रामजी रामसिंग नाईक

समाजसुधारक , क्रांतिकारी नायक

रामजी नाईक (१९१५ -१९९५) हे विदर्भातील एक प्रचलित समाजसुधारक होते. त्यांचे पिताश्री श्री रामसिंग दुडासिंग नायक (१८२५-१९१६) साहस आणि समाज रक्षणासाठी प्रचलित होते. जंगल, जमीन आणि जन(समाज) हितासाठी त्यांनी सरंजामशाहीच्या विरोधात आवाज उठवला. लदेणी दरम्यान ब्रिटिश अधिकारी आणि स्थानिक सरंजामी सोबत त्यांना लढाही दयावा लागला. पुढे सामाजिक सुधारणा आणि सामाजिक न्यायाचा हा वारसा रामजी नाईक यांनी चालवला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते होते. कर्मयोगी रामजी नाईकांचे एक घरंदाज परिवार असून त्याला सामाजिक सुधारणांचा वारसा अनेक पिढ्यांपासून लाभला. सत्यनिष्ठा , शिक्षण आणि आत्मनिर्भरताचा त्यांनी प्रसार केला. त्यांचा जन्म तत्कालीन अकोला जिल्हा मधील वरोली तांडा येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचा विवाह वाईगौळ येथिल प्रतिष्ठीत मंगलादेवी रामावत (१९१७-२०१७) हिच्याशी झाला.

रामजी रामसिंग नाईक
राष्ट्रीयत्व भारतीय
वडील रामसिंग दुडासिंग नाईक
आई सकरीदेवी नायक
 कर्मयोगी रामजी नाईक यांची तत्कालीन गोरपंचायतीचे एक गणमान्य 'नाईक' म्हणून ख्याती होती. निस्पक्ष आणि पारदर्शक न्यायनिवाडा करण्यासाठी ते पंचक्रोशीत प्रचलित होते. त्यांच्या चौकस बुद्धी चातुर्यामुळे हजारो अन्यायग्रस्त पिडितांना न्याय मिळाल्याची लौकिकता सर्वदूर होती. कारंजा लाड येथील रामविलास रामकिसन मारवाडी यांनी याच कामगिरीसाठी त्यांना तब्बल पाच एकर जमीन बक्षिस रुपात दिली.

रामसिंग नायक (१८२५-१९१६) यांचे पूर्वज राजपुताना मधिल आहेत. परकिय आक्रमणाने राजपुतानातील जनजीवन विस्कळित झाल्यामुळे त्यांचे कुटुंब सी.पी.अँड बेरार प्रांतात स्थलांतरित होऊन वऱ्हाडात स्थायिक झाले. रामसिंग दूडासिंग नाईकांनी धुमा खेमासिंग नाईक यांच्या समवेत स्वतंत्र तांडा वसाहत वसवली होती. ही वसाहत पुढे 'रामजी नायकेरो- हेमा नायकेरो टांडो' (रामजी नाईकांचा तांडा) म्हणून ओळखले जाई. आदिवासी , विमुक्त भटके व भूमिहीनांना स्वावलंबी करण्यासाठी वसंतराव नाईक यांनी 'कसेल त्याची जमीन' या तत्वाने योजना हाती घेऊन भूमिहीनांसाठी सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मध्यप्रांतात 'नवाटी' म्हणून ही योजना अतिशय लोकप्रिय झाली. या अंतर्गत स्थापन केलेल्या अकोला जिल्ह्यातील मोठी सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'सामुदायिक सेवा सोसायटी'चे अध्यक्ष म्हणून महानायक वसंतराव नाईक यांनी रामजी नाईकांची निवड केली होती. परंतु पुढे त्यांनी स्वतःला राजकारणापासून अलिप्त ठेवले. वसंतराव नाईक हे मध्यप्रदेश प्रांताचे सहकार व दुग्धव्यवसाय मंत्री यासह द्विभाषिक मुंबई राज्याचे कृषी मंत्री असतांना तसेच पुढे महाराष्ट्राचे महसूल मंत्री झाल्यावरही आडवळणावर वसलेल्या तत्कालीन वरोली तांड्यात रामजी नाईकांच्या तांड्याला भेट दिली होती. त्यांच्यात अखेरपर्यंत ऋणानुबंधाची गाठ कायम राहिली. [१]

समाजसुधार आंदोलन संपादन

रामजी रामसिंग नाईक हे विदर्भातील सामाजिक सुधारणांच्या चळवळीतील समाज सुधारकापैकी एक प्रचलित 'नाईक' होते. शोषित पिडीत, निराधार घटकांवरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रखर आवाज उठवला. बाबासाहेब नाईक , वसंंतराव नाईक , पद्मश्री रामसिंग भानावत , बाबूसिंह नाईक , भिकूसिंह नाईक , आत्माराम नाईक , जातरसिंह नाईक , हिरासिंह पवार , अमरसिंह पवार , सखाराम मुडे , चोखलासिंह नाईक यांच्या समवेतही न्याय वंचित बहुजनांच्या हक्कासाठी ते झटले. गौर बंजारा , आदिवासी , वंचित समाजाला संघटित करून त्यांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी या समाजधुरिणांनी अपार कष्ट केले. विखुरलेल्या समाजघटकांना एकसंघ करून अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या समाजसुधार आंदोलनात सक्रिय राहिले.

जंगल सत्याग्रहातही त्यांनी सहभाग घेतला होता. महानायक वसंतराव नाईक यांनी सन १९५३ मध्ये स्थापन केलेल्या गोर बंजारा समाजाची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'ऑल इंडिया बंजारा सेवा संघ' उभारणीतही त्यांचा मोलाचा सहभाग होता. दिग्रस येथे आयोजित ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या स्थापना समारंभास माजी पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्रीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. कर्मयोगी रामजी नाईकांनी सामाजातील अनिष्ट रूढी , प्रथा विरुद्ध त्यांनी प्रखरपणे प्रहार केला. सामाजिक न्यायासाठी न्यायवंचितामध्ये चेतना निर्माण करण्यात त्यांनी आपले आयुष्य वेचले. १६ ऑक्टोबर १९९५ मध्ये वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. फत्तेपूरी गडाच्या पायथ्याशी त्यांची समाधी आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ प्रा.जाधव, जयसिंगराव (2018). भूमिपुत्राचं देणं : वसंंतराव नाईक. लोकनेता पब्लिकेशन. ISBN 978-93-5321-266-7.