उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर शहराचे काम उल्हासनगर महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय उल्हासनगर येथे आहे.

भारत पाक फाळणीनंतर पाकिस्तानातून निष्कासित केलेल्या निर्वासित हिंदू सिंधी बांधवांना मानवतेच्या दृष्टीकोनातून भारतामध्ये काही ठिकाणी निर्वासित छावण्या बनवून आश्रय देण्यात आला. उल्हासनगर ही त्या पैकीच एक निर्वासित छावणी. मुंबई जवळ मध्य रेल्वेच्या कल्याण जंक्शनच्या आसपास उल्हासनदीच्या काठावरील थोड्या पडीक जमिनीवर स्थापित केलेली.

आजमितीस या छावणीचे लोकसंख्या वाढून एक स्वतंत्र ' महापालिका ' असलेले नगर बनले आहे. सरकारी आस्थापनेत आणि राजकारणात असलेली लोकं महापालिका शब्दाला टाकलेल्या ' ___' या अवतरण चिन्हांच्या (Inverted commas) मागे दडलेला अर्थ जास्त चांगला समजू शकतात. तर अशी ही ' कानामागून आली आणि तिखट झालेली ' महापालिका व लोकवस्ती. या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा व्यापारउदीम, व्यवसायधंदा करण्याची हातोटी. लौकिक अर्थाने व्यवसायाचे पुस्तकी शिक्षण नसले तरी वडीलोपार्जित मिळालेल्या व्यवसायाच्या वारसा शिक्षणामुळे इथे आश्रयाला आलेल्या पीढीनेही मुंबई जवळ असल्याने सर्वच व्यवसायांत चांगलाच जम बसवला. साध्या पानपट्टीच्या दुकानापासून ते करोडो रूपयांच्या उलाढाली असलेल्या सर्वच उद्योगधंद्यात उल्हासनगरचे नाव चांगल्या व वाईट दोन्ही अर्थाने गाजत राहिले, गाजते आहे.

दुसऱ्या पीढीतील लोकं उद्योगांबरोबरच 'वाणिज्य ' विषयक शाखेतील नोकऱ्यांमधे प्रवेश करून आपला जम बसवती झाली. बैंका, सीए, इन्शुरन्स, MBA / Financial Management / Marketing या क्षेत्रात या पीढीने कारकीर्द सुरू केले. याबरोबरीनेच यांची स्वतंत्र अशी सिंधी संस्कृतीही वाढीस लागली. हैदराबाद सिंध असोसिएशन सारख्या सिंधी शैक्षणिक संस्थांनी काढलेल्या महाविद्यालयां मुळे शिक्षणाची पदवी मिळणे सोपे झाले.

इथे येऊन अल्पसंख्यक असलेल्या या लोकांचा मुळातीलच चिवट/ चिकट आणि अहिंसक स्थायीभाव या लोकांच्या समुदायाच्या भराभर वाढीस कारणीभूत झाला. जेवढी जास्त मुले तेवढे घरातील व्यवसायासाठी अधिक चांगले / विश्वासू मनुष्यबळही या सुत्रातून लोकसंख्या, लोकवस्ती व मनुष्यवस्ती विस्तारण्यास सुरुवात झाली. आपापले सर्व लोकं एकत्र जमवून राहणे हा यांचा आणखी एक स्वभाव.

त्यानंतरच्या यांच्या आजकालच्या तरुण पीढीला सर्वच म्हणजे धन, शिक्षण, फन, आदी सुविधा हाताशी उपलब्ध मिळाल्यामुळे ते आणखी पूढे म्हणजे Corporate, Real Estate, Hotel आणि Entertainment अश्या अपारंपरिक क्षेत्रातही प्रवेश करते झाले.

राजकारण क्षेत्र यातून सुटले असते तर आश्चर्यच वाटले असते पण राजकारणातही सिंधी समुदायाचा शिरकाव झाला. मुळात हिंसक वृत्ती नसल्याने आणि गोड बोलून गोडीगुलाबीने आपले काम मार्गी लावण्याच्या खानदानी ' व्यवसायी ' वृत्तीमुळे आपला स्वतंत्र राजकीय पक्ष न बांधता कोणत्या तरी प्रस्थापित राजकीय पक्षाच्या बरोबरीने जाण्याचे सूत्र त्यांनी नेहमीच अंगीकारले. म्हणूनच उल्हासनगर मधील राजकारण व महानगरपालिकेची सत्ता फक्त सिंधी समाजाभोवतीच फिरत राहीली.

आतातर वाढत्या लोकसंख्येमुळे उल्हासनगरचे क्षेत्र पूर्णपणे इंच न इंच काठोकाठ सिंधी समाजातील लोकांनी भरून गेले आहे आणि ते आता आजूबाजूच्या शहाड, अंबिवली, टिटवाळा, विठ्ठलवाडी, अंबरनाथ कल्याण या शहरांमधूनही ते संक्रमित होऊन पसरू लागले आहेत. उल्हासनगर महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने या साऱ्याची उजळणी करता असे आढळून येते की निर्वासित म्हणून येताना जी काही तुटपुंजी मिळकत घेऊन आलेल्या या समाजातील लोकांनी आपल्या हुशारीने येथील आर्थिकच नाही तर शैक्षणिक, सामाजिक व राजकीय सुत्रे सुद्धा आपल्या हातात घेऊन वेगळी महापालिका अस्तित्वात तर आणलीच पण आधीच्या प्रस्थापित शहरांनाही मिळणार नाही एव्हढे महत्त्व उल्हासनगरला मिळवून दिले आहे. त्याचा फायदा तेथील स्थानिक विकास होण्यासाठी कीती झाला याविषयी मात्र साशंकता निर्माण होते.