इर्जिक म्हणजे शेतीत सगळ्यांनी मिळून मिसळून दिवसभर कष्ट केल्यानंतर एकत्र केलेले जेवण. भारतात लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.शेतकरी जीवनात खरीप हंगाम फार महत्त्वाचा असतो. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी तयारी करावी लागते. शेतकरी जीवनात राब, वाफसा, नांगरणी, वखरणी,पेरणी, आवणी, कोळपणी,निंदणी, खुरपणी, काढणी, कापणी, बांधणी,झोडणी,मळणी,उफणणी, उडवी,वारा देणे,सावड, इर्जिक इत्यादी शब्दांना फार महत्त्व आहे.शेतकऱ्यांना मशागतीपासून पेरणीपर्यंत आणि खुरपणीपासून काढणी, मळणी पर्यंत सगळे वेळेत झाले तरच मनासारखे पीक येते.शेतकामाचे दिवस चालू झाले की शेतकऱ्यांना बिलकुल उसंत नसते.शेती करताना वस्तू आणि कष्टाची देवाणघेवाण अपरिहार्य असते.एक शेतकरी दुसऱ्याच्या शेतात काम करतो त्याबदल्यात दुसरा शेतकरी पहिल्या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असतो.एकमेकांना बैलजोडी आणि अवजारेसुद्धा वापरायला दिली जातात.त्यामुळे गावात एकोपा टिकून राहत असे. पूर्वी गावात भरपूर इर्जिकी होत.शेतीची कामे रात्री उशिरापर्यंत होत असत.भल्लरी दादा भल्लरी सारखी शेतकरी गीत गात, एकमेकांची चेष्टा मस्करी करत भरपूर माणसे शेतात राबत असत. दुपारी झुणका किंवा कालवण भाकरीचा बेत असे आणि रात्री पंगत बसत असे.शेतात तीन दगड ठेवून चूल बनवली जात असे आणि त्या चुलीवर भगुल्यात शिजवलेल्या मटणाचा फर्मास बेत करीत किंवा पुरणपोळी किंवा लापशी सारखे गोडधोड केले जात असे.हे दिवसभर केलेल्या कष्टानंतरचे जेवण जास्तच चवदार लागत असे.ह्या जेवणालाच इर्जिक म्हटले जाते. [१]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४