धूळपाटी/एनार्कोन

(एनार्कोन या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्रातल्या गोदा, भीमा, कृष्णा नद्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून उगम पावतात, त्या उगमस्थानांपाशी परंपरेने त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि महाबळेश्वरांचे अधिष्ठान मांडून, तिथे देवराया राखून जपले आहे.  नव्या जमान्यात भीमेच्या देवराईच्या आसमंतात भीमाशंकर अभयारण्य घोषित केले आहे आणि महाबळेश्वर-पांचगणी परिसरात संवेदनशील परिसर क्षेत्र (ईकोसेन्सिटिव्ह झोन) घोषित केला आहे.

ह्यातल्या भीमाशंकर अभयारण्याच्या दक्षिणेच्या पट्ट्यात एनर्कॉन कंपनीने पवनचक्क्या बसवल्या आहेत. गोव्यातील काही खाणी अभयारण्यांवर, राष्ट्रीय उद्यानांवर अतिक्रमण करत आहेत, व इतर अनेक अशा संरक्षित क्षेत्रांच्या अगदी नजीक नासधूस करत आहेत अशी जाणीव निर्माण झाल्यावर २००२ साली भारतीय वन्य जीव मंडळाने सर्व संरक्षित क्षेत्रांच्या दहा किलोमीटर परिघात संवेदनशील परिसरक्षेत्राची आखणी करावी असा ठराव मंजूर केला होता. पण संपूर्ण पश्‍चिम घाटभर वन विभागांनी न्यायालये वरचेवर बजावत असतानाही २०१० पर्यंत काहीही कारवाई सुरू केली नव्हती. हा परिसर महाराष्ट्राच्या शेकरू या राज्यपशूसाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या वनराजीत आढळणाऱ्या Heterophragma quadriloculare या वृक्षाच्या चिरांच्यात Xylocopa tranquebarica हा रात्रीच्या अतिशय मंद प्रकाशातही रंग ओळखू शकणारा भुंगा सापडतो.  इथे विशेषतः पावसाळ्यात अनेक औषधी वनस्पती उगवतात.  

अतुल काळे या तरुण पत्रकाराच्या आणि त्याचे वडील डि.के. काळे यांच्या खटाटोपाइतून पश्चिम घाट परिसरात तज्ञ गटाचे  लक्ष या प्रकल्पाकडे वेधले गेले. त्यांच्या गावाचे पवनचक्कीने बरेच नुकसान झाले होते आणि त्यांनी माहिती हक्क कायद्याच्या आधारे प्रकल्पाबद्दल माहिती मिळवली होती. पश्चिम घाट परिसरात तज्ञ गट WGEEP वरील रेने बोरजेस ह्या परिसराशी परिचित होती आणि तिने प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्पातील अनेक दोष उघडकीला आणले होते.  डोंगर माथ्यावर पवनचक्क्या बसवण्यासाठी पायथ्यापासून बनवलेला रस्ता अतिशय निष्काळजीपणे बांधल्यामुळे झालेळी अनेक छोटी भूस्खलने झाली होती. या दरडी कोसळल्याने खालच्या गावांचे निरनिराळ्या प्रकारे नुकसान झाले होते. तो राडारोडा त्यांच्या शेतांवर पसरला होता आणि त्यांचे शेतीच्या पाणी पुरवठ्याचे आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले होते. त्यापुढे या भूस्खलनांतून भीमा भामा धरणांच्यात जास्त झपाट्याने गाळ साचू लागला होता.

ह्याबाबत तिथल्या फॉरेस्ट रेंजरने प्रामाणिकपणे अहवाल देताना खालील मुद्दे मांडले:

[१] हा चाकण वनक्षेत्रातील सदाहरित वनाच्छादित टापू आहे.

[२] भीमाशंकर अभयारण्यातील व ह्या वनांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते,

[३] पवनचक्क्या आल्यास वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान व आढळ ह्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. येथे दुर्मिळ शेकरू खार, लांडगा, कोल्हा, तरस, मोर, बिबट्या आढळतात.

[४] प्रकल्पांतर्गत रस्त्यांमुळे पर्यटकांची ये-जा वाढल्यास सदाहरित जंगलास हानी पोचण्याची शक्यता आहे.

हा अहवाल ताबडतोब दडपण्यात आला व अरण्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथे सदाहरित वन नाही, काहीही महत्वाचे वन्य जीव नाहीत असे खोटे निवेदन करत पवनचक्क्यांना परवानगी दिली होती.[१][२][३][४]

  1. ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-05-13 रोजी पाहिले.
  2. ^ "शिक्षणआनंदाची वर्षे." Loksatta. 2023-09-03. 2024-05-13 रोजी पाहिले.
  3. ^ सुधारक, आजचा (2023-12-31). "पुस्तक परिचय - सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी". आजचा सुधारक. 2024-05-13 रोजी पाहिले.
  4. ^ Peri, Swapna (2023-10-12). "Book Review: 'A Walk Up The Hill' by Madhav Gadgil | Book Reviews". Storizen (इंग्रजी भाषेत). 2024-05-13 रोजी पाहिले.