काळे पाणी

(काळेपाणी या पानावरून पुनर्निर्देशित)

काळे पाणी हे ब्रिटिश भारतातील भारतीय कैद्यांना अंदमानला जाऊन भोगायच्या जन्मठेपेच्या शिक्षेला मिळालेले प्रचलित नाव होते.[१]

भारताच्या मुख्य भूमीपासून सुमारे बाराशे किलोमीटरवर अंदमान निकोबारची बेटे वसली आहेत. ५७२ बेटांचा हा समूह आहे.

पोर्ट ब्लेअर ही अंदमानची राजधानी आहे. साधारणपणे बाराही महिने पडणाऱ्या पावसामुळे येथे हवामान दमट असते. ते रोगटही आहे अशा कल्पनेमुळे अंदमानला काळे पाणी म्हणत. भारतातील जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना ब्रिटिश सत्ताधीश अंदमानला आणून ठेवत. त्यासाठी त्यांनी येथे सेल्युलर जेल नावाचा तुरुंग बांधला. सन १८९६ ते १९०६ दरम्यान कैद्यांकडूनच सेल्युलर जेलची बांधणी करून घेतली गेली.

सेल्युलर जेलमध्ये ६९४ कोठड्या होत्या. कैद्यांचा एकमेकांशी संवाद होऊच शकणार नाही अशा पद्धतीने त्यांची उभारणी करण्यात आली होती. ह्या कोठड्या आकाराने अतिशय छोट्या आहेत. आजही भेदरवून टाकणारी अशी प्रत्येक कोठडीची बांधणी आहे. अशाच एका कोठडीत सावरकरांनी अकरा वर्षे अत्याचार भोगले होते, तसेच कमलासारखे काव्यही त्यांनी याच ठिकाणी लिहिले.

अंदमानवरील पुस्तके संपादन

  • अंडमान तथा निकोबार द्वीप समूह (हिंदी, बहादुर राम टम्टा )
  • अंतरंग : अंदमान निकोबार (केशर मेश्राम)
  • अंडमान निकोबार की लोक कथाएँ (हिंदी, बलराम आगरवाल)
  • अंदमानच्या अंधेरीतून (वि.वि. केळकर).
  • काळे पाणी (कादंबरी, लेखक वि.दा. सावरकर)
  • क्रांतितीर्थ (अंदमानचा सर्वस्पर्शी लेखाजोखा, लेखक मधु आडेलकर) : अंदमान बेटांचे नैसर्गिक रूप, भौगोलिक स्थान, तेथील सात आदिवासी जमाती आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती, एका अपघातानेच ब्रिटिशांना लागलेला अंदमानचा शोध, अंदमानला मिळालेली ‘काळेपाणी’ ही ओळख, भारतीय राजबंद्यांना या काळ्यापाण्यावर पाठवून ब्रिटिशांनी त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार, ‘खुले तुरुंग’, ‘सेल्युलर जेल’ यांची तपशीलवार माहिती ‘क्रांतितीर्थ’मध्ये दिलेली आहे. कोष्टकरूपाने मांडणी करून कोणता राजबंदी कोणत्या खटल्यासंदर्भात अंदमानात पाठवला गेला त्याची नावा-गावासह, जाती-पातीच्या उल्लेखांसह अगदी तारीख-वार, स्थळ-काळासकट नोंद केलेली आहे. यावरून हे समजते की १८५७ च्या उठावापासून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या प्रत्येक लढ्यात हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-भिल्ल, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय, नबाब, कवी, पत्रकार, शिक्षक, कामगार असे सारेच हिंदुस्थानी सामील झाले होते.

पाच वेळा अंदमानचे अभ्यासदौरे, त्यांत अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून संशोधकाची चिकाटी, इतिहासाचे भान जपत वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी सिद्ध केलेले ‘क्रांतितीर्थ’ हे पुस्तक आहे.

  • चलो चले अण्डमान (हिंदी, प्रीति अगरवाल)
  • देवभूमी अंदमान (नितीन लाळे)
  • पाचूची बेटे - अंदमान निकोबार (शैला कामत)
  1. ^ "काळे पाणी". मराठी विश्वकोश. २७ मार्च २०२४ रोजी पाहिले.