अरुण शेवते हे मराठी भाषेतील साहित्यिक, संपादक व प्रकाशक आहेत. ते इ.स. १९९३ सालापासून दरवर्षी ऋतुरंग नावाने प्रकाशित होत असलेल्या दिवाळी अंकाचे संपादन करतात.[१] एका काव्यसंग्रहाचा स्वामित्व हक्क शेवते यांनी बाबा आमटे यांना दिला होता.[२]

ऋतुरंग संपादन

‘ऋतुरंग’चा पंचविसावा अंकाबरोबरच ऋतुरंग’मधील लेखांचे पन्नासावे पुस्तक २०१७साली बाजारात आले.

अरुण शेवते यांना नामवंत लोक लेख लिहून देतात, चित्रकार चित्रे काढून देतात, प्रकाशक पुस्तके छापून देतात आणि वाचक ती हातोहात विकत घेतात. ‘ग्रंथाली’, ‘लोकवाङ्मय’, ‘अनघा’, ‘मुद्रा’, ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’, ‘पद्मगंधा’ यांसारख्या मान्यवर प्रकाशन संस्था शेवत्यांनी संपादित केलेली पुस्तके काढतात आणि हातोहात ती विकली जातात. शेवते स्वतःही लिहितात, शब्दांकन करतात, संपादन करतात, प्रकाशन करतात

आॠन शेवते यांनी ‘ऋतुरंग’चा पहिला अंक १९९३ साली प्रसिद्ध केला. प्रत्येक अंकासाठी स्वतंत्र विषय घेऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना आणि नवोदितांनाही लिहायला लावण्याची पद्धत शेवते यांनी लोकप्रिय केली. अंकांचे विषय मानवी व्यवहारांशी, रोजच्या जगण्याशी आणि यशापयशाची सूत्रे उलगडून दाखविण्याशी संबंधित असतील याची काळजी घेतली. आठवणींच्या सावल्या, उरतात त्या आठवणी, सांगण्यासारखे बरेच काही, तेव्हाची गोष्ट, मागे वळून पाहताना, दोस्ताना, अज्ञात मनाचा शोध, ओळखीच्या पलीकडे, अनुभवांची शोधयात्रा, सांगायचं झालं तर, माझे अनुभव, माझे जन्मघर, माझे गाव-माझे जगणे, मी स्त्री आहे म्हणून, मला उमगलेला पुरुष, एकच मुलगी, नापास मुलांची गोष्ट... यांसारख्या विषयांवर त्यांनी दिवाळी अंक काढले.

लेखक, पत्रकार, नट, गायक, राजकारणी, समाजकारणी, विचारवंत, व्यापारी अशा विविध क्षेत्रांतील व्यक्ती ‘ऋतुरंग’साठी लिहितात. त्यांचे अनुभव वाचकाला अनोख्या भावविश्वाची सफर घडवून आणतात. आपल्या पंचवीस अंकांतून आणि त्या आधारे निघालेल्या पन्नास पुस्तकांतून शेवते यांनी अशा पाचशेहून अधिक व्यक्तींना बोलते केले आहे. जे लिहू शकतात त्यांना नेमके लिहायला शिकवले आहे. ज्यांच्याकडे लिहिण्याची हातोटी नाही पण सांगण्यासारखे खूप काही आहे त्यांच्यासाठी त्यांनी सिद्धहस्त लेखकांची फळी शब्दांकनासाठी उभी केली आहे. लता मंगेशकर ते गुलज़ार, दिलीप चित्रे ते शंकर वैद्य, सुशीलकुमार शिंदे ते यशवंतराव गडाख, रंगनाथ पठारे ते अरुण साधू, नरेंद्र चपळगावकर ते सदानंद मोरे अशी कितीतरी माणसे ऋतुरंगचे लेखक झाले आहेत.

शेवते यांनी इतर भाषांमधील लेखक-कलावंतांनाही मराठीशी जोडले आणि हे त्यांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मराठीशी जोडले एवढेच नाही तर त्यांचे अनुभव मराठीत आणताना ते अधिक उजवे आणि प्रत्ययकारी होतील याची काळजी त्यांनी घेतली. अमृता प्रीतम, गुलज़ार, झाकीर हुसेन, जावेद अख्तर, हेमा मालिनी, हरिप्रसाद चौरसिया, एम्.एफ्. हुसेन, शबाना आझमी, बेगम परवीन सुलताना अशा साऱ्या मान्यवरांच्या अनुभवांचे सार ऋतुरंगाच्या अंकांतून मराठीत आले आहे. त्यांचे कोणतेही पुस्तक उघडावे आणि त्यातील कोणत्याही ‘प्रकरणा’त बुडून जावे असे असते.

शेवते यांच्या ‘ऋतुरंग’ प्रकाशनाने काढलेल्या ‘नापास मुलांची गोष्ट’ या पुस्तकाच्या चाळीस आवृत्त्या निघाल्या. हेच ‘भाग्य’, ‘नापास मुलांचे प्रगतीपुस्तक’ आणि ‘हाती ज्यांच्या शून्य होते’ या पुस्तकांच्याही नशिबी आले. ‘नापास मुलांची गोष्ट’ मुंबई विद्यापीठात अभ्यासाला लावले आहे.

कौटुंबिक संपादन

शेवते यांच्या पत्‍नीचे नाव माधुरी आणि एकुलत्या एक मुलीचे नाव शर्वरी आहे.

संपादित पुस्तके संपादन

दिवाळी असते चार दिवसांची, परंतु दिवाळी अंकांतील साहित्य दिवाळीनंतर महिना-दीड महिना वाचले जाते. हे साहित्य सतत वाचकांसमोर रहावे यासाठी 'ऋतुरंग'च्या दिवाळी अंकातील खास विषय अधिक आकर्षक स्वरूपात पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत असतात. हा उपक्रम गेली अनेक वर्षे चालू आहे. २०१७ सालापर्यंत अशी ५० पुस्तके निघाली आहेत. अशीच काही पुस्तके :-

  • आठवणींचे असेच असते
  • त्या प्रीतीची रीतच न्यारी
  • नापास मुलांची गोष्ट
  • नापास मुलांचे प्रगतीपुस्तक
  • भाग्य
  • वृक्षवल्ली आम्हा सोयरे ('ऋतुरंग' हा 'माणूस आणि निसर्ग' विशेषांक असलेल्या २००६ च्या दिवाळी अंकातील लेखांचे संपादित संकलन)
  • हाती ज्यांच्या शून्य होते

लेखन संपादन

कवितासंग्रह संपादन

  • ऋतुरंग (इ.स. १९९२)
  • कालिंदी (इ.स. १९९९)
  • कावळ्यांच्या कविता (इ.स. १९८०)
  • तळघर (इ.स. १९८९)
  • पंतप्रधानांना पत्र (इ.स. २००८)
  • पाऊस (इ.स. २००२)
  • राजघाट (इ.स. १९८८)
  • सई मालवणकर (इ.स. १९८४)
  • संदर्भ (इ.स. १९८२)
  • साफिया बेगम (इ.स. २००४)

पुस्तके संपादन

  • ज्यांच्या हाती शून्य होते.
  • नापास मुलांची गोष्ट.
  • नापास मुलांचे प्रगतिपुस्तक
  • रात्ररंग (संपादित, ऋतुरंगच्या २००१ चा दिवाळी अंक हा ‘रात्र’ विशेषांक होता. त्यात प्रसिद्ध झालेल्या विविध लेखकांच्या कथांचा संग्रह)

पुरस्कार संपादन

  • दया पवार पुरस्कार - पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे १३वा दया पवार पुरस्कार अरुण शेवते यांना वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात दिनांक २० सप्टेंबर, इ.स. २००९ रोजी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[२]
  • 'असंही एक साहित्य संमेलना'चा पुरस्कार (२५-१२-२०१७)

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ अरुण शेवते. "माणसासारखा अंकही घडतो". Archived from the original on 2016-03-04. २३ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ a b सकाळ वृत्तसेवा. "सामाजिक अन्यायात वाढ; तरीही महाराष्ट्र पुरोगामी कसा?". Archived from the original on 2016-03-05. २४ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले.