मोतीलाल चिमणलाल सेटलवाड

मोतीलाल चिमणलाल सेटलवाड हे भारतातील वकील होत. त्यांचे वडील सर चिमणलाल सेटलवाड हेदेखील एक वकील होते. मोतीलाल यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८४ साली अहमदाबाद येथे एका गुजराती कुटुंबात झाला. काही वर्षांनंतर चिमणलाल मुंबईत स्थायिक झाले.[ तारीख?]मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून मोतीलाल १९०६ साली ते एल.एल.बी. झाले.[ संदर्भ हवा ]

मुंबईत मोतीलालांनी आपल्या वडिलांच्या हाताखाली वकिलीला सुरुवात केली. वकिली पेशाला लागणारे सर्व गुण मोतीलाल यांच्यात होते. त्यांचा आवाज अत्यंत प्रभावशाली होता. त्यामुळे विरुद्ध पक्षाचा वकील नामोहरम होऊन जायचा. तरीही त्यांच्या आवाजात कधीच भावनात्मक चढ-उतार येऊ न देण्याची ते दक्षता घेत असत. त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता. न्यायालयात आपल्या अशिलाची बाजू मांडताना अत्यंत आत्मविश्वासाने ते चौफेर नजर फिरवत बाजू मांडायचे. ते मुद्देसूद आणि स्वच्छ मुद्दे मांडीत असत. विरुद्ध पक्षाच्या वकिलाची बाजू मांडणे चालू असताना ते त्याला कधीही मध्ये थांबवत नसत. मोतीलाल कुणाहीकडून अतिशय वाजवी शुल्क आकारीत असत. वकिली पेशात नैतिक मूल्ये जपूनही यशस्वी होता येते, हे त्यांनी दाखवून दिले.[ संदर्भ हवा ]

आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मोतीलाल सेटलवाड हे १९३७ साली मुंबईचे ॲडव्होकेट जनरल झाले आणि नंतर १९५०मध्ये ते भारताचे ॲटर्नी जनरल झाले. भारताचे ॲटर्नी जनरल हे पद त्यांनी सलग १३ वर्षे (१९५०-६३) राखले. एवढ्या दीर्घ काळ ॲटर्नी जनरल पदावर राहणारे ते एकमेव भारतीय आहेत. त्यांनी १९५५-५८ सालांत स्थापन झालेल्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्षपदही भूषविले.[ संदर्भ हवा ]

मोतीलाल सेटलवाड हे खरोखरच चिमणलाल या आदरणीय पित्याचे आदरणीय पुत्र होते. त्यांनी त्यांचे वडील चिमणलाल यांचा चांगुलपणा नुसता आत्मसात केला असे नाही, तर त्यांनी तो वृद्धिंगतही केला. मोतीलाल यांची बौद्धिक क्षमता आणि न्यायवैद्यक शास्त्राची जाण त्यांना वकिली पेशाच्या सर्वोत्तम पदांपर्यंत घेऊन गेली. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. `माय लाइफ : लॉ ॲन्ड अदर थिंग्ज' हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.[ संदर्भ हवा ]

मोतीलाल यांचे पुत्र अतुल सेटलवाड हेही नामांकित वकील आहेत, तर सून सीता सेटलवाड सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मोतीलाल यांची नात आणि अतुल आणि सीता सेटलवाड यांची कन्या पद्मश्री तिस्ता सेटलवाड या एक सुप्रसिद्ध पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.[ संदर्भ हवा ]

मोतीलाल सेटलवाड यांच्या न्यायव्यवस्थेतील उत्तुंग कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांचा १९५७ साली `पद्मविभूषण' देऊन सन्मान केला.[ संदर्भ हवा ]