ज्या प्रक्रियेत नवीन औषधांवर संशोधन केले जाते त्या प्रक्रियेस क्लिनिकल रिसर्च असे म्हणतात. या प्रक्रियेत दोन घटक मुख्यत्वे तपासले जातात. एक म्हणजे सुरक्षितता आणि दुसरी म्हणजे (औषधांची) काम करण्याची क्षमता. एखाद्या नवीन औषधाची निर्मिती करण्यासाठी लागणारा कालावधी हा साधारणतः १२ वर्षे असतो आणि त्यासाठी ५०० मिलियन (५०० दशलक्ष म्हणजे ५० कोटी) ते १ बिलियन (१०० कोटी) अमेरिकी डॉलर खर्च येतो.[ संदर्भ हवा ] इतका खर्च येण्याचे कारण यात मानवप्राण्यावर प्रयोग केले जातात. आणि थोडीशी चूकही ज्याच्यावर प्रयोग केला जातो अशा रुग्णाच्या(प्रयुक्त्याच्या) जीवावर बेतू शकते वा त्याच्या आरोग्याची मोठी हानी करू शकते. क्लिनिकल रिसर्चमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम केले जाते.

क्लिनिकल रिसर्चचे विविध टप्पे संपादन

मुख्यत्वे यात ४ टप्पे असतात .

पहिला टप्पा संपादन

यात एखाद्या विशिष्ट औषधाचा प्रयोग धडधाकट व्यक्तीवर केला जातो. जे औषध नवे असते, म्हणजे ज्याचा वापर मानवजातीत कोणावरही केला गेलेला नसतो, असेच औषध या प्रयोगात वापरण्यात येते. या टप्प्याचा मुख्य उद्देश औषधाची सुरक्षितता बघणे हा असतो. पहिल्या टप्प्याच्या प्रयोगात मोठ्या प्रमाणात धोका असतो. प्रयुक्ताचे काहीही बरेवाईट यात होऊ शकते. याच कारणासाठी या टप्प्यात ९-१० धडधाकट व्यक्तींची निवड केली जाते. म्हणजे जेणेकरून एखादा धोका आलाच तर तो पचवता यावा. रोगी माणसाचे शरीर मुळातच कमजोर झाले असल्याने त्यावर हा प्रयोग करण्यात येत नाही. भारतात या पहिल्या टप्प्याच्या प्रयोगाची परवानगी देण्यात येत नाही. या प्रयोगादरम्यान प्रयुक्ताचे काटेकोर निरीक्षण केले जाते आणि कुठल्याही अपघाताची शक्यता वाटल्यास हा प्रयोग त्वरित थांबवण्यात येतो.

दुसरा टप्पा संपादन

या टप्प्यात साधारणतः १० ते ३०० व्यक्तींवर प्रयोग केले जातात. प्रयोग ज्यांच्यावर केले जातात ते प्रयुक्त रुग्ण असतात. या टप्प्याचा मुख्य उद्देश औषधाची परिणामकारकता बघणे हा असतो. या टप्प्यातही सुरक्षितता देखील बघितली जाते. इथे औषध परिणामकारक वाटले तर ते तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचते.

तिसरा टप्पा संपादन

या टप्प्याला प्री-मार्केटिंग टप्पा असेही म्हणतात. हा टप्प्याचा प्रयोग उचितरीत्या पार पडल्यास आणि सरकारला त्याचे निकाल योग्य वाटल्यास सरकार त्या औषध कंपनीला ते विशिष्ट औषध विकण्याची परवानगी देते. या टप्प्यात प्रयोगासाठी साधारणतः ३०० ते ३००० प्रयुक्त असतात. त्यामुळेच त्या विशिष्ट औषधाचे अनावश्यक परिणामसुद्धा या प्रयोगात नीट कळतात. या टप्प्याचा मुख्य उद्देश आधीच्या टप्प्यात मिळालेल्या माहितीवर शिक्कामोर्तब करणे हा असतो. यामध्ये केलेले अभ्यासाचे जवळ जवळ २ ट्रक भरतील इतके कागद तयार होतात. ही कागदपत्रे सरकारला पाठवण्यात येतात.

चौथा आणि शेवटचा टप्पा संपादन

आज बाजारात मिळणारी सर्व औषधे या टप्प्यातली असतात. या टप्प्यात औषधांवर, व ते ज्या रुग्णांना दिले त्यांवर लक्ष ठेवले जाते. एखादे औषध गडबड तर करीत नाही ना, हे यामध्ये बघितले जाते. आणि जर एखाद्या औषधाने फार मोठी गडबड केलीच तर ते औषध बाजारातून काढून घेतले जाते. भारत सरकारने काही औषधांवर अश्या कारवाया २०१०-२०११मध्ये केल्या होत्या.