पोलियो

एक संसर्गजन्य रोग

पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलियोमायलिटिस या शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेमधील पोलियो (πολίός) म्हणजे ग्रे अथवा भुरा, मायलॉन (µυελός) म्हणजे मज्जारज्जू, तर -आयटिस (-itis) म्हणजे सूज या शब्दांपासून झाली आहे. पोलियोच्या उपसर्गाच्या ९०% घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत, परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १% पेक्षा कमी रुग्णांच्याबाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या 'गतिप्रेरक न्यूरॉनना' अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते.

पोलियो
----
पोलियो ग्रस्त मनुष्य
ICD-10 A80, B91
ICD-9 045, 138
DiseasesDB 10209
MedlinePlus 001402
eMedicine ped/1843 साचा:EMedicine2
MeSH C02.182.600.700
टी.इ.एम. द्वारा घेतलेले पोलियोच्या विषाणूचे छायाचित्र
पोलियोमुळे उजवा पायात विकृती आलेली एक बालिका.
बालिकेस तोंडाद्वारे पोलियोची लस देतांना

हजारो वर्षे पोलियो सक्रिय परंतु स्थिर अवस्थेत अस्तित्वात होता. १८८० नंतर पोलियोच्या साथींचे युरोपामध्ये मोठे उद्रेक होऊ लागले, आणि नंतर लगेचच अमेरिकेत पोलियोच्या साथीचा प्रसार झाला. १९१० पर्यंत जगात पोलियोचा खूपच प्रसार झाला होता, आणि त्याच्या साथींचा उद्रेक ही अगदी नेहेमीची घटना होऊ लागली. या साथींमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या, व यामुळे पोलियोवर उपायकारक लस शोधण्यासाठी 'महाशर्यत' सुरू होण्यास जोर मिळाला. पोलियोच्या लसी विकसित करण्याचे श्रेय जोनस सॉल्क (१९५५) व अल्बर्ट सेबिन (१९५८) यांच्याकडे जाते. यांच्या प्रयत्नांमुळे पोलियोच्या रुग्णांची संख्या प्रतिवर्षी अनेक लाखांवरून काही हजारांवर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफरोटरी इंटरनॅशनल या संस्थांच्या पोलियो निर्मूलनाच्या प्रकल्पांमुळे पोलियोचे जगातून लवकरच संपूर्ण उच्चाटन होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

२००० मध्ये प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील चीन आणि ऑस्ट्रेलिया मिळून इतर ३६ देशांमध्ये पोलियोचे निर्मूनल झाले. २००२मध्ये युरोप पोलियोमुक्त जाहीर करण्यात आला. आता (२००६ नंतर) पोलियोच्या साथींचे उद्रेक फक्त भारत, पाकिस्तान, नायजेरिया, व अफगाणिस्तान या चार देशांमध्येच आढळून येत होते. (मार्च २७,२०१४ ला) जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे भारत देशाला १०० प्रतिशत पोलियोमुक्त जाहीर करण्यात आले. भारतात सरकारने (१९९५) साली सुरू करण्यात आलेल्या पल्स पोलियो योजने मुळे भारत देश पूर्णपणे पोलियोमुक्त होऊ शकला. -लस : दोन लसींचा वापर केला जातो.

  • साल्क - इंजेकशनद्वारे
  • सेबिध - तोंडावाटे

व्याख्या संपादन

पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात किंवा पोलिओ या नावाने ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता सस्थेवर परिणाम करतो. लक्षणामध्ये सौम्य पक्षाघात विरहित किंवा पूर्ण पक्षाघात असे सर्व परिणाम या आजारामुळे काहीं तासात होतात.

वर्णन : एकूण तीन पोलिओच्या विषाणूमुळे पोलिओ होत असल्याचे माहीत आहे. एंटेरोव्हायरस या एकाच जातीमधील या विषाणूचे तीन प्रकार हे अन्नमार्गामधील विषाणू आहेत. टाइप वन या पोलिओ विषाणूमुळे आलेल्या साथीने बहुतेक रुग्णाना पक्षाघात होतो. एरवी हा विषाणू निरुपद्रवी मानवी परजीवी आहे.याचे संख्याशास्त्रीय अंदाज थोडे भिन्न आहेत. काहीं जणांच्या म्हणण्यानुसार दर २०० रुग्णांपैकी एकामध्ये पक्षाघाताची लक्षणे तर दुसऱ्या अंदाजानुसार दर १००० संसर्गापैकी एका रुग्णास विषाणू मध्यवर्ती चेता संस्थेपर्यंत पोहोचल्याने पक्षाघात होतो. जेंव्हा विषाणू मध्यवर्ती चेता संस्थमध्ये प्रवेश करतो तेंव्हा मज्जारज्जूमधील प्रेरक चेतापेशींच्या आवरणाला दाह होतो. प्रेरक चेतापेशी नष्ट होतात. यामुळे स्नायूकडे संवेद पाठविणे थांबते. स्नायूंकडे आलेले संवेद थांबल्यामुळे स्नायू आकुंचन पावणे थांबते. स्नायू शिथिल होतात. पोलिओमधील हा नेहमीचा प्रकार आहे. पोलिओ विषाणूमुळे किती चेतापेशी बाधित झाल्या आहेत त्यावर पक्षाघाताची तीव्रता अवलंबून आहे. बहुतेक वेळा अवयवांच्या स्नायूवर परिणाम होतो. पोटाचे आणि पाठीचे स्नायू बाधित झाले असल्यास उभे राहण्याची ढब बदलते. मानेच्या स्नायूवर परीणाम झाला असल्यास मान हलवणे आणि डोके उचलणे कठीण होते. चेहऱ्याच्या स्नायूंचा पक्षाघात असल्यास चेहरा वेडावाकडा होणे आणि पापण्या खाली पडणे असे परिणाम दिसतात. घशाचा पक्षाघात झाल्यास श्वासोच्छ्वास थांबून मृत्यू ओढवतो.

पोलिओ विषाणूचा मानव हा एकमेव पोषिता आहे. बहुतेक रुग्ण लहान मुले असतात. पण पोलिओ प्रौढाना होऊ शकतो. पोलिओचे कारण दाट लोकवस्ती आणि निकृष्ट राहणीमान व स्वच्छतेचा अभाव हे आहे. अशा वातावरणात पोलिओ सहज पसरू शकतो. पोलिओचा धोका वृद्ध, गरोदर महिला, प्रतिकारा शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, नुकत्याच टॉन्सिल काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती याना अधिक असतो.

संशोधन संपादन

पोलिओच्या विषाणू (व्हायरस)चे तीनही प्रकारचे जिवाणू हे ’आरएनए‘वर्गीय असून, त्यांची नावे ब्रुनहिल्ड, लॅन्सिंग आणि लिऑन अशी आहेत. ब्रुनहिल्डमुळे अर्धांगवायू होतो. लॅन्सिंग आणि लिऑन मज्जारज्जूच्या पेशींवर हल्ला करतात. त्यामुळे हातांपायांतील शक्ती जाऊन अपंगत्व येते. तिन्ही विषाणू फक्त मानवाला घातक आहेत. प्राण्यांना पोलिओ (आणि देवीच्या) विषाणूंचा काही त्रास होत नाही. फ्रॅंकलिन रुझव्हेल्ट हे १९३३ ते १९४५ सालापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी पोलिओच्या संशोधनासाठी प्रोत्साहन आणि निधी उपलब्ध करून दिला. ते स्वतःच पोलिओग्रस्त होते आणि तेथे त्याकाळी पोलिओग्रस्तांचे प्रमाण खूप होते. पिटसबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रो. जोनास सॉल्क यांनी १९५१मध्ये पोलिओचे विषाणू शोधले आणि त्यांच्यापासून लस तयार केली. त्यांच्या लशीमध्ये पूर्णतः निष्प्रभ विषाणू होते. अल्बर्ट सॅबिन यांनीही न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये १९६१मध्ये पोलिओची लस तयार केली. त्यामध्ये तिन्ही प्रकारचे, पण अर्धवट विकलांग, क्षीण विषाणू होते. ही लस "टोचावी‘ लागत नव्हती. ती चवीला गोड होती. तिचे दोन थेंब तोंडाने घ्यायचे होते. त्यासाठी डॉक्‍टरांची उपस्थिती गरजेची नव्हती.

भारतातील प्रशिक्षित स्वयंसेवक बालकांना लशीचे दोन थेंब देत असे. मुख्य म्हणजे या लशीचा प्रभाव जन्मभर टिकणारा आहे. पल्स पोलिओचा डोस द्यायच्या दिवशीच काही बालके रेल्वे आणि बसच्या प्रवासात असत. अशा वेळी स्वयंसेवक गाडीत शिरून चटकन पोलिओच्या लशीचे थेंब बालकांच्या जिभेवर ठेवायचे. एकूण पाच डोस द्यायची योजना होती. त्यात खंड पडू नये, म्हणून उत्साही तरुण स्वयंसेवकांनी मनोभावे या मोहिमेत भाग घेतला. सव्वाशे कोटी लोकसंख्या, अस्वच्छता, पाणीटंचाई, अंधश्रद्धेचा पगडा, खडतर हवामानाचे उंच-सखल भूभाग, पर्वतीय-वाळवंटी प्रदेश असे अडथळे पार करून भारत पोलिओमुक्त झालाय. जगातील ८० टक्के नागरिक आता "पोलिओविरहित‘ देशांमध्ये राहतात.

कारणे आणि लक्षणे संपादन

आधीच संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क झाल्याने पोलिओ पसरतो. क्वचित रुग्णाच्या विष्ठेने दूषित झालेले अन्न आणि रुग्णाच्या लाळेशी संबंध आल्याने पोलिओ होऊ शकतो. थोडक्यात पोलिओ दूषित पाणी आणि अन्नामधून पसरतो. घाण गटारी, आणि दूषित अन्न यामधून पोलिओचा प्रसार होतो. तोंडावाटे शरीरात शिरलेल्या विषाणूची पुढील वाढ घशातील लसिका ग्रंथीमध्ये होते. एक आठवडाभर विषाणू येथेच असतो. या कालखंडामध्ये विषाणू अन्नमार्गाच्या रक्त आणि रसवाहिन्यामधून शोषला जातो. त्याची पुढील वाढ येथेच होते. यास सर्वाधिक सतरा आठवड्यांचा काळ लागतो. एकदा षोषला गेल्यानंतर विषाणू शरीरभर पसरतो. शरीरामधून मज्जारजू आणि केंद्रीय चेतासंस्थेमध्ये त्याचा प्रवेश होतो. एकाकडून दुसऱ्याकडे विषाणू पसरण्याचे एक कारण म्हणजे अस्वच्छ हात. जेवण्यापूर्वी जेवल्यानंतर, शौचानंतर हात घुतल्याने पोलिओ विषाणूचा प्रसार थांबतो. जोपर्यंत विषाणू घाणीत आहे तोपावेतो विषाणू घशात किंवा शौचामध्ये जिवंत राहतो. आजाराचे दृश्य परिणाम दिसण्यास तीन ते एकवीस दिवस लागतात.पण लक्षणे दिसू लागल्यानंतर सात ते दहा दिवसात पोलिओ होतो. विषाणू संसर्गाच्या दोन पद्धती आहेत. एक सौम्य आजार निर्माण करणारा आणि एक गंभीर आजाराचा . (पक्षाघातनज्य आणि पक्षाघात विरहित). सौम्य आजार 80-90% टक्के व्यक्तीना होतो. बहुतेक रुग्ण लहान मुले असतात. आजाराच्या लक्षणामध्ये थोडा ताप, अशक्तपणा, घसा खवखवणे आणि उलट्या होतात. ही लक्षणे विषाणू संसर्ग झाल्यानंतर तीन ते पाच दिवसात दिसू लागतात. सौम्य आजार २४ ते ७२ तासांत बरा होतो. पूर्वीच्या सौम्य आजाराची लक्षणे आधी दिसत असल्यास गंभीर स्वरूपाचा पोलिओ होतो. शक्यतो मोठ्या वयाच्या मुलाना आणि प्रौढाना गंभीर आजार होतो.

पोलिओची लागण झालेल्या १० टक्के व्यक्तींमध्ये तीव्र डोकेदुखी, मान आखडणे, पाठीत वा मानेमध्ये वेदना सुरू होतात. ही लक्षणे दिसण्याचे कारण म्हणजे मेंदूआवरण दाह. मेंदूआवरण मज्जारज्जू आणि मेंदूवरील चिवट आवरण आहे. या प्रकारास ‘आसेप्टिक मेंनिंजायटिस’ म्हणतात. याला आसेप्टिक म्हणण्याचे कारण म्हणजे हा मेंदूआवरण दाह विषाणूजन्य किंवा जिवाणूजन्य आहे. थोड्या दिवसात यामधून रुग्ण पूर्णपणे बरा होतो.

एक टक्का रुग्णामध्ये आजार गंभीर स्थितीमध्ये जातो. त्याला पोलिओ होतो. दोन ते तीन दिवस त्याला कोणतीही पोलिओची लक्षणे जाणवत नाहीत. पोलिओची पूर्वलक्षणे न दिसता एकाएकी पोलिओ होण्याआधी तीव्र डोकेदुखी, पाठदुखी आणि मानदुखी सुरू होते. पोलिओ विषाणूच्या तडाख्यात मुख्य प्रेरक चेता आल्याने ही लक्षणे दिसतात. स्नायूंच्या हालचालीस या प्रेरक चेता कारणीभूत आहेत. विषाणूमुळे चेतांचा दाह आणि चेता नष्ट होतात. स्नायूना प्रेरक संवेद न मिळाल्याने स्नायू दुर्बल, शिथिल होतात. याचा शेवट स्नायूंच्या पक्षाघातामध्ये होतो. स्नायूंचा सामान्यपणा नष्ट झाल्याने अवयव शिथिल होतात. .काहीं दिवसानी स्नायू आकाराने लहान होतात. अशी स्थिती शरीराच्या दोन्ही बाजूस असल्यास द्विपारश्वसममित आणि एकाच बाजूस असल्यास एका बाजूचे अवयव काम करीत नाहीत. पक्षाघात झालेल्या अवयवामधील संवेदनामध्ये फरक पडत नाही.

पोलिओ विषाणूचा प्रवेश मज्जास्तंभामध्ये (मेंदू आणि मज्जारजू याना जोडणारा मेंदूचा महत्त्वाचा भाग) झाल्यास रुग्णाचे श्वसन आणि गिळण्यास त्रास होतो. मज्जास्तंभावर तीव्र परिणाम झाल्यास ह्रदयक्रिया रक्तदाब यावर परिणाम होतो आणि मृत्यू ओढवतो.

पक्षाघाताची शेवटची स्थिति थोड्याच दिवसामध्ये येते. ज्या चेतावर विषाणूचा प्रभाव पडला नाही त्या बिघाड झालेल्या चेतांचे कार्य आपापल्या परीने सुधारून घेतात. त्यांच्या नव्या शाखा नष्ट झालेल्या चेतांचे कार्य करतात. सुदैवाने चेतापेशी पूर्णपणे नष्ट झालेल्या नसल्याने महिन्याभरात प्रेरक आणि संवेदी चेता कार्य करू लागतात. सहा महिन्यांच्या काळात रुग्ण पूर्ण बरा होतो. चेतापेशीवर कायमचा परिणाम झाला असल्यास कायमचा पक्षाघात राहतो.

निदान संपादन

ताप आणि असममित स्नायू शिथिलता व पक्षाघात संवेदी चेतांचे कार्य चालू असणे हे पोलिओचे लक्षण आहे. लहान मुले किंवा तरुणामधील या लक्षणानंतर कमरेच्या पोकळीमधून मज्जारजूभोवती असलेल्या मेरुद्रवाच्या परीक्षणामध्ये वाढलेल्या पांढ-या पेशी आणि जिवाणू न दिसल्यास आसेप्टिक मेंदूदाहाचे निदान होते. पक्षाघातविरहित पक्षाघातविरहित पोलिओचे निदान होत नाही. घशातील पेशींचे किंवा शौच परीक्षणामधून पोलिओ संबंधित प्रतिपिंड परीक्षण केल्यासच पोलिओचे निदान पक्के होते.

लसीकरण संपादन

जगात पोलिओ निर्मूलनासाठी दोन महत्त्वाच्या लसीकरण पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत जोन्स साल्क यांनी १९५२ साली यशस्वीरीत्या शोधून काढली. या पद्धतीत लस म्हणजे मेलेल्या जीवाणूंचा संच वापरला गेला. हे जीवाणू शरीरात स्नायूंमार्फत टोचून दिले जात. पुढे, अल्बर्ट सबिन यांनी मुखामार्गे लसीकरणाची पद्धत शोधून काढली.

पोलिओचे जीवाणू कोणत्याही प्राण्याच्या शरीरामध्ये फार वेळ राहू शकत नाहीत कारण त्या प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती त्या पोलिओ विषाणूंना पळवून लावते व त्यामुळे पोलिओचे कायम स्वरूपी निश्चित असे वाहक निसर्गात नाहीत .या गोष्टीमुळे आपल्या हे लक्षात आले की मनुष्यांतर्गत पोलिओ विषाणूंचा होणारा प्रसार रोखणे ही जागतिक पोलिओ निर्मूलनातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. असे केल्यामुळे व या दोन लसीकरण पद्धतींचा अवलंब केल्यामुळे आज जगातील सगळ्या देशांमध्ये पोलिओ रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. याचा पुरावा हा की गेल्या २० वर्षांमध्ये पोलिओच्या रुग्णांची संख्या ३,५०,००० रुग्णांपासून १५०० रुग्णांपर्यंत खाली आली आहे. १९५८ साली भारतातील National Institutes of Healthने 'जिवंत पोलिओ लसींवर' एक विशेष समिती नेमली. या समितीने माकडांना विविध लसीं देत प्रयोग करून त्या लसींची पोलिओ जिवाणूंना प्रतिकार करण्याची क्षमता तपासली. या प्रयोगांच्या निकालांवरून सबिन यांच्या लसी सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झले व सर्व देशांमध्ये ह्या लसींचा वापर करावयाचे ठरले.

इम्युनायझेशन संपादन

१९५० साली विल्यम हॅमोन यांनी पोलिओ रुग्णांच्या रक्तातून गामा ग्लोब्युलिन काढून त्यावर संशोधन केले. हॅमोन यांनी असे सांगितले कि हे गाम्मा ग्लोब्युलीन्मध्ये पोलिओ विरुद्ध प्रोटीन्स आहेत आणि हे गामा ग्लोब्युलीन पोलिओ विरुद्ध आपण वापरू शकतो .आणि

साथींचा अभ्यास संपादन

पोलिओ हा रोग अजूनही साऊथ आशिया आणि आफ्रिका मध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो . १९५० मध्ये पोलिओच्या लसीच्या जागतिक स्तरावरील प्रसिद्धीमुळे पोलिओ रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली .१९८८ मध्ये World Health Organisation ,UNICEF आणि Rotary Foundation या संस्थांनी सुरू केलेल्या कामामुळे जागतिक स्तरावरील पोलिओ निर्मूलनाचा प्रयत्न यशस्वी होत आहे .

उपचार संपादन

पोलिओवर नेमके उपचार नाहीत. फक्त लक्षणावरून उपचार करण्यात येतात. रुग्णास वेदना कमी करता येतील आणि स्नायूंना आराम मिळेल एवढे उपचार शक्य आहेत. श्वास घेण्यासाठीच्या स्नायूवर परिणाम झाला असल्यास कृत्रिम श्वासयंत्रावर रुग्णास ठेवावे लागते. पोलिओचे नक्की निदान झाले असल्यास रुग्णास कडक बिछान्यावर झोपविण्याचा सल्ला दिला जातो. रुग्ण बरा होत असता भौतिक चिकित्सा आणि उपचारांचा रुग्णास फायदा होतो.

पूर्वानुमान संपादन

पोलिओ सौम्य असल्यास किंवा आसेप्टीक मेंदूदाहाचे निदान झाल्यास रुग्णाच्या पूर्ण बरे होण्याची शक्यता असते. गंभीर स्वरूपाचा पोलिओ झाल्यास पन्नास टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात. 25% रुग्णामध्ये थोडा परिणाम शिल्लक राहतो. पण उरलेल्या 25% रुग्णामध्ये गंभीर विकृति शिल्लक राहते. गंभीर आजार झालेले 1% रुग्ण मरण पावतात. स्नायू दुर्बलता पहिल्या सहा महिन्यात पूर्ववत होते. रुग्णामधील सुधारणा दोन वर्षापर्यंत होत राहते.

नुकताच पोलिओचा आणखी एक प्रकार उजेडात आला आहे त्यामध्ये पोलिओनंतर अनेक वर्षे स्नायू दुर्बल होत राहतात. स्नायूची शक्ती या आजारात हळू हळू कमी होत जाते.

प्रतिबंध-पोलिओपासून संरक्षण मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. पोलिओच्या दोन लसी मुळे पोलिओच्या विषाणूविरुद्ध प्रतिपिंड तयार होतात. लस घेतलेल्या व्यक्तीमध्ये कायमची आयुष्यभरासाठी प्रतिकारशक्ती हे याचे वैशिष्ट्य आहे.

सॅबिन लस ही तोंडाने घेण्याची पोलिओप्रतिबंधक लस आहे. लहान बालकाना ही तीन डोसमध्ये देण्यात येते. या लसीमध्ये दुर्बल पोलिओच्या विषाणूचा वापर केला आहे. पुढील आयुष्यात पोलिओपासून या लसीने संरक्षण मिळते. या लसीमध्ये जिवंत पण दुर्बल पोलिओ विषाणूंचा वापर केला असल्याने ज्या व्यक्तीमध्ये प्रतिकारशक्ती क्षीण आहे अशा व्यक्तीमध्ये पोलिओ सारखी लक्षणे उद्भवू शकतात. असा प्रकार क्वचितच होतो. 68 लक्षडोसेस पैकी एका व्यक्तीमध्ये असा परिणाम दिसला आहे.तीन

साल्क लस ही मृत पोलिओ विषाणूपासून बनविलेली आहे. त्वचेखाली तीन इंजेक्शन्सच्या स्वरूपात ही लस द्यावी लागते. या लसीमध्ये जिवंत विषाणू नसल्याने लस दिलेल्या व्यक्तीमध्ये लसीमुळे प्रतिकारशक्ती उत्पन्न होते. भविष्यकाळात पोलिओ विषाणूशी संपर्क आल्यानंतर रुग्णाचा पोलिओपासून बचाव होतो.

इतिहास संपादन

पोलिओच्या परिणामांचे ज्ञान आदिमानवाच्या काळापासून तयार झालेले आहे. इजिप्शियन कलाकृतींमध्ये पोलिओचे अवशेष सापडतात. पोलिओचे पहिले वर्णन मायकेल अंडरवुड यांनी १७८९ साली केले. ह्या आजाराला Infantile Paralysis असे नंतर म्हणण्यात आले. विसाव्या शतकाच्या आधी पोलिओ आजार सहा महिन्यांहून कमी वयाच्या मुलांना आगदी कमी वेळा होत असे. कारण त्याकाळी लोकाचे राहणीमान अतिशय खालावलेले होते आणि म्हणून लोकांना सततच पोलिओच्या विषाणूंशी संपर्क होता आणि म्हणून त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली होती परंतु विसाव्या शतकानंतर चांगल्या राहणीमानामुळे लहान मुलांना देखील पोलिओ रोग होऊ लागला. युरोपे व अमेरिकेमध्ये २० व्या शतकाच्या सुरुवातीला छोट्या प्रमाणात पोलिओची साथ आली होती. १९५०पर्यंत पोलिओने आपल्या साठीचे शिखर गाठले होते. पोलिओने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले. Itensive Care Medicineची सुरुवात पण पोलिओ विरुद्ध चाललेल्या लढ्यातच झाली. पोलिओ रुग्णांना मदत करण्यासाठी ज्या मोहिमा काढण्यात आल्या त्या मोहिमा जगात पहिल्या मदत कार्य असणाऱ्या ठरल्या. जे रुग्ण पोलिओमधून वाचले त्यांचे अवघे आयुष्य बदलून गेले. त्यांच्या यशामागे पोलिओच खूप मोठा वाटा आहे. पोलिओ ही १९६० च्या दशकातली सर्वात मोठी गोष्ट बनली व त्यामुळे पोलिओवर काम करणारे शास्त्रज्ञ सर्वात प्रतिष्ठित झाले. Polio Hall of Fameची सुरुवातही ह्याच कारणावरून झाली.

भारताचे शेजारी देश संपादन

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा अपवाद वगळता भारताच्या आजूबाजूचे देश आता पोलिओमुक्त झालेले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांवर "तालिबान‘कडून प्राणघातक हल्ले होतात. परिणामी ते देश पोलिओग्रस्त आहेत. विषाणूंना कोणत्याही देशाच्या सीमारेषांचे बंधन नसल्याने भारतासारख्या अनेक पोलिओमुक्त देशातील बालकांना म्हणूनच यापुढेही पोलिओची लस घ्यावी लागणार आहे.

पोलिओचा ’दुसरा’ विषाणू हद्दपार संपादन

टाईप २ विषाणूचे पृथ्वीवरून १९९९मध्ये कायमचे उच्चाटन झाले. त्यामुळे २५ एप्रिल २०१६पासून जगात "टीओपीव्ही‘ऐवजी "बीओपीव्ही‘ लस देण्यास सुरुवात झाली आहे. याला भारताने "नॅशनल स्विच डे‘ म्हटले आहे.. "टीओपीव्ही‘ म्हणजे "ट्रायव्हॅलंट ओरल पोलिओ व्हॅक्‍सिन‘. यामध्ये पोलिओच्या तिन्ही विषाणूंचा समावेश होता. "बीओपीव्ही‘मध्ये टाईप २ (लॅन्सिंग) विषाणू नाही. म्हणून याला "बायव्हॅलंट पोलिओ व्हॅक्‍सिन‘ म्हणतात. "टीओपीव्ही‘ची लस देणे ९ मे २०१६पासून पूर्ण बंद होईल.

पहा : साथीचे आजार