चर्चा:विलासराव देशमुख

विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले. तुळजापूर च्या तुळजाभवानी देवी वर त्यांची खूप श्रद्धा होती आणि तुळजापूर चे तत्कालीन आमदार कै.साहेबराव हंगरगेकर यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बॅंकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

इ.स. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. पुढे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.

१३ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ला विलासराव पहिल्यांदा आणि इ.स. २००४ च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण इ.स. २००८ साली मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्याने त्यांना आपले मुख्यमंत्री पद गमवावे लागले.

"विलासराव देशमुख" पानाकडे परत चला.