रमाणे प्रोजेक्ट केले गेले नाही.प्रतिथयश गायक,गायिकांनी अभिमानाने गावी अशी त्यांची स्वररचना असूनही हे का घडले नाही हे एक कोडे आहे.

कोल्हापूर

(सुधाकर कदम,गौरव विशेषांक १९९९ मधून 'मौनी'मध्ये साभार.) मयूर महाजन (चर्चा) २२:३१, २ ऑगस्ट २०२१ (IST)Reply

लेख - तालयोगी पं. सुरेश तळवलकर संपादन

. ●मला भावलेला संगीतकार●

                  -तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर

. श्री सुधाकर कदम यांचे चिरंजीव श्री निषाद कदम माझ्या निकटतम शिष्यांपैकी एक आहेत.त्यामुळे माझा आणि सुधाकरजी यांचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा स्नेह आहे.मी सुधाकरजींचे काम फार जवळून ऐकले आहे.अनेकदा त्यांनी केलेल्या रचनांचा मनसोक्त आनंद घेतला आहे. प्रत्येक कलाकार त्याच्या कामामध्ये आपल्यामधील कल्पकतेनुसार वैविध्यता आणायचा आटोकाट प्रयत्न करत असतो.सुधाकरजी यांच्या रचना ऐकताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की, त्यांच्या संगीत रचनांमध्ये विविधता आहे.प्रत्येक रचनेला स्वतंत्र अशी एक ओळख आहे.एका रचनेसारखी दुसरी रचना नाही.ही विविधता आणत असताना,ते ती रचना यांत्रिक किंवा कोरडेपणाकडे झुकू देत नाहीत.सुधाकरजी त्यांच्या रचनांमध्ये एक प्रकारचा हळवेपणा,ओलेपणा जपल्याची जाणीव देतात.गझल या प्रकारामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असणे गरजेचे असते.अशी रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयाला भिडते,याची जाणीव सुधाकरजींना आहे.त्यांना असलेली ही जाणीव ते त्यांच्या रचनांमधून श्रोत्यांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहचवतात.त्यांच्या रचनांमधील ’संवेदनशीलता’ मनाला भिडते.संगीत रचनेमध्ये भावनिकता ही फार महत्वाची आहे,जी सुधाकरजींच्या रचनांमध्ये जाणवते. गझल काव्यातून आलेला भावार्थ,त्या काव्याला असलेली लयीची नादमयता,ही सुधाकरजींना अगोदरच जाणवलेली असल्यामुळे ते त्यास संगीत देत नाहीत तर ते त्यांच्याकडून घडले जाते.सुधाकरजींच्या गझल रचनांमध्ये एकाचवेळी खुलेपणा आहे आणि तितकाच हळूवारपणाही आहे.असे फार कमी वेळा ऐकायला मिळ्ते.संगीताच्या दृष्टीकोनातून खुलेपणा आणि हळूवारपणा ही एकमेकांविरोधी तत्वे आहेत.पण सुधाकरजींच्या रचनांमध्ये खुलेपणा व हळूवारपणा या दोन्हीही गोष्टींचा सुरेल संगम ऐकायला मिळतो. सुधाकरजींनी त्यांच्या रचनांसाठी वेगवेगळ्या तालांचा चपखल वापर केला आहे.कधी रुपक तर कधी दादरा-केरवा तर कधी अप्रचलित ११ मात्रांचा ताल अशा वेगवेगळ्या तालांमध्ये त्यांनी रचना केलेल्या आहेत.अशा अवघड आणि अप्रचलित असलेल्या बौद्धिक तालांचा वापर करताना गझलचे मर्म समजल्या जाणार्‍या भावनिक तरलतेवर ते कोठेही विपरीत परिणाम होऊ देत नाहीत. सुधाकरजींच्या रचनांचा शास्त्रीय संगीताशी घनिष्ट संबंध आहे.गझल गायनाच्या परंपरेमध्ये गझल गायकाला सादरीकरण करताना रचनेपेक्षा वेगळा सांगीतिक विस्तार करण्याचे स्वातंत्र्य असते.सुधाकरजींच्या गझल रचना पूर्णपणे स्वतंत्र असूनसुद्धा त्यांच्या रचनांमध्ये गझल गायकाला मुक्तपणे गाण्यासाठी वाव असतो.तो त्याच्या मनाने गाऊ शकतो. संगीताच्या सर्व प्रकारांमध्ये मग ते शास्त्रीय असो,उपशास्त्रीय असो किंवा सुगम संगीत असो,’अस्थाई’ अतिशय महत्वपूर्ण असते.अस्थाईला सुगम संगीतामध्ये धृवपद असेही म्हणतात.संगीत रचनेमध्ये अस्थाई परत परत गायली जावी असे वाटणे हे ती सांगीतिक रचना उत्कृष्ट असल्याचे द्योतक आहे.सुधाकरजींच्या सर्व रचना या प्रकारामध्येच समाविष्ट असतात. अस्थाई जितकी सांगीतिकदृष्ट्या परिपूर्ण असेल तितका तिचा विस्तार करणे सोपे जाते.अस्थाई परत परत गावी असे वाटणे म्हणजेच त्याची धून होणे असे मला वाटते.आणि अशा प्रकारे धून झालेली कोणतीही रचना श्रोत्यांच्या ओठांवर तरळत राहते.सुधाकरजींच्या अनेक सांगीतिक रचना मी ऐकल्या आहेत.त्याचा आनंद घेतला आहे. जेवढी अस्थाई सांगीतिक दृष्ट्या परिपूर्ण तेवढी ती रचना विस्तार करायला गायकाला जास्त वाव मिळ्तो.अशा प्रकारची सांगीतिकदृष्ट्या परिपूर्ण असलेली अस्थाई ही त्या रचनेची ताकद बनते.अस्थाईतील शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन त्या शब्दांना यथायोग्य सांगीतिक वृत्तामध्ये (मीटर) बसवणे हे फार बौद्धिक काम आहे.सुधाकरजींनी हे शिवधनुष्य अतिशय लीलया पेलले असून अशा प्रकारची बौद्धिक चमक त्यांच्या अनेक रचनांमध्ये ऐकायला मिळ्ते.त्यांच्या रचनांमध्ये स्वरवैचित्र्यही पहायला मिळ्ते.(ज्या प्रमाणे शास्त्रीय संगीतामध्ये जोड रागांची संकल्पना आहे त्याप्रमाणे) अशी सांगीतिक रचना करणे ही एक बौद्धिक क्रिया आहे.पण या बौद्धिक क्रियेमध्ये सुद्धा गझलमधील भावनिक तरलतेवर विपरित परिणाम होणार नाही याचे अतिशय योग्य भान त्यांनी ठेवलॆ आहे.सुधाकरजींना त्यांच्या रचनांमध्ये शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक संतुलन अतिशय उत्कृष्टपणे आणि कलात्मकतेने जमलेले आहे. गझल हा प्रकार प्रामुख्याने काव्य प्रकार असूनसुद्धा त्याचे संगीतमय सादरीकरण हे शास्त्रीय संगीताच्या खूप जवळ जाणारे असते.शिवाय गझलच्या संगीतमय सादरीकरणाच्या रिवाजामध्ये तबला वादकाला त्याचे काम करण्याची संधी उपलब्ध असते.त्यामुळे गझल गायकाबरोबर तबला वादक कोण आहे,त्याची पात्रता काय आहे याची पण गझल गायन ऐकणार्‍या श्रोत्यांना उत्सुकता असते.गझलच्या सांगीतिक रचनेची जी अस्थाई (धृवपद) असते ती जरी,बरोबर वाजणार्‍या तालाशी गणिती किंवा ठॊस संबंध दाखविणारी नसली तरी त्यामध्ये त्या तालाच्या आवर्तनाची आकृती सक्षमपणे उभी अहात असते.अशा अस्थाईचे वारंवार सादरीकरण लेहेर्‍या इतके सक्षम असल्यामुळे तबला वादकाला त्याचे काम सादर करण्याची संधी मिळते.सुधाकरजींच्या रचनांमध्ये सुद्धा ही खासियत दिसून येते. मी गेले तीन-चार वर्ष त्यांनी केलेल्या अनेक संगीत रचना ऐकल्या आहेत.त्या मला मनापासून भावल्या आहेत.सुधाकरजींच्या गझला या शास्त्रीय संगीतातील बंदिशींसारख्याच विस्तारक्षम असून,अशा संगीत रचना ताकदीने उभा करणारा कंपोझर म्हणून सुधाकरजींकडे आदराने पाहिले जाते.त्यांचा बराच मोठा काळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेला.विदर्भ,यवतमाळ या परिसराला कवी,साहित्यिक,कलाकार अशा मंडळींचा वारसा लाभला आहे.सुधाकरजींनी बर्‍याच काळापर्यंत प्रसिद्ध कवी,गझलकार कै.सुरेश भट यांच्या समवेत व्यतीत केला.कै.भट हे एक प्रभावी आणि आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते.त्यांच्यासारख्या प्रतिभाशाली व्यक्तीच्या सहवासातून सुधाकरजींनी मराठी गझल ही सर्वमान्य श्रोत्यांपर्यंत पोहचवली. सुधाकरजींना त्यांच्या वाढदिवसाबद्दल मन:पूर्वक शुभेच्छा!

शब्दांकन : मोहना रामदास पळसुले

संदर्भ : श्री सुधाकरजींनी स्वरब्द्ध केलेल्या गझलांचे इतर गायकांनी केलेले कार्यक्रम तसेच ’काट्यांची मखमल’,’तुझ्यासाठीच मी…’ आणि ’अर्चना’ हे अल्बम. ................................................... निषाद कदम (चर्चा) २३:००, २ ऑगस्ट २०२१ (IST)Reply

"सुधाकर कदम" पानाकडे परत चला.