ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या चार वेदांप्रमाणेच त्यांचे चार उपवेदही प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण आहेत. वेद हे पारमार्थिक दृष्ट्या महत्त्वाचे तर उपवेद लौकीक महत्त्वाचे आहेत. आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि अर्थशास्त्र हे चार उपवेद आहेत.

अनुक्रमणिका १ १. आयुर्वेद २ २.धनुर्वेद ३ ३. गांधर्ववेद ४ ४.अर्थशास्त्र

१. आयुर्वेद

 ‘आयुरस्मिन् विद्यते इत्यायुर्वेदः।’ आयुर्वेदाचे ज्ञान सर्वप्रथम ब्रह्म्याला झाले. त्याच्या कडून प्रजापतीला, पुढे अश्विनीकुमारांना आणि त्यांपासून इंद्राला ज्ञान झाले. इंद्राद्वारे अत्रीपुत्रादी  मुनींना आयुर्वेदाचे ज्ञान झाले. स्वास्थ्य टिकवणे आणि रोगांचे निर्मूलन करणे ही या उपवेदाची मुख्य प्रयोजने आहेत. चरक, सुश्रुत, वाग्भट इत्यादी आयुर्वेदाचार्यांच्या संहिता सुप्रसिद्ध आहेत.

२.धनुर्वेद धनुर्वेद हे शस्त्रास्त्रांचे शास्त्र आहे. ब्रह्मा, प्रजापती आदिं पासून परंपरेने विश्वामित्र ऋषींना हे ज्ञान प्राप्त झाले. दीक्षापाद, संग्रहपाद, सिध्दिपाद आणि प्रयोगपाद हे धनुर्वेदाचे चार पाद आहेत. दुष्टांना दंड देणे आणि प्रजेचे परिपालन हेच धनुर्वेदचे प्रयोजन आहे.

३. गांधर्ववेद गांधर्ववेदाचे प्रणयन भगवान भरतांनी केलेले आहे. हा वेद गीत, वाद्य आणि नृत्यादी भेदांमुळे वैविध्यपूर्ण झालेला आहे. देवतांची आराधना आणि निर्विकल्प समाधी हे गांधर्ववेदाचे मुख्य प्रयोजन आहे.

४.अर्थशास्त्र अर्थशास्त्रसुध्दा अनेक प्रकारचे आहे. जसे नीतिशास्त्र, अश्वशास्त्र, शिल्पशास्त्र, सूपशास्त्र आणि चौसष्ट कलांचे शास्त्र. ही शास्त्रे अनेक मुनींद्वारा विरचित आहेत. लौकीक क्षेत्रांत मनुष्याला विचक्षणता प्रदान करणे हेच या शास्त्रांचे प्रयोजन होय.

                   अशा प्रकारे ह्या चार उपवेदांचे अध्ययन मानवाची सर्वांगीण प्रगती घडवून आणते.
"उपवेद" पानाकडे परत चला.